Saturday 21 May, 2011

१ मे २०११, उद्योग विशेष- भाग ३

दाभोळकर एटरप्रायझेस

सौ. अस्मिता विश्वजीत दाभोळकर यांनी जे. जे. स्कूल ऑफ अल्पाईड आर्टमधून बी. एफ. ए. ची पदवी घेल्यानंतर काही काळ नोकरी केली. स्वतंत्र व्यवसाय करायच्या निर्णयाला घरातून प्रोत्साहन मिळालं आणि दृष्टी इझायनर्सचा जन्म झाला. काळा घोडा फेस्टीव्हल, वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये प्रदर्शन भरवून या व्यवसायाची सुरुवात झाली. फायबर, सिपोरेक्स, लाकूड ह्या माध्यमातून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ह्या पद्धतीत म्यूरलकरुन व्यवसायाच्या माध्यमातून अस्मिता आपला छंद जोपासत होत्या.

परंतु त्यापलीकडे लघुउद्योगाविषयी मनात कुतूहल असल्याने कॅनरा बँकेने आयोजित केलेल्या खास महिला उद्योजकांच्या कार्यशाळेत सहभाग घेतला. डिहायड्रेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन आंत्रप्रिनरशीप कोर्समध्ये केसरी मिल्क मसाला सादर केला आणि त्याला बेस्ट डेब्युटन्ट आंत्रप्रिनरचा पुरस्कारही पहिल्या पदार्पणात मिळाला यामुळे स्वतःचा या क्षेत्रात काही वेगळ करण्याचा उत्साह निर्माण झाला.

एखादा उद्योग सुरु करण्याचा संकल्प करण आणि प्रत्यक्ष कार्यान्वीत होणं ह्यात बरच अंतर आहे. मधुमिताच्र्ग् या नावाने आपलं प्रॉडक्ट बाजारात आणायचं असं ठरवून मे २००९ ला मधुमिताहा ट्रेडमार्क रजिस्टर केला. दाभोळकर एंटरप्राइझेस ही कंपनी स्थापन केली.

सुमारे २ लाख रुपयांची गुंतवणूक करुन डिहायड्रेटर, आटा चक्की, सिलिग मशिन, फूड प्रोसेसर, इलेक्ट्रीकल वजन काटा, इलेक्ट्रीकल गॅस शेगडी या नव्या व्यवसायासाठी लागणा-या आवश्यक वस्तूंची खरेदी केली.

एवढी गुंतवणूक करुन प्रॉडक्ट बाजारात आणायचे तर हमखास बाजारपेठ हवीच म्हणून मराठी व्यापारी मित्रमंडळाची सभासद होऊन महाराष्ट्र व्यापारी पेठेच्या डिसिल्व्हा पटांगण, दादर येथे ६५ दिवस चालणा-या प्रदर्शनात सहभाग घेतला. यामध्ये केसरी मिल्क मसाला, वेलची पावडर, रेडी टू कूक - पराठा पीठ, मेथी, पालक, टॉमेटो, भजी पीठ, पालक मेथी, इन्सटन्ट चटण्यांमध्ये, कैरी, आवळा, पुदिना अशी व्हरायटी दिली. इन्सटन्ट टोमॅटो सूप, इन्सटन्ट शेवई खीर अशी गृहिणींचा स्वयंपाकघरातील वेळ वाचवणारी उत्पादने असल्याने गृहिणींच्या ह्या उत्पादनांवर अक्षरशः उड्या पडल्या. ६५ दिवसात एक लाख अठ्ठेचाळीस हजारांची उलाढाल झाली. नवकाळ, ई टी. व्ही. अशा प्रसार माध्यमांनी या वेगळ्या उत्पादनांची दखल घेतल्याने ग्राहक व कंपनी यांच्यात विश्वास निर्माण व्हायला मदत झाली.

त्यानंतर ठाणे, विलेपार्ले येथे होणा-या ग्राहक पेठामध्ये सहभाग घेतला. डिहायड्रेशन पद्धतीने होणारी पदार्थ निर्मिती, पदार्थ चांगले ८ ते १० महिने टिकतात, कोणत्याही प्रकारची रासायनिक द्रव्ये आणि रंगविरहीतता, पौष्टीक आणि प्रथिनयुक्त पदार्थ असल्यामुळे सर्व प्रदर्शनांतून आमची प्रॉडक्टस् झटपट संपत असत.

सुरुवातीला घरामधून सुरु झालेला व्यवसाय आता समतानगर, कांदिवली (पू.) इथल्या गाळ्यामध्ये स्थिरावलाय. सध्या आमच्याकडे २ महिला कामगार, १ डिलिव्हरी बॉय, प्रदर्शन, शॉपिग डिस्प्ले प्रमोशनसाठी १ मुलगी असा ४ जणांचा स्टाफ कार्यरत आहे.

व्यवसायात पदार्पण करतांना काही हटके आणि नाविन्यपूर्ण करायचं असं ठरवलं असल्यामुळे अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास आणि पाठिब्यामुळे एवढा विस्तार शक्य झाल्याचं त्या सांगतात.

खास मधुमेहींसाठी नऊ धान्य वापरुन तयार केलेले नवरत्न पीठ, शतावरी युक्त नाचणी सत्व, ब्राह्मीयुक्त नाचणी सत्व, शक्तीवर्धक सत्तू पीठ, धान्य व कडधान्य यांना मोड आणून त्यांचे निर्जलीकरण करुन त्यांच्या मिश्रणातून बनविलेले प्रथिनयुक्त पीठ, सोयाबीन, नाचणी लाडू, मेथीयुक्त लाडू अशा आरोग्यवर्धक उत्पादनांची रेंज ही दाभोळकर एंटरप्रायझेसकडे उपलब्ध आहे.

दाभोळकर एंटरप्रायझेसचे सर्व खाद्यपदार्थ दादर-छेडा, न्यू बेबी मार्ट, बेडेकर, पार्ल्यामध्ये विजय स्टोअर्स चॅम्पियन, ठाण्यामध्ये वैशाली गृहउद्योग, बोरिवली, गोरेगांव कट्टा इ. ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्या काहीशा हटके उपक्रमांना शुभेच्छा!

उत्कृष्ट चविची ८५ वर्षे - के. टी. कुबल आणि कंपनी

महाराष्ट्रात अनेक धाडसी मराठी उद्योजकांनी उद्योग-व्यापार क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अनेक महाराष्ट्रीयन कंपन्या चांगल्या नावारुपाला आल्या आहेत. अशाच एका कंपनीने स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात उद्योगक्षेत्रात धाडसी पाऊल टाकले. ती कंपनी म्हणजे मसाला, लोणची, पापड उद्योगात आता नावारुपाल आलेली ७५ वर्षांपेक्षा जास्त यशस्वी परंपरा असलेली सिधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र कृष्णाजी तुकाराम कुबल यांची के.टी. कुबल आणि कंपनी.

सिधुदुर्गाने देशाला प्रत्येक क्षेत्रात नावारुपाला आलेली अनेक नररत्ने दिली. मग ते क्षेत्र राजकीय असो, सांस्कृतिक, सामाजिक, कला-क्रीडा असो नाही तर औद्योगिक असो. या जिल्ह्याची अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्वे सर्वच क्षेत्रात नावारुपाला आलेली आहेत. उद्योग क्षेत्रातील के.टी. कुबल हे त्यापैकी एक नाव. मूळ वेंगुर्ल्याचे असलेले के.टी. कुबल यांची के. टी. कुबल कंपनी म्हणजे लोणची मसाल्याच्या दुनियेतील विश्वसनीय नाव.

आजच्या धावपळीच्या जीवनात झणझणीत, चटकदार मसाले, लोणची, पापड तयार करणे गृहिणींना शक्य होत नाही. तेव्हा त्यांना दर्जेदार, झणझणीत, चटकदार अगदी घरगुती पद्धतीचे मसाले, लोणची, पापड पुरविणार्‍या एखाद्या कंपनीचा आधार घ्यावा लागतो आणि मग पहिला नंबर गृहिणीचा, दुसरा आमचा! असे ब्रीदवाक्य असलेली मसाले, लोणच्याच्या दुनियेतली विश्वसनीय के. टी. कुबल कंपनी चोखंदळ गृहिणींच्या सहजच डोळ्यासमोर येते.

सध्या ही कंपनी विजयराव कुबल म्हणजे कंपनीचे संस्थापक के. टी. कुबलांचे सुपूत्र चालवतात. के. टी. कुबल आणि कं. प्रा. लि. मसाल्याबरोबर लोणची, पापडही तयार करतात. ७९ वर्षे यशस्वी वाटचाल पूर्ण करणारा हा उद्योग आता लोणच्याप्रमाणे चांगलाच मुरलाय.

विजयराव कुबल यांच्या मुंबई सेंट्रल येथे असलेल्या मध्यवर्ती कार्यालयात गेल्यावर कार्यालयाला लागूनच मागच्या बाजूचा पत्र्याचे ड्रम तयार करण्याचा कारखाना पाहून कोणीही आश्चर्यचकीत होईल. खाद्यपदार्थ बनविणार्‍-या कंपनीच्या कार्यालयात हार्डवेअरचा कारखाना ?

परंतु इथूनच खरी के.टी.कुबल घराण्याची खरी कहाणी सुरु होते. विजयराव कुबल सांगतात, हा कारखाना म्हणजे माझ्या वडिलांची के.टीं.ची आठवण आहे. त्यांनी मसाले-लोणच्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. वडिलांची आठवण म्हणून आम्ही हा ड्रमचा व्यवसाय अजूनही चालू ठेवलाय, कारण तेच आमच्या सर्व धंद्याचे बीज आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे शेती व्यवसाय करीत असतानाच स्वतंत्र उद्योग-व्यवसाय करण्याची फार इच्छा होती. त्यांनी मुंबईला जाऊन सुरुवातीला एका गॅलव्हनायिज्ड बादली तयार करण्याच्या कारखान्यात नोकरी पत्करली. काही वर्षांनी थोडासा अनुभव गाठीला बांधून, स्वतःचा स्वतंत्र पत्र्याच्या बादल्या तयार करण्याचा कारखाना सुरु केला. त्यांना धंद्याचे उत्कृष्ट ज्ञान होते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यावेळी (१९२६ साली) हिदुस्थानात घोडा छाप बादल्या फार प्रसिद्ध होत्या. त्याला कॉम्पिटीशन म्हणून के.टी. कुबलांनी आपल्या गाय छाप ब्रँडच्या बादल्या बाजारात आणल्या आणि त्या अतिशय प्रसिद्ध झाल्या. त्यांना कन्याकुमारीपासून लाहोरपर्यंत प्रचंड मागणी होती. दुसर्‍-या महायुद्धाच्या काळात त्यांनी पत्र्याचे ड्रम बनवायला सुरुवात केली. त्यातून त्यांना मोठा नफा झाला आणि १९३५ साली त्यांनी मसाल्याचा व्यवसाय सुरु केला.

पूर्वी लोक मसाला, लोणची घरीच तयार करीत असत. म्हणावी तशी त्याला बाजारपेठही नव्हती. त्यावेळी के. टी. कुबल यांनी आपल्या मसाल्याची आणि लोणच्याची चव गृहिणींपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबईत स्वतःची दहा विक्री केंद्रे (दुकाने) सुरु केली आणि घराघरात के.टी. कुबल कंपनीची चव पोहोचवली. अथक परिश्रम, चिकाटी, तसेच धंद्याचे उत्कृष्ट ज्ञान असलेले के.टी. कुबल या धंद्यातही यशस्वी झाले. त्यानंतर त्यांची यशस्वी कारकीर्द त्यांचे सुपूत्र विजयराव कुबल सांभाळीत आहेत. १९६० साली पोतदार कॉलेजमध्ये बी.कॉम झाल्यानंतर विजयरावांनी व्यवसायात लक्ष घातले.

विजयरावांनी अथक परिश्रम आणि उत्कृष्ट व्यवस्थापनातून के.टी. कुबल कंपनीच्या यशात भर टाकली आहे. त्यांनाही अनेक चढउतारांशी सामना करावा लागला. १९८० मध्ये झालेल्या कामगारांच्या संपामध्ये त्यांना बराच त्रास झाला. कंपनी बंद करायची वेळ आली पण त्यांनी १०-१५ माणसं हाताशी ठेवून काम सुरु ठेवलं. वर्षभरानंतर गाडं परत रुळावर आलं. आपल्या वडिलांच्यानंतर या व्यवसायात टिकून राहण्यासाठी आणि तो वाढविण्यासाठी उच्च प्रतीचा माल देणे या पूर्वीपासूनच्या ध्येयाबरोबरच अत्याधुनिक उपकरणे,यंत्रणा, सुसज्ज प्रयोगशाळा, नवीन बाजारपेठ यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले .

विजयराव कुबलांना हा व्यवसाय अजून फार वाढवायचाय, त्यासाठी अजून त्यांनी देशातील स्थानिक बाजारपेठेबरोबरच मसाले, लोणची यांची युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई, मस्कत इत्यादी देशातून निर्यात सुरु केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत के. टी. कुबल कंपनी चांगलीच नावारुपाला आली आहे. देशांतर्गंतही त्यांना मार्केटिगचे जाळे पसरवायचे आहे. के.टी. कुबल कंपनीचा अत्याधुनिक मशिनरी व उपकरणांनी तसेच अनुभवी कर्मचार्‍-यांनी सज्ज असलेला कारखाना नव्या मुंबईतल्या सरकारच्या 'मॅफ्कोड यार्ड' मध्ये मसाले, लोणची यांची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करीत आहे. लालबाग येथील कारखान्यातही मसाले, पापड यांची जोरदार निर्मिती सुरु असते.

मसाला, लोणची, पापड हे अन्नपदार्थ झणझणीत, चटकदार असले तरीही ते नाजूक खाद्यपदार्थ आहेत. ते तयार करताना तितकीच काळजी घ्यावी लागते. उत्पादनांच्या निर्मितीवर विजयराव स्वतः जातीने लक्ष ठेवतात. क्वालिटी राखणार्‍-या कुबल कंपनीच्या उत्पादनांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. हल्ली स्त्रियांना वाटणे, कुटणे कठीण होऊ लागले आहे. तयार मसाल्यांना वाढती मागणी हे आजचं चित्र आहे. के.टी. कुबल कंपनीने १९३५ साली जरी मसाले बनवायला सुरुवात के ली असली तरी ख्र्‍ा-या अर्थाने १९५० सालापासून खप वाढला व अद्याप वाढतच आहे. यातच कंपनीचे यश लक्षात येते.

वैशिष्टपूर्ण मालवणी चवीची छाप असलेली के.टी. कुबल कंपनी मिरची पूड, हळद पूड, धणे पूड, जिरा पूड, काळी मिरी पूड इत्यादी मसाल्यांबरोबरच संडे मसाला, मिक्स मसाला, मटण-चिकन मसाला बिर्याणी, पाणीपुरी, पावभाजी, चना, चहा इत्यादी अनेक इस्टंट मसालेही बनवते. सारस्वत, सी.के.पी. दैवज्ञ या ज्ञातींना लागणा-या मसाल्याबरोबरच मालवणी मिक्स मसाला हे कुबल यांचे वैशिष्ठय आहे.

मसाल्यांची चव आणि प्रत कायम राखण्यासाठी घेतल्या जाणा-या विशेष काळजीबाबत बोलताना म्हणाले, मसाल्यांची चव कायम ठेवणे म्हणजे कसरतच असते. त्यासाठी लागणारा कच्चा माल मुंबईत खरेदी केला जातो तर लोणच्यासाठी कैरी वलसाड (गुजरात)हून मागविली जाते. मसाल्यात व लोणच्यात वापरली जाणारी प्रत्येक वस्तू चांगल्या प्रकारची व उच्च दर्जाची असली पाहिजे असा विजयराव कुबल यांचा आग्रह असतो. कुबलांची आंबा, लिबू, मिरची, मिक्स इत्यादी लोणची नावारुपाला आली आहेत. ती ग्राहकांची चव सांभाळत आहेत. जोडीला चवदार डिशेससाठी विविध मसाले आहेतच. कुबलांच्या पापडांना तर इतकी मागणी आहे की मार्केटमध्ये त्यांची कमतरता भासते, मसाले, लोणची, पापड याबरोबरच मालवणी कोकम सोले, तसेच आंंबा पावडर (आमचूर) व कोकम सरबतही कुबल कंपनीने बाजारात आणले आहे.

नव्या खुल्या आर्थिक व उद्योग धोरणाचे आव्हान स्वीकारुन विजयराव कुबल आधुनिक संशोधनातून उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या निर्मितीकडे भर देत आहेत. आता तर पॅकिग सुधारुन मसाले कसे टिकविले जातील यातही कुबल एक पाऊल पुढे टाकताहेत म्हणून स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कुबल यांचे नाव झळकतेय.

उद्योग व्यवसाय म्हटला की, अडचणी या नेहमी येतातच. चढउतारांच्या या चक्रातून विजयरावही सुटले नाहीत. दंगलीच्या काळात कुबलांचा कारखाना कामगारांअभावी तीन महिने बंद होता. त्यात त्यांना १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले. एकेकदा तर मिरचीचे भाव १०० रु. च्या वर वाढतात, परंतु मसाल्यात उच्च प्रतीची मिरची वापरुन ग्राहकांना रास्त भावात ते दिले जातात. नुकसानीची पर्वा न करता विजयराव कुबल आपल्या कंपनीचा दर्जा टिकविण्याच्या प्रयत्नात असतात.

मसाले, लोणची, पापड ही आता भारतीय कुटुंबाची अन्नपदार्थातील प्राथमिक गरज झालेली आहे. शेतीमालावर आधारित या उद्योगाला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बाजारपेठेत उच्च परंपरा असलेल्या या भारतीय उद्योगाला टिकून राहण्यासाठी ऑक्ट्राॅय, सेल्स टॅक्स सारख्या करातून तरी सूट हवी असे विजयराव कुबल यांचे आग्रही मत आहे.

सध्या विजयरावांसमोर मार्केटिग आणि चांगल्या विश्वासू माणसांची कमतरता ही आव्हाने आहेत. त्यांच्या मते बेरोजगारी ही मानसिक आहे. मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असणा-याला काम कुठेही मिळतेच, आम्ही तर प्राधान्याने मराठी आणि कोकणातल्या माणसांना पसंती देतो.

सामाजिक कार्याविषयी विचारल असता मुंबई आणि परिसरातील जेष्ठ नागरीक संस्था घेत असलेल्या कार्यक्रमांना आमची नेहमीच मदत असते. सामाजिक काम कोण करतय यापेक्षा त्याचा उद्देश आणि समाजातील घटकांना होणारा फायदा बघून आम्ही मदत करतो. पण या हाताची त्या हाताला कळत नाही. सतत ७५ वर्षे चवीची परंपरा कायम राखणार्‍-या के.टी. कुबल या महाराष्ट्रीयन कंपनीची घोडदौड विजयराव कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली आज यशस्वीपणे सुरु आहे.विजयराव आपल्या यशाचे मोठेपण स्वतःकडे न घेता ते म्हणतात, आज आम्ही जे आहोत ते वडील कृष्णाजी तुकाराम कुबल यांच्यामुळेच. व्यवसाय वाढीचे श्रेय ते चोखंदळ गृहिणींना देतात. ते म्हणतात,जर मसाला तयार करण्यात कोणी दोन नंबर ठेवले तर पहिला नंबर गृहिणींचा, दुसरा आमचा. कारण, कुबल उत्पादनांना घरचीच चव आहे म्हणूनच आजही घरोघरी के.टी. कुबल हे नाव चवीने, विश्वासाने घेतले जाते.

पाउले चालती

अनेक भाषा ह्या अनेक गुरु असल्यासारख्या आहेत. गुरुंमुळे ज्ञान वाढते व इतर भाषा अवगत असल्या की, धंदा - व्यवसाय वाढतो. त्या त्या भागांत जावून व्यवसाय वाढविता येतो.

रेडीच्या जारमाव प्रसाद प्रॉडक्सचे निर्माते डॉ. रविद्र भगत सांगत होते, ‘‘स्वतः हिदी, मराठी, कोकणी, कन्नड, गुजराती, मल्ल्याळम यांचे ज्ञान असल्याने त्या त्या लोकांत प्रॉडक्टचा प्रचार करता आला.‘‘ व्यवसायवाढीच्या दृष्टीने ही गरजेची गोष्ट आहे.

डॉ. रविद्र संस्कृतचे विद्यार्थी, आयुर्वेद पदवी परीक्षा त्यांनी संस्कृतमध्ये दिली. संस्कृत चांगले येत असल्याने आयुर्वेद औषध निर्मितीत निरनिराळे ग्रंथ अवलोकन करण्याची त्यांची क्षमता चांगली आहे. वडील कै. घनःशाम हे वैद्य होते. रानांत जावून औषधी व वनस्पती शोधणे व आलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान करुन त्यानुसार योग्य अशी औषध निर्मिती करणे हा त्यांचा आवडीचा व्यासंग होता. त्या व्यासंगाचा वारसा डॉ. रविद्र यांनी उचलला. आज त्यांच्याबरोबर त्यांचे मुलगे वासुदेव आणि सिद्धेश त्यांच्या या कार्यात हातभार लावत आहेत. उत्कृष्ट, शास्त्रशुद्ध, ग्रंथोक्त औषधनिर्मिती करण्याची वडिलांची परंपरा नातवांपर्यंत तशीच चालू आहे.

१९७५ च्या दरम्यान दवाखाना जोरात चालला असता वैद्य वडील घनःशाम भगत म्हणाले, ‘माझ्या मागून माझी औषधे फुकट जाणार.वडिलांची औषध निर्मितीसाठी होणारी धावपळ व त्यांची औषधनिर्मितीची ओढ पाहून व जनतेच्या आरोग्य रक्षणांत खरोखरच मदत करणारी, रोग दूर करणारी अत्यंत गुणकारी औषधे याचा अनुभव स्वतः डॉ.रविद्र व त्यांच्या डॉ.मित्रांनी घेतला होता. त्यावरुन वडिलांच्या कळकळीच्या विधानाला डॉ. रविद्रनी उत्तर दिले की, ‘मग मूर्त स्वरुपांत तुमची औषधे मिळण्यासाठी रीतसर सरकारमान्य आयुर्वेद औषध निर्मिती करुया, मग तुमची औषधे फुकट जाणार नाहीत.डॉ. रविद्र यांनी वडिलांना सांगितलेले अत्यंत परिश्रमपूर्वक खरे करुन दाखविले!

डॉ. रविद्र याची निर्णय क्षमता दांडगी. कुठल्याही समस्येचा अभ्यास करुन त्यांवर सखोल विचार करुन तोडगे काढणे डॉ. भगत यांना आवडते. घेतलेला निर्णय राबविण्यांत ते इतरांनाही मार्गदर्शन करुन जनतेच्या आरोग्य हितासाठी तो निर्णय राबवितात. सुरुवातीच्या काळात डॉ.रविद्र व त्यांचे वडिल वैद्य घनःशाम पुंडलिक भगत यांना कारखान्याचा व्याप थोडासा त्रासदायक ठरला. त्याचे महत्त्वाचे कारण, औषधनिर्मिती सोपी व ज्ञानपूर्ण होती. पण मार्केटिग कसे करावे याचे ज्ञान नव्हते. मग मित्र श्री. चंद्रकांत केदार यांच्या सहकार्याने त्यांनी चांगली माणसे विक्री करीता नेमली. डॉ.रविद्रंनी स्वतः कॉमर्स विषयाचा अभ्यास केला. त्यांतून त्यांना धंदा वाढविण्याचे आणि मार्केटिगचे तंत्र मिळत गेले. वाचनाचा व्यासंग, डॉक्टर्सशी संफ, इतरांशी चर्चा करणे व स्वतः औषधनिर्मितीची पराकाष्ठा करुन डॉ. रविद्रनी त्यांच्या देवांच्या आद्याक्षराचे नाव दिले. जागबाई, रवळनाथ, माऊली, वस ह्या चार आद्यक्षरांनी जारमावझाले व भावना धरली की, मी औषधे देईन ती ह्या देवतांचा प्रसाद असेल म्हणजे त्यांना गुणवत्ता असेल व आजतागायत ती गुणवत्ता त्यांनी जोपासली आहे.

औषध निर्मितीचा उद्देशच आपल्याला माहिती असलेली औषधे जनतेसाठीनिर्माण करणे व ती लोकांना पुरविणे. याचे सर्व डॉ. रविद्र जनतेलाच देतात. त्यांनी या जाहिरातीत म्हटले आहे, ‘लोक रत्नपारखी आहेत म्हणून आमची उत्पादने चालतात.

डॉक्टर मित्र गायकवाड, डॉ.सरीता कांबळी, डॉ. विवेक रेडकर, डॉ. सुविनय दामले, श्री.शशी रेडकर आदी वैद्यकीय व आयुर्वेद क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन - सल्ले व चर्चासत्रे त्यांना फारच उपयोगी ठरले.

डॉ. रविद्र यांनी आज वयाच्या ६६व्या वर्षी तीच जिद्द धरुन औषधे निर्मिती चालविली आहे. महाराष्ट्रातील एका कोप-यात असलेल्या रेडी सारख्या गावांत त्यांनी हा आयुर्वेद औषधी निर्मितीचा कारखाना यशस्वीरित्या चालविला आहे. महाराष्ट्र सरकारचा लघु उद्योगांतील उल्लेखनीय लघु उद्योजक म्हणून १९९१ साली प्रथम पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. लोकांना सेवा देण्यास व तत्पर ऑर्डस पुरविण्यात जारमाव आज अग्रस्थानी आहे.

या वाटचालीत आपले गुरु कै. श्री. भावे, वडील वैद्य कै. घनःशाम भगत, वैद्या आई वत्सला व घरातील कुटुंबिय यांच्या सहकार्याने, मित्रमंडळींच्या पाठिब्याने, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळाले असे डॉ. रविद्र भगत कृतज्ञतापूर्वक म्हणतात.

सरकारची बदलती धोरणे, जागतिक दर्जाची औषध निर्मिती हे सगळे बदल व्यवसायीकांनी पचविलेपाहिजेत. जीवनात चढ-उतार असतातच. पण शेवटी उद्दिष्ट गाठायचे असेल तर ही वाट करावी लागतेच. फक्त तोंडाने म्हणायचे पाऊले चालती...पंढरीची वाट!

मुलाखतकार - श्री. दत्ताराम पांडजी,

सौ. पद्मश्री पांडजी (डॉ. रविंद्र यांची कन्या)

आंबा कॅनिग व हॉटेल दुर्वांकूरचे जनक श्री. बंडोपंत केळकर

माणसानं सहजपणे आणि मनापासून नम्र असावं. देह चांगल्या कार्यासाठी कष्टवावा. हा आईवडिलांचा संस्काररुपी वारसा विनायक उर्फ बंडोपंत केळकरांना मिळाला आणि त्याच भांडवलावर आज ते यशस्वी उद्योजक म्हणून मान्यता पावले आहेत.

आजोबा गोविदराव (दादा), वडील सदाशिवराव (तात्या) व आई श्रीमती उमाबाई अशी पिढीजात व्यावसायिक संपन्नता असलेल्या केळकर घराण्यात २७ सप्टेंबर १९४२ रोजी मालगुंड येथे विनायकरावांचा जन्म झाला. ज्येष्ठ कवी केशवसुतांची ती जन्मभूमी आणि निसर्गसंपन्न जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे जवळचं मालगुंड हे छोटंसं गावं. म्हणूनच त्यांची देवावर नितांत श्रद्धा.

बंडोपंतांचे आजोबा, काका आणि वडील यांचा किराणा मालाचा प्रस्थापित व्यवसाय ६०-७० वर्षे व्यवस्थित चालला होता. परंतु कोणाची दृष्ट लागली न कळे! परंतु १९५० सालापासून या एकत्र कुटुंबात भाऊबंदकीचे विष कालवले गेले. घरात सदैव वादावादी, भांडणं यांमुळे घरपणच नाहीसं झाले. विनायक तसे वयाने लहानच पण भावंडांत मोठे. त्यांना समजू लागल्यावर वाटायचं, एकाएकी या सर्वांनाचं काय झालं? त्या बालवयातच त्यांनी निर्धार केला की, भावांमध्ये मी मोठा आहे. मोठा झाल्यावर सर्व भावांना एकत्रच ठेवीन. आज त्यांचा हा निर्धार पूर्णत्वास गेला आहे. १५-१६ जणांच्या एकत्र कुटुंबासहित सदाशिव संकुलया प्रशस्त बंगल्यामध्ये हे एकत्र कुटुंब रहात आहे आणि केळकर उद्योग समूहाची कुटुंबातील सर्वांच्या सहकार्यानं प्रगतीची घोडदौड सुरु आहे.

मॅट्रीकपर्यंत शिक्षण झाल्यानंतर बंडोपंतांना कौटुंबिक जबाबदारीमुळे व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेचे होते. शालेय शिक्षणाची विशेष आवड नव्हती. प्रयत्नांच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या शाळेत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. काही होकारात्मक निश्चय त्यामागे होता. कितीही कष्ट करण्याची तयारी होती. बाजारपेठेमध्ये केळकरआडनावाला प्रामाणिकपणा आणि सचोटी या गुणांची कोंदणं होती. त्यामुळे केळकर कुटुंबाचा दबदबा होता, विश्वास होता. याच भांडवलाच्या बळावर बंडोपंतांच्या वडिलांनी आपले मोठे बंधू शंकरराव यांच्या आशीर्वादाने व त्यांच्याच हस्ते नवीन किराणा दुकान सुरु केले.

वडील व मामा किराणा दुकान पाहू लागले आणि बंडोपंत दुकानात काम करतानाच सवड मिळेल त्याप्रमाणे छोटेछोटे उद्योग करु लागले. सुरुवातीलाच त्यांनी गुरांची हाडे विकण्याचा व्यवसाय केला आणि समाजाचा रोषही पत्करला, परंतु त्या व्यवसायात बंडोपंतांना ब-यापैकी पैसे मिळाले. त्यावेळी होणा-या सामाजिक टीकेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं हीच त्यांच्या उद्योजकतेती यशस्वी पायरी ठरली. नंतर लाकूड, चिरे, बांबू यांची खरेदी-विक्री आणि प्रसंगी बैलगाडी हाकूनही पैसा मिळवला. छोटीछोटी घरं बांधण्याचा व्यवसाय केला. मुंबईतील बंडोपंतांच्या वडिलांचे एक मित्र श्री.अनंतराव परुळेकर (बापू) यांनी खूप आर्थिक मदत केली. शिवाय व्यावसायिक मार्गदर्शनही दिलं. त्यामुळे आजही बंडोपंतांच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त प्रेम आहे.

संसार दुःखमय आहे हे खरं पण उगीच त्याविषयी कल्पना करीत राहणं मात्र सोडून द्यावे. हा समर्थ रामदासांचा उपदेश बंडोपंतांनी अंगिकारला! कधी उगीच बढाया मारल्या नाहीत किवा खोटी वचनं दिली नाहीत. अंथरुण पाहून पाय पसरले. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक कृतीत त्यांना यश मिळालं.

हापूस आंबा हे कोकणचं खास वैशिष्ट्य. हा आंबा इतर जातींपेक्षा अधिक टिकाऊ आहे. त्याचा गडद केशरी रंग, त्याचा स्वाद तसंच त्याची आंबटगोड चव, त्यामध्ये असणारे फायबर्स, प्रोटीन्स, आम्ल इत्यादी पोषणमूल्यं जास्त. हापूस आंब्याची बागायत केवळ रत्नागिरी आणि सिधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येच एकवटलेली दिसते. यामध्ये बंडोपंतांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याचं ठरविले. जन्मभूमी असलेलं मालगुंड हेच कर्मभूमी करण्याचं निश्चित केलं. कौटुंबिक वाटण्यांमध्ये ३०० कलमं आली होती. त्याशिवाय एक बाग ८० हजार रुपये किमतीत १ वर्षाच्या करारानं आंबे काढण्यासाठी घेतली. त्यात २५ हजार रुपये फायदा झाला. त्याबरोबरच व्यवसायाची सर्व सूत्रं बंडोपंतांना कळली. ते साल होते १९७५.

त्यानंतर कोकण कृषी विद्यापिठाच्या बागा, गुहागर-चिपळूण परिसरातील बागा अशाच वर्षाच्या कराराने घेतल्या. कष्टांमागून आत्मविश्वास- आत्मविश्वासामागून यश आणि यशामागून पैसा हे प्रस्थापित सूत्र बंडोपंतांना चांगल्यापैकी जमू लागलं. आज स्वतःच्या ८-१० बागा मिळून ३-४ हजार आंब्याची कलमे आहेत. या सर्व बागा त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कठोर परिश्रमांतून निर्माण झाल्या आहेत. बंडोपंतांचे भाऊ, मुलगे, पुतणे आज व्यवसायात तेवढ्याच तन्मयतेनं काम करीत आहेत.

खादी-ग्रामोद्योग बोर्डानं फळप्रक्रिया क्षेत्रासाठी दरमहा ४० रुपये विद्यावेतन देऊन फळप्रक्रिया अभ्यासक्रम सुरु केला होता. बंडोपंत त्या अभ्यासक्रमास दाखल झाले. त्यांच्या मनाला नवीन चालना मिळाली. त्यातून आंबा कॅनिगच्या व्यवसायाची स्फूर्ती मिळाली. घरी लहान प्रमाणात कोकम सरबत, कोकम जेली, काजू सरबत, आंबा पोळी, फणस पोळी इत्यादी वस्तूंची निर्मिती आणि विक्री चालू होती. खात्रीचा माल आणि चोख व्यवहार यामुळे त्यांच्या नावाला प्रतिष्ठा आणि विश्वास प्राप्त झाला होता. याच जोरावर आंबा कॅनिगची यंत्रसामुग्री आणून कारखाना सुरु केला. यामध्ये त्यांचे मित्र प्रभाकर मेहेंदळे यांचं उत्तम प्रकारे सहकार्य लाभलं. मोटरसायकलवरुन सर्व जिल्ह्यांतच नव्हे तर गोवा, बेळगावपर्यंतही कामाकरिता अनेक वेळा प्रवास करावा लागला. प्रत्यक्ष कॅनिगच्या कामामध्येही त्यांचा सहभाग महत्वाचा होता. याच काळात श्री. सुर्वे काका व अशोक ओक यांचं सहकार्य महत्वाचं मानावं लागेल. सौ. प्रभा वहिनींचा सहभाग महत्वाचा होता. १९७६ मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाकडून ३५ हजार रुपये कर्ज घेऊन कॅनिग प्रक्रियेची माहिती आणि घरचाच आंबा असल्यामुळे रसांचे ५००० डबे तयार केले. कुठेही भेसळ नाही. प्रिझर्व्हेटीव्ह नाही. त्यामुळे रसाची गोडी आणि रंग नैसर्गिक राहिला. त्यामुळे डब्यांची मागणी वाढू लागली. दुस-या वर्षी १० हजार डबे तयार केले. २ रुपये भाव जास्त असूनही मागणी वाढत होती. ही वाढती मागणी लक्षात घेऊन २०-२५ हजार डब्यांची निर्मिती झाली. माल वितरणाची व्यवस्था होणं गरजेचं होतं. त्यांनी नाशिक ते नागपूर हा सर्व प्रदेश अक्षरशः पिजून काढला. ज्यूस सेंटरवाल्यांना रसाची चव दाखवली. नवीन व्यावसायिकांशी ओळखी झाल्या. सर्व माल विकला. त्या वेळचे ग्राहक आज २८ वर्षांनंतरही कायम टिकून आहेत. २८ वर्षांच्या कालावधीत बंडोपंतांनी कॅनिगच्या क्षेत्रात प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, धुळे, नंदुरबार यांसह गुजरात, कर्नाटक, गोवा राज्यांतही त्यांचा माल जातो. या व्यवसायात बंधू अशोक आणि विनोद हेही समर्थपणे लक्ष देत आहेत.

१९९४ साली मे. केळकर ट्रेडर्सही संस्था बंडोपंतांच्या पत्नी सौ. सविता केळकर यांच्या नावानं सुरु केली. या कंपनीकडेच नर्मदा सिमेंटची एजन्सी आहे. मालगुंड-गणपतीपुळे परिसरातील लोकांना जवळच्या जवळ सिमेंट उपलब्ध करुन देणं आणि नर्मदा सिमेंट सारख्या स्वदेशी उत्पादनाला एक भक्कम पाठिबा ही दोन्ही उद्दिष्टं या एजन्सीनं साध्य केली.

श्री. अरविद केळकर हे पुणे येथे कॅनरा बँकेत अधिकारी म्हणून काम करीत असतानाच पुणे येथील मेसर्स स. गो. केळकर सेल्स कॉर्पोरेशनया भागिदारी संस्थेचं काम पाहत असत. नंतरच्या काळात स्वेच्छानिवृत्ती घेऊन या संस्थेची पूर्ण जबाबदारी त्यांनी पेलली आहे. या भागिदारी संस्थेतर्फे किराणा सामान व कोकणी मेव्याचे विक्रीकेंद्र असे दोन्ही उपक्रम चालू आहेत. कोकणातील बायका जी दर्जेदार उत्पादनं बनवीत त्यांना शहरात बाजारपेठ मिळावी या दृष्टीनं आयडीयल कॉलनी, कोथरुड पुणे येथे वरील संस्था स्थापन केली.

१९७८ साली महाराष्ट्र सरकारने पर्यटन विषयक धोरण जाहीर केलं आणि कोकणातील पर्यटन व्यवसायानं उभारी धरली. पर्यटनहा एक प्रमुख व्यवसाय कोकणात आकाराला येवू लागला.

गणपतीपुळे हे लक्षावधी गणेशभक्तांचे भक्तिस्थान आणि आराध्य दैवत. रत्नागिरीपासून ५० कि.मी. व किना-यानं ३५ कि.मी. अंतरावर हे गाव समुद्राकाठी वसलेलं आहे. पर्यटनाच्या हंगामात रोजचे २००० ते २५०० पर्यटक गणपतीपुळे येथे वस्तीला असतात. साहजिकच पर्यटनाशी संबंधित अनेक सोयीसुविधा व आकर्षण केंद्र निर्माण होऊ लागली. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून तर कोकणातील पर्यटन व्यवसाय अधिकच तेजीला आला.

बंडोपंतांचे द्रष्टेपण जागे झाले. सर्व भावंडांची बैठक घेतली. त्यांच्यापुढे पर्याय मांडला की, आपल्या कुटुंबातील पुढील पिढीमध्ये सातजण आहेत. त्यांनी नोकरी करता कामा नये. असं जर सर्वांच एकमत असेल तर आपला हा आजचा व्यवसाय सांभाळून ह्या तरुण पिढीच्या बुद्धिमत्तेला आणि कर्तृत्वाला वाव मिळेल असे नवे उद्योग उभारणं आवश्यक आहे. नवीन उद्योग म्हटला म्हणजे धोका आला. पण एकदा आलेली संधी पुन्हा दुस-यांदा दार ठोठावित नाही. येणारी दुसरी संधी चांगली किवा वाईट असू शकेत, पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं.या गोष्टीला अत्यंत महत्व आहे.

बंडोपंतांचं म्हणणं सर्वांना पटलं. त्यातून आकाराला आलं हॉटेल दुर्वांकुर, शिवनंदन रेस्टॉरंट आणि सुपर मार्केटजवळजवळ दीड-दोन कोटींचा प्रकल्प. त्यावर लिहायचं तर एक स्वतंत्र लेख होईल.

बंडोपंत केळकरांच्या व्यावसायीक जीवनात अनेक संकटे आली. पण नकारात्मक विचाराला जराही थारा न देता नविन उमेद धरुन ते आणि त्यांचे कुटुंबिय सदैव यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत आहेत. हॉटेल दुर्वांकूर, शिवनंदन रेस्टॉरंट, सुपर मार्केट हा प्रकल्प गणपतीपुळे येथे देवस्थानपासून ५ मिनिटाच्या अंतरावर साकारला आहे. शिवनंदन रेस्टॉरंट हे पूर्णतः शाकाहारी आहे. हॉटेल दुर्वांकूर मध्ये साध्या रुम पासून ते वातानुकुलीत डिलक्स रुमही आहेत. सुपर मार्केटमध्ये कोकणातील सर्व पारंपारीक वस्तू, कोकणचा मेवा, किराणा माल मिळतो. बंडोपंत, अरविद, अशोक, विनोद हे चारही भाऊ सपत्नीक या प्रकल्पामध्ये लक्ष घालत आहेत.

केळकर कॅनिग व हॉटेल दुर्वांकूर

मालगुंड, गणपतीपुळे, जिल्हा - रत्नागिरी ४१५६१५

दूरध्वनी (०२३५७) २३५२२७, २३५१२७.

दमदार तपपूर्ती - श्री इंडस्ट्रीज इचलकरंजी

अन्न आणि फळप्रक्रिया या उद्योगात केवळ मनुष्यबळच नाही तर उत्तम दर्जाच्या मशिनरीचीही आवश्यकता असते ही गरज ओळखून इचलकरंजी येथील श्री गणेशप्रसाद भांबे यांनी या क्षेत्राला आवश्यक असणार्‍या मशिन्सचं दर्जेदार उत्पादन करुन या क्षेत्रात यशाची गरुडझेप घेतली आहे. श्री इंडस्ट्रीजची स्थापना १९९७ साली झाली. सुरुवातीला गणेशप्रसाद भांबेनी डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिग पूर्ण केल्यानंतर २ वर्षे अनुभवासाठी खाजगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण करायचा होता. पण कोर्स आणि नोकरीची वेळ याचे गणित जमेना. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याचवेळी मनात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे विचार घोळत होते. या व्यवसायाच्या सुरवातीची प्रेरणा मिळाली, ती आई श्रीमती सुरेखा यांच्याकडून डिकाचे लाडू बनवित असताना सुके खोबरे किसण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासायची. त्याकरिता मशीन बनविता येईल का ? असे आईने सुचविले. तेव्हा सुके खोबरे किसण्याचे मशीन प्रोजेक्ट म्हणून बनविले. तेव्हा असं लक्षात आलं की, अन्न व फळप्रक्रिया मशिनरी बनविणारे उत्पादक खूपच कमी आहेत. तेव्हा व्यवसायाला सुरवात करताना अशाच प्रकारच्या मशिनरीचे उत्पादन करायचे असे ठरले.

सर्वप्रथम बटाटा वेफर्स तयार करण्याचे मशीन बनवायला घेतले. मशीन बनवताना बाजारामध्ये उपलब्ध असणा-या मशीन्समधील कमतरता लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करुन त्या दूर करुन नवीन प्रकारचे मशीन बनविले. मशीनचे सर्व स्पेअर पार्टस् दुस-या कारखान्यातून बनवून घेतले.त्यांची जोडणी बहिण स्वातीच्या मदतीने घरीच केली. त्याची विक्री इचलकरंजीमधीलच एका ग्राहकाला केली. पण पहिल्याच विक्रीमध्ये ५० टक्के रक्कम ग्राहकाने बुडविली. यातली जमेची बाजू म्हणजे या वेगळया प्रकारच्या मशीनला दै. सकाळ मधून चांगली प्रसिद्धी मिळाल्याने ग्राहकांकडून चौकशी होऊ लागली.

दरम्यानच्या काळात वडीलांना अपघात झाल्याने पुन्हा नोकरी करावी की व्यवसाय हा प्रश्न उभा राहिला. यावेळी आईने आहे हाच व्यवसाय सुरु ठेव असे सांगून धीर दिला. उद्योगाला घरातील पाठिब्यावरच भांडवलाची कमतरता असतानाही श्री इंडस्ट्रीजची वाटचाल पुन्हा जोमाने सुरु झाली. आर्थिक समस्या असल्याने व्यवसायच असा निवडला की ग्राहक ५० टक्के रक्कम अॅडव्हान्स देईल आणि मशीन मागणीप्रमाणे बनवायचे असे धोरण ठेवल्याने आर्थिक भांडवलाचा प्रश्न तात्पुरता सुटला होता. दरम्यानच्या काळात फरसाण बनविणे, पापड मशीन, पाणी तापविण्याचा बंब या प्रकारच्या मशीन्सची मागणी ग्राहकांकडून होऊ लागली. म्हणून याही प्रकारच्या मशीन्स बनवायला सुरुवात केली. अल्पावधीतच १० प्रकारच्या मशीन्स बनविल्या. परंतु स्वतःचा कारखाना उभा करणे व तो चालविण्याचा किमान खर्च पूर्ण होईल इतक्या विक्रिची खात्री नसल्याने कामाचे आऊटसोर्सिग म्हणजेच काम बाहेरुन करुन घेणे चालू ठेवले.

नंतरच्या टप्यात पुणे, नाशिक, नगर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील मशीनरी विक्रेत्यांशी संफ साधून त्यांना मशीन्स पुरवायला सुरवात केली. यामध्ये अस लक्षात आल की मशीनची किमत ही श्री इंडस्ट्रीजमध्ये जास्त आणि विक्रेत्यांकडे कमी. कारण मशीन विक्रेते कंपनीकडून जास्त मशीन्स खरेदी करीत असल्यामुळे त्यांना डिस्कांउंट जास्त द्यावा लागायचा. मशीन विक्रेते कमी नफा ठेऊन मशीन्स विकत असल्याने ग्राहकांना किमतीची तफावत जाणवायची हा प्रकार लक्षात आल्यावर विक्रेत्यांशी असलेला व्यवहार बंद करुन पुणे, नाशिक उथे भरणा-या कृषी प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन ग्राहकांना थेट विक्रीसाठी सर्व मशीन्स उपलब्ध करुन दिली. पण या प्रदर्शनामधील स्टॉल्सच भाड जास्त असल्यामुळे दुस-या क्षेत्रातील मशीन उत्पादकाला सोबत घेऊन प्रदर्शनात भाग घेतला यामुळे थेट ग्राहकांशी विक्री वाढली.

नवनिर्मितीचा प्रयत्न - आवळा किसण्याचे मशीन - कृषी प्रदर्शनामध्ये आवळा उत्पादक शेतकरी गणेश लक्ष्मणराव मात्रे यांनी आमची भेट घेवून १२० एकर जागेतील आवळा उत्पादनासाठी प्रक्रिया मशीन्स बनवा असा आग्रह धरला. प्रायोगिक तत्वावर प्रथम आवळा किसण्याचे मशीन बनविले व ते यशस्वीही झाले. विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश या भागात भरपूर मशीन्सची विक्री झाली. त्यानंतर आवळा प्रक्रियेत आवश्यक असणारे आवळा फोडण्याचे मशीन, आवळा पंचीग मशीन अशी आवळा प्रक्रियेतील पूर्ण रेंज बनविण्यात श्री इंडस्ट्री यशस्वी झाली. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता तासाला एक हजार किलो आवळे किसण्याचे मशीनही २ वर्षापूर्वी बनविण्यात आले. सर्व प्रकारची आवळा मशीन्सची आंध्रप्रदेश, तामिळनाडू महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा इ. राज्यात विक्री झाली आहे.

फणस गरा कटिग मशीन - कोकणात मोठ्या प्रमाणावर घराघरातून फणसाचे चिप्स बनविण्याचा व्यवसाय चालतो. वेंगुर्ल्यातील उद्योजिका सौ. शुभदा मराठे यांच्या मागणीनुसार काप्या फणसापासून बनणा-या फणस ग-यांकरिता कटिग मशीन प्रायोगिक तत्वावर बनविले. पुढीलवर्षी काही सुधारणा करुन या मशीनचा यशस्वीपणे वापर होऊ लागला. एकाच आकारात, समान जाडीचे, लांबीचे गरे ग्राहकांना मिळत असल्याने ग्राहकही खूष होता. वेळेची बचत आणि अकुशल कामगारही गरा कटिग मशीन चालवू शकत असल्याने मशीन्स कोकण, गोवा, कारवार, इथे चांगली विकली गेली, आजही जात आहेत.

स्वतःच्या कारखान्याची उभारणी -

२००६ पासून मशीनरीच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने आणि स्थानिक कारखानदारांकडून वेळेत पार्ट बनवून देणे मुश्कील झाल्याने स्वतःचा कारखाना सुरु करण्याची गरज भासू लागली. यावेळीही भांडवलाची कमतरता जाणवल्याने सुरवातीला कारखाना भाड्याने घेतला. सहा महिन्यांमध्येच वाढणारा व्यवसाय बघून जागा मालकाने भाडे वाढवा अगर कारखाना सोडा असा तगादा लावला. त्यावेळी दुस-यांच्या जागेत स्वतःची शेड उभी करुन कारखाना चालू ठेवला. दीड वर्षामध्ये स्वतःच्या कारखान्यासाठी १२०० स्क्वे. फुटांची जागा घेतली. ही जागा घेत असतानाच बँकेच्या मॅनेजर्सनी तयार बांधकामाला कर्ज देता येत नाही अशी तांत्रिक सबब पुढे केली. पण इचलकरंजीतील सेंट्रल बॅकेचे श्री. स्वामी यांनी एका प्रामाणिक मराठी उद्योजकावर विश्वास ठेवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेवून कर्ज मंजूर केले. त्यामुळे स्वतःचा कारखाना उभारण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. आणि अल्पावधीतच कर्ज फेडता आले.

परदेशात मशीनची निर्यात - २००९ साली श्री इंडस्ट्रीजमध्ये तयार होणा-या मशीन्सकरिता अभिनव मशीन्स हा ब्रँड तयार केला. कृषी प्रदर्शनामधला ग्राहकांमध्ये तोच तोच पणा आल्यावर प्रदर्शनांमधला सहभाग कमी करुन अन्न व फळप्रक्रिये संदर्भातील मासिके, कृषी क्षेत्रातली आघाडीची मासिके यामध्ये जाहिरात सुरु केली. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला २००९ मध्येच ध्र्ध्र्ध्र्.ठ्ठथ्र्थ्ठ्ठथ्र्ठ्ठडण्त्दड्ढद्म.डदृथ्र् ही स्वतंत्र वेबसाईट ही सुरु केली. त्यामुळे परदेशात मशीन देणे शक्य झाले. आफ्रिकेच्या घाना रिपब्लीकमध्ये काजू, बोंडूच्या फळांचा रस काढण्याची २० मशिन्स निर्यात केली.

या सर्व गोष्टी करताना निर्यातीचे लायसन्स मिळविणे ग्राहकांशी पत्रव्यवहार ठेवणे, जनसंफ ठेवणे यामध्ये वडीलांची मोलाची मदत असे. आजची श्री इंडस्ट्रीजची झालेली प्रगती पहायला दुर्दैवाने आज ते हयात नाहीत ही सल कायमस्वरुपी मनात राहिल. उद्योगाच्या सुरवातीला कठिण प्रसंगी आईने दिलेले प्रोत्साहन, घरातील सर्वांचा पाठिबा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री इंडस्ट्रीने ठेवलेला सचोटीचा व्यवहार यामुळे झालेली प्रगती सावकाश पण शाश्वत आहे असं गणेशप्रसाद आवर्जून सांगतात.

मराठी उद्योजक आणि इतर उद्योजक यामध्ये फरक जाणवतो का ? अस विचारल्यावर गणेशप्रसाद सांगतात मराठी उद्योजकांना आर्थिक पाठबळ कमी असत. नोकरीची मानसिकता असल्याने सभोवतालचं वातावरण पोषक नसतं. राष्ट्रीयकृत बँकांची बहुतांश धोरणे ही नवउद्योजकांना उमेद करणारी असतात. आज बँकामध्ये सुमारे ९० ठेवी या मराठी नोकरदार माणसाने ठेवलेल्या असतात. पण मराठी उद्योजकाला कर्ज देताना मात्र बँका आपला हात आखडता घेतात. दुर्दैवाने असं करणारे बँकांचे अधिकारी हे मराठीच असतात. हा स्वानुभव आहे. पेपरवर्कमध्ये आपली माणस कमी पडतात. हे कबूल आहे पण आवश्यक पेपरवर्क पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करायला जिल्हा उद्योग केंद्र किवा तत्सम सरकारी यंत्रणेतले अधिकारी अजिबात उत्सुक असत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हे टाळण्यासाठी उद्योजकानेच प्रचंड मेहनतीची तयारी, पाठपुरावा या गोष्टींचा आळस करुन चालणार नाही.

श्री इंडस्ट्रीजच्या उद्योगातून एक प्रकारच सामाजिक कार्यच घडते. अनेक लघु उद्योजक, महिला उद्योजक आज श्री इंडस्ट्रीजने बनविलेल्या मशीन्स वापरुन स्वयंपूर्ण बनले आहेत. यावेळी ग्राहकांना प्रक्रिया उद्योगाच्या निवडीसाठी लागणारी माहिती श्री इंडस्ट्री विनामोबदला उपलब्ध करुन देते.

नवउद्योजकांनी आपल्या व्यवसायाची सुरवात करताना आापल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे हे आधी निश्चितच करावे. त्यानंतर व्यवसायाला मार्केटमध्ये असणारे भवितव्य, आपले स्पर्धक, ग्राहकांची गरज याचा मार्केट सर्व्हे करुन मगच सुरवात करावी. आपल्या व्यवसायाबद्दल पूर्ण विश्वास, आपुलकी, अपयश आले तरी त्रुटी दूर करुन जोमाने वाटचाल करायची तयारी असेल तर अशा प्रकारच्या कार्यप्रणालीतच आपले यश दडले आहे याची खात्री बाळगा!

श्री इंडस्ट्रीजच्या बाबतीत ही गरज ही शोधाची जननी आहे. या उक्तीप्रमाणे सातत्याने नवनवीन मशीन्स विकसित केल्याने मार्केटमध्ये श्री. इंडस्ट्रीजचे नाव टिकून आहे. सध्या २५ प्रकारची मशीन्स बनविली असून ताशी १००० किलो आवळा किसण्याच्या मशीनच पेटंट क्लेम केल आहे.

मेहनत, सतत नवनिर्मितीचा ध्यास, सर्वोत्तम गुणवत्तेच्या जोरावर श्री इंडस्ट्रीजने दमदार तपपूर्ती केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !

No comments:

Post a Comment