Thursday 17 February, 2011

अंक ७वा, १७ फेब्रुवारी २०११

प्ासंगीक *
डॉक्टर आणि इंजिनिअरच कशाला?
आपल्या पाल्याला डॉक्टर/इंजिनिअरच करायचाय आणि तो तसा व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी त्याने घसघशीत मार्क मिळविलेच पाहिजेत या मनोकामना पूर्तीसाठी पालकांचा आटापिटा चालू असतो. हा प्रयत्न दीर्घकाळ, पाल्य माध्यमिक शाळेत गेल्यापासून ४-५ वर्षे फूल स्पीड चालू असतो. एवढा की, त्यापुढे संसारातले सर्व प्रश्न गौण मानले जातात.
या विषयात जरा आंत डोकावलं तर लक्षात येईल की, जवळ-जवळ वेडाचे रुप घेतलेला हा रोग प्रामुख्याने नोकरपेशा मध्यम वर्गात एवढा रुजलाय की, अनेक घरात त्याचे क्रॉनिक झाले आहे. यामुळे पाल्य व पालक हे ताणाच्या रोगाचे बळी झाले आहेत. त्या त्या कुटुंबांचे मानसिक स्वास्थ्य पार हरपले आहे.
पाल्याने खच्चून मार्क मिळविले पाहिजेतच व मेडिकल/इंजिनिअरिगला प्रवेश मिळवायलाच हवा ही अंधश्रद्धेएवढी भीषण भावना झाली आहे. गेल्या काही वर्षात तिला (मध्यमवर्गात) एका उच्चभ्रू वेडाचारी परंपरेचे रुप आलेले आहे. साईड इफेक्ट म्हणून अन्य समाजात त्यामुळे उगीचच न्यूनगंड निर्माण झाला आहे. एक तर या अन्य समाजाला गुणात्मक विद्या अंगिकारण्याची पूर्वपरंपरा नाही. भरपूर मार्क मिळविण्याचं टेक्निक त्यांना अवगत नाही. तेही माहित असेल तर त्यांची आर्थिक कुवत नाही. हळूहळू या अन्यांमध्ये हे वातावरण पसरण्याची प्रोसेस चालू आहे. त्याला अन्य कारणांबरोबर शिक्षकवर्गही जबाबदार आहे. म्हणून तर उच्चवर्गीयांबरोबर किवा त्याहून अधिक गुणात्मक चमक इतर समाजातल्या कुणी विद्यार्थ्याने दाखविली तर त्याचे माध्यमांतून विशेष कौतुक प्रसिद्ध होते.
कार्यकारण मिमांसा न करता ज्या अर्थशून्य गोष्टी परंपरा म्हणून केल्या जातात त्यांना अंधश्रद्धा म्हणतात. त्या अगदीच अर्थहीन नसल्या तरी त्यांना पर्याय असतात. जगातल्या उलाढाली बहुविध आहेत हे जाणून चितन मनन केलं जातं. याला मध्यम व उच्च वर्ग, धनाढ्य व उच्चविद्याविभूषितही अपवाद नाहीत. डॉक्टर/इंजिनिअर होण्याचं शिक्षण पाल्याला घेण्याची संधी साधायला हवी यासाठी कुटुंबात ४-५ वर्षे निकराची लढाई मांडणा-या पालकांनी जगात पाल्याला उभं करायलाच काय, चमकवायलासुद्धा अन्य शेकडो पर्याय आहेत हे आता लक्षात घ्यायला हवे.
म्हणजे मेडिकल/इंजिनिअरींगच्या लाईनचा हा तिटकारा नव्हे. जमल तर उत्तम पण, न जमलं तर खट्टू होण्याचं, पाल्याला दोष देण्याचं कारण नाही. त्याचा कल कशाकडे आहे, त्याच्यात इतर सामर्थ्य काय आहे हे पहायला हवं. तर त्याला योग्य ती पर्यायी लाईन देता येईल.
आता जरा पर्यायी लाईनबद्दल चर्चा करु. जे या मार्क उकळण्याच्या वातावरणापासून दूर आहेत त्यांचं जेमतेमच शाळाशिक्षण असूनही त्यांच्यापैकी हजारोजण चांगल्या समाजमान्य मार्गाने डॉक्टर/ इंजिनिअर्सपेक्षा जास्त कमवित असतात व दहा-पंधरा वर्षात चांगली प्रॉपर्टीही जमवितात. यात पानपट्टीवाल्यापासून, प्लंबर, वीजयंत्री, टीव्ही दुरुस्तकार, दुकानदार, ठेकेदारांपर्यंत अनेक प्रकारचे लोक आहेत. एक जाहीर आकडेवारीच अशी आहे की, महिना ५० हजार ते एक लक्ष रु. कमविणा-यांपेकी ५० टक्के लोक कॉलेजची पायरी चढलेले नाहीत किवा तेथून एक-दोन वर्षात पायउतार झाले आहे. भले यातील काही टक्के अप्रिय-अमान्य धंदा व्यवसायात असतील. तर मग डॉक्टर/इंजिनिअरसुद्धा वाईट धंदे, व्यवसायात असतात हे वृत्तपत्रांतून जाहीर होत असते, त्याचे काय?
आणखी एक मुद्दा असा की, डॉक्टर, इंजिनिअर व तत्सम लाईनसाठी भरमसाठ मार्क मिळविणे यासाठी आकलनशक्तीपेक्षा पाठांतर व सुस्मृती महत्वाची भूमिका बजावते. मूलभूत विषय समजलेलाच असतो असं ठामपणे म्हणता येत नाही. (निदान भारताची शिक्षण पद्धती अशीच आहे.) तरीही अशा विद्यार्थ्यांचं कौतुक जरुर आहे. पण विषयच मर्यादित आहेत तर अन्य शेकडो विषयांपैकी कशात हुषारी आहे ते मोजायला मार्ग काय? सचीन, लता, कामराज नाडर, वसंतदादा पाटील यांना गुण दाखवायला कुठल्या परीक्षांची, मार्क दाखविण्याची संधी होती आणि त्यापेक्षा काय जरुरी होती?
तेव्हा मेडिकल, इंजिनिअरिगपेक्षाही अधिक प्राप्ती व अधिकार देणा-या नोक-या, उद्योग व्यवसाय आहेत याचे भान शिक्षित पालकांनाही ठेवायला हवे. तसे प्रयत्न आतापासूनच करायला हवेत. तिथेसुद्धा स्पर्धा आहेच. हे वेळीच न केले तर पालक व पाल्य यांच्यामध्ये वैफल्याची भावना येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- किशोर बुटाला, महाड
मोबा. ९४२२२९४०५३

अधोरेखीत *
अणुउर्जा कशी हो बनते?

अणुउर्जेमध्ये धूर निर्माण होत नाही. तेव्ही ती ‘स्वच्छ‘ उर्जा आहे आणि आपली जी काही उर्जेची गरज आहे त्यासाठी अणुउर्जा हा झकास उपाय आहे असे मत शिक्षित वर्गात आहे. अशिक्षित वर्गाला आधी उर्जा आणि अणुभट्टी ही काय भानगड आहे तेच माहित नसतं. पण म्हणजे सुशिक्षितांना, जैतापूरच्या बातम्या देणा-या बातमीदारांना, त्यावर लिहिणा-या पेपरवाल्यांना, मतं ठासून मांडणा-या, तावातावाने चर्चा करणा-या कट्ट्यावरच्यांना आणि प्रकल्प पुढे दामटू पाहणा-या नेत्यांना, त्यांच्या अनुयायांना माहित असते असं नाही. तुम्हाला माहित आहे का?
अणुभट्टी साधारण कशी चालते? त्यातून वीज कशी बनते? आम्हालाही आधी माहित नव्हतं. अणुवीज प्रकल्प आमच्या अंगणात आला. त्याची धग आम्हाला जाणवू लागली. तेव्हा आम्ही अभ्यास करुन ते जाणून घेतलं. जितकं सोप्प करता येईल तितकं करुन सांगायचा प्रयत्न करतो.
लोखंड, तांबे, सोनं या आपल्याला माहित असलेल्या धातूंप्रमाणेच युरेनियम हा एक खूप जड धातू असतो. आमच्या घरात पणज्याच्या काळापासून चालत आलेला न्हाणीचा तांब्याचा हंडा आहे. तो आमच्या पणतूला सुद्धा वापरता येईल. पण तुम्ही जर घरात युरेनियमचा हंडा आणलात तर तुमच्या घरातल्यांसकट आसपासचा सारा शेजार ४-५ वर्षातच या जगातून नाहीसा होईल. ह्या धातूतून सतत आपोआपच नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या प्रकारची, डोळ्यांना न दिसणारी किरणे आणि कण बाहेर पडत असतात. ती माणसांना आणि सजीव सृष्टीला घातक असतात. जिथे कुठे या धातूच्या खाणी असतील तो भाग वावरायला चांगलाच धोकादायक असणार आणि असतोही. भारतात जादूगोडा परिसरात युरेनियमच्या खाणी आहेत. तितले संथाळ आदिवासी आता आता जागृत झालेत. आंदोलनं, विरोध करु लागलेत, दुष्परिणाम दिसायला लागल्यावर. सरकार बेदरकार आहे.
दुपारचे बाराचे कडकडीत उन कसं अंग भाजते! त्यात जर तासभर तसेच उभे राहिलात तर भाजून जाल. सनस्ट्रोक म्हणतात ना तो होईल. नंतर सूर्य कलतो. उन उतरतं. पण समजा ते भाजकं कडक ऊन तसंच तासन तास अंगावर ठेवले तर काय होईल? प्रत्येकाची सहनशक्तीची मर्यादा असते, पण सतत अंगातली गर्मी वाढत जाऊन, नेमके सांगता येणार नाही पण काही ना काही तासांनी माणूस मरणार. सूर्याची किरणे छत्रीने, छप्पराने, भितींनी अडतात पण, युरेनियमची किरणे त्या सर्वांच्या आरपार जात असतात आणि आपल्यावर प्रभाव टाकतात. हाच तो किरणोत्सार. त्याने भाजत नाही. तो गुदमरवून टाकत नाही. त्याच्यामुळे डोळे चुरचुरत नाहीत, त्वचा खाजत नाही, त्याची बाधा होताना कळतही नाही. त्याचा प्रत्यक्ष परिणाम एका मर्यादेपर्यंत लगोलग होत नाही. पण हळूहळू त्याच्या तुम्हाला मिळणा-या डोसाची बेरीज होत जाते. कडक उन्हाच्या डोसाप्रमाणेच, आणि मग त्याचे कोणताही इलाज उपलब्ध नसलेले घातक परिणाम दिसायला लागतात. आपल्या सगळ्या सजिवांची शरीरे ज्या पेशींनी बनली आहेत आणि त्या ज्या डीएनएमुळे नियंत्रित होतात, ते डीएनएचे किरणोत्सर्ग उध्वस्त करतो. पेशी अनियंत्रित होतात. अचानक वाढतात वा खूप कमी होतात, म्हणजेच कॅन्सर. बेताल वागतात आणि सगळी शरीर यंत्रणा ढासळून पडते. म्हणजे समजा हृदयाच्या पेशी यकृतासारख्या वागू लागल्या, मेंदूच्या पेशी आपलं कामच विसरल्या तर काय होईल?
किरणोत्सार धोकादायक का आणि कसा ते आता तुम्हाला साधारण कळले असेल. किरणोत्साराची किती मात्रा माणसाला हानीकारक आहे याचे जे प्रमाण, जे शास्त्रज्ञ आणि नेते सांगतात, त्यांना तितका डोस देवून खात्री करुन द्यायला त्यांची हरकत नसावी. त्याचा छोटासा संफही तुम्हाला जीवनातून उठवू शकतो. तुमची होणारी मुले विकृत, व्यंग असलेली जन्माला आणतो. बाधा तुम्हाला झाली तरी तुमच्या पुढच्या ७ पिढ्यांत ती व्यंगे चालू राहतात. माणसाला किरणोत्साराची माहिती झाल्यापासून आतापर्यंत सातच पिढ्या झाल्यात. पुढच्या जन्माला येतील तेव्हा त्यांचे कळेल. जणू घराण्याला लागलेला काळसर्पांचा शाप! पण माणूस फार खोडसाळ प्राणी आहे. तो नाहक धोक्याशी झटापटी घेत खेळत राहतो.
हा युरेनियम किरणांच्या रुपात उर्जा व उष्णता बाहेर टाकून कणाकणाने फुटतो. त्याचे दोन नवे वेगळे धातूचे कण बनतात. तेही असाच किरणोत्सार बाहेर टाकत फुटतात. त्यांचे परत काही वेगळेच पदार्थ बनतात. अशी साखळी चालू राहते. ही क्रिया फार वेळखाऊ कितीतरी हजारो, लाखो वर्षे निरंतर चालू राहते. अणुभट्टीत त्याचा वेग एकदम वाढवला जातो. सेकंदाच्या छोट्याशा भागाइतका. युरेनियमचा छोटा कण म्हणजे अणू कृत्रिमरित्या फोडून त्यामुळे खूप उर्जा आणि उष्णता एकदम मोठ्या प्रमाणावर बाहेर पडते. तिच्यामुळे बाकी युरेनियमच्या कणांची पण फाटाफूट होत जाऊन सगळाच एकदम फुटला, तर त्याला आपण अणुबॉम्ब म्हणतो. पण अणुभट्टीत फाटाफुटीचा वेगही नियंत्रित केला जातो. निर्माण होणारी बरीचशी उर्जा व उष्णता जड पाणी युरेनियमच्या आसपास खेळवून त्यात शोषली जाते. ते गरमागरम जड पाणी मग साध्या पाण्याने थंड केले जाते. जड पाणी परत भट्टीत जाते. गरम झालेले साधे पाणी बाहेर सोडले जाते. थोडे साधे पाणी वाफ बनण्याएवढे गरम होऊ दिले जाते. ती वाफ फिरत्या चाकांच्या पात्यांवर फेकून ती चाके गरगर फिरवली जातात. त्यामुळे वीजेचे जनरेटर जे एरव्ही आपण घरीदारी डिझेल इंजिनने गरगर फिरवतो ते फिरतात. वीज निर्माण होते. तारांनी हवी तिथे पाठवली जाते.
अणुभट्टीत विजेसाठी प्रत्यक्ष गरजेच्या मानाने कितीतरी पट जास्त उष्णता निर्माण होत असते. ती बव्हंशी पाण्यात शोषली जाते. ती उष्णता काही ताबडतोब आकाशात चंद्रावर उडून जात नाही. परिसरातच मिसळते. सतत मिसळत वाढत राहते. गरम वाफेच्या रुपात हवेतही मिसळते. बागेत साधा पाला-पाचोळा गोळा करुन आग घातली तरी १०-२० पावलांवर काय धग लागते, धुराच्या झळीत येणा-या डहाळ्या, फांद्या, झाडे होरपळतात, जळून मरतात हे आपण बघतो. तर, या परिसरातल्या प्रचंड उष्णतेचे काय? तरी सरकार म्हणते उष्णतेचा काहीच त्रास होणार नाही.
तुमच्या लक्षात आलंच असेल, अणुभट्टी म्हणजे एक मिनी मिनी अणुबॉम्ब असतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात येणा-या सा-या यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर झीज होत असते. जड पाणी आणि युरेनियमच्या मधल्या भितींना अतिसूक्ष्म छिद्रे पडून किरणोत्सार जड पाण्यात मिसळतो. जड पाणी आणि साध्या पाण्याच्या मधल्या भितीमधून साध्या पाण्यातही मिसळतो. किरणोत्साराची ही गळती नगण्य असते असे सरकार म्हणते. प्रत्यक्षात गोपनियतेच्या आवरणात तिच्या वाढत जाणा-या प्रमाणावर कायमच आडपडदा टाकलेला असतो. सतत झीजेमुळे पूर्वी अशी अणुभट्टी फारतर १५ वर्षे वापरता यायची. सुधारुन सुधारुन ३० वर्षांपर्यंत वापरता येऊ लागलीय. सरकार म्हणतेय ६० वर्षे चालणार. या झिजलेल्या अणुभट्टीचा, यंत्रणेचा वापर मर्यादेपलिकडे चालू ठेवायचा म्हणजे प्रत्यक्ष अणुस्फोटाशी गाठ आहे. दरवर्षी किरणोत्सार गळतीचे प्रमाण वाढत जाते ते अलाहिदा. ३० वर्षांनंतर तुम्हाला अणुउर्जा पाहिजे तर एक नवीन अणुभट्टी बनवायला हवी. ती बनवू हो! पण या जुन्या अणुभट्टीचे काय? स्टीलचा कारखाना व भट्टी दुरुस्तीपलिकडे गेली की मोडीत काढता येतात. सरळ भंगारवाल्याला विकून टाकता येतात. तसं याचं करता येत नाही.
आधी आपण बघितलं की, युरेनियम फुटून त्याचे २ नवीन पदार्थ बनतात. त्यांचे पुन्हा आणखी नवे, आणखी नवे. ती जी साखळी आहे त्यातले बहुतेक सारे युरेनियमसारखेच घातकी. किरणोत्सारी. वाईट माणसांच्या पोटी वाईटच पोरे जन्माला यावीत तसे. त्यांचे किरणोत्सार फेकत राहायचा कालावधी काही वर्षे ते हजारो वर्षे असा कमी जास्त आहे. तरी त्रासदायकच. तर या पदार्थांचे छोटे कण, अणुभट्टीच्या त्या यंत्रणेत आरपार घुसून बसलेले असतात. ती घातकी झालेली असते. अणुभट्टी म्हणजे तो जो मोठा सिमेंट काँक्रीटचा घुमट आम्ही बघतो थडग्यासारखा, ते खरोखरच एक थडगे असते. त्याचे काही करता येत नाही. या जागेत कोणी फिरकू नका म्हणून पाटी लावून सोडून द्यावा लागतो.
बरे, आपण नेहमी बघतो की, इंधन जाळलं की राख ही उरतेच. धूर आहे तिथे आग असते, तसं आग असते तिथे राखही असतेच. तर या अणुभट्टीतली राख म्हणजे युरेनियमचं इंधन जळून गेल्यावर उरलेले त्याच्या पुढच्या साखळीतले पदार्थ, जे किरणोत्सारी असतात, त्यांचं काय करायचं? हा प्रश्न फार बिकट असतो. सध्या असं करतात की, अणुभट्टीपाशीच एक दुसरं मजबूत थडगं बांधून त्यात ही ‘राख‘ ठेवून देतात. पण ती नुस्ती ठेवून चालत नाही. नेहमीच्या राखेसारखी काही ती विझलेली, मेलेली, थंड नसते. ती राख आग व किरणोत्सर्ग ओकतच असते. तिच्याभोवतीचे कवच काही काळानंतर वितळून टाकते. ते नेहमी नवे बदलत राहावे लागते. ते पिढ्यान पिढ्या सांभाळत बसायची जबाबदारी व हजारो वर्षांचे ओझे पुढच्या सा-या पिढ्यांवर लादून हे बुढ्ढाचार्य जणू तरुण पिढी त्यांच्याकडे करत असलेल्या दुर्लक्षाचा सूडच उगवतायत. ती राख जमिनीखाली खोलवर पुरायचे प्रयत्न करुन झाले. भूकंपाने असा काही दट्ट्या दिला की तो मार्ग कायमचा सोडून द्यावा लागला. कोकण बरोबर तीव्र भूकंपाच्या फॉल्ट रेषेवर वसलेले आहे. त्यातूनच बनलेले आहे. आजपर्यंत ज्ञात इतिहासात तसा तीव्र धक्का बसलेला नाही, हा एक सृष्टीचमत्कार मानावा लागेल. वाडवडिलांची पुण्याई, जी लवकरच संपणार आहे! सरकारने या गोष्टीकडे पूर्णपणे काणाडोळा केलाय. त्यांना काय वाटतं? कोकणात अणुबॉम्ब फुटला तर दिल्लीचं तख्त हादरणार नाही? जर भूगर्भात पुरलेला तो राखेचा ज्वालासूर भूकंपाने अचानक वर आला किवा आतल्या भेगांतून भूजलात मिसळत वर आला तर सारं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. सारा भूप्रदेश दूषित होईल, वा-याबरोबर वाफा आणि त्यांचे ढग दूरदूर त्याचा फैलाव थेट दिल्लीपर्यंत नेतील. कसलीही पूर्वसूचना न देता हाहाकार उडेल.
बापरे! जेव्हा आम्हाला हे सर्व आकळलं, तेव्हा अशी शिसारी आली या स्वार्थांध माणसांची. जेमतेम एक पिढी उपभोगू शकेल अशा थोड्याश्या विजेसाठी ही माणसे, ही पिढी, पुढच्या सगळ्या पिढ्यांचा बळी घ्यायला निघलीय.

विशेष *
अणुउर्जा प्रकल्पातील अपघातांची यादी
जागतिक अपघातः
१) १९५७ च्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडमधील विडस्केल अणुवीज केंद्रात अपघात होऊन अणुभट्टीच्या धुराड्यातून किरणोत्सारी पदार्थ बाहेर फेकले गेले. वा-याबरोबर ११०० चौरस किलोमीटर क्षेत्रात दूरवर पसरले. या केंद्रातून कमी किरणोत्सर्गवाले पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडल्यामुळे आयर्लंडचा समुद्र जगातला सर्वात किरणोत्सर्गी बनला. या केंद्राचे सुमारे ३०० अपघात गोपनीय कागदपत्रे कालांतराने उघड झाल्यावर समजले.
२) १९६१ मध्ये अमेरिकेतील इडाहो येथील अपघातात तीन शास्त्रज्ञ मरण पावले. त्यांची शरीरे एवढी किरणोत्सारी बनली की त्यांचे दफन कसे करावे हा मोठा प्रश्न झाला. २० दिवसानंतर जाड शिशाच्या पेटीत ती प्रेते ठेवून कडक बंदोबस्तात पुरण्यात आली.
३) जगातील पहिला मोठा अपघात २८ मार्च १९७९ रोजी अमेरिकेत थ्री माईल आयर्लंड अणुभट्टीत झाला. त्या काळात किरणोत्साराच्या घातकतेबाबत जनसामान्यांना कल्पना नव्हती. अणुभट्ट्या उभारणा-या कंपन्या आणि शासकीय नियमन-नियंत्रण यंत्रणा यांचे साटेलोटे असल्याने अणुप्रकल्पाची भलावण चाले. त्यातले धोके व अपघाताबाबत पुरेपूर गुप्तता राखली जाई. १०० टन इंधन गाड्या म्हणजे युरेनियम अतितप्त झाले आणि किरणोत्सारी वायू हवेत निसटले. किरणोत्साराने बाधित पाणी नदीत सोडले गेले. अणुभट्टीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हॅरीसबर्गमध्ये त्याचा घातक परिणाम जाणवला. ७-८ किलोमीटर परिसरातील दीड लाख नागरिकांना कायमचे स्थलांतर करावे लागले. किरणोत्साराची बाधा झाल्याने नागरिकांना विविध व्याधींनी ग्रासले व प्रश्न चिघळू लागल्यावर ४० लाख डॉलर १९८५ साली वाटून अपघातावर पडदा टाकला गेला.
४) अमेरिकेमध्ये अन्यत्रही किरणोत्साराचे घातक परिणाम झाले. न्यूयॉर्कजवळ फिटझपॅट्रीक पॉवर प्लॅन्ट (१९७२) व माईन माईल पॉईंट-१ (१९६९), अरकानसस न्युक्लिअर-१ (१९७४), बीव्हर व्हॅली (१९७६), व्हरनॉन व्हरमाँयाकी (१९७२) आदी. याशिवाय इतर अनेक देशांत अपघात घडले, घडतच आहेत.
५) रशियात चेर्नोबिलमध्ये सर्वात मोठा अपघात २६ एप्रिल १९८६ रोजी झाला. अणुभट्टीवरचे नियंत्रण हाताबाहेर जावून मोठा स्फोट झाला. छप्पर उखडले गेले आणि प्रचंड किरणोत्साराचे लोट वातावरणात सोडले गेले. वा-याच्या दिशेप्रमाणे बेलारुस, युक्रेन, रशिया, पश्चिम युरोपमध्ये किरणोत्साराचा गंभीर उपसर्ग पोचला. सुमारे १,५०,००० चौरस किलोमीटर पर्यंतचा प्रदेश प्रदुषित झाल्याने कायमचा सोडून द्यावा लागला. (जवळजवळ ओदीसा राज्याएवढे क्षेत्रफळ) ही तर केवळ १००० मेगावॅटची अणुभट्टी होती. जैतापूरची त्याच्या १० पट ताकदीची आहे. त्यासाठी युरोपियन अरेवा कंपनी जी अणुभट्टी पुरवणार आहे, तशा तंत्राची एकही अणुभट्टी अजून जगात उभारली गेलेली नाही. अमेरिकेतील आण्विक नियामक आयोगाने या नमुन्याच्या अणुभट्टीस अजून मान्यता व परवानगी दिलेली नाही. फिनलंडमध्ये अरेवा उभारत असलेल्या अणुभट्टीमध्ये आराखडा आणि बांधकामात अनेक उणिवा तिथल्या सुरक्षा प्राधिकरणाला आढळून आल्या. ते काम रेंगाळलेले आहे. तेव्हा जैतापूर व कोकणाचा प्रयोगाची जनावरे म्हणून उपयोग केला जात आहे म्हणायला हरकत नाही.
भारतातील अपघात-
१) हैद्राबाद आण्विक इंधन निर्मिती केंद्रात युरेनियमच्या इंधन कांड्या बनवल्या जातात. नव्वदीच्या दशकात इथे अधिकृतपणे चार लहान अपघात नोंदले आहेत. प्रक्रिया केंद्रातून रोज ५०००० टन दूषित पाणी बाहेर पडते.
२) डिसेंबर १९९१ मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्रात सायरस संकुलातील दूषित पाण्याची नलिका गळू लागली. गळतीच्या दुरुस्तीसाठी बाहेरुन मजूर आणले. त्यांना झालेल्या मोठ्या बाधेची कुठेच दखल घेतलेली नाही.
३) तारापूर येथे १३ मे १९९२ रोजी नलिकेतील गळतीमुळे किरणोत्सर्ग आसमंतात पसरला.
४) कल्पक्कम इथे ६ मार्च १९९९ रोजी जड पाण्याची गळती झाली. अशा ३ घटना इथे, नरोराला २, काक्रापार इथे १ सरकारने मान्य केलेल्या आहेत. कल्पक्कमच्या समुद्रावर मेलेले मासे मोठ्या प्रमाणात येऊन पडतात. ते स्थानिक खात नाहीत. खारवून दूर मद्रासला विकतात.
अणुउर्जा प्रकल्पामध्ये लहान मोठे अपघात, तांत्रिक बिघाड व किरणोत्साराची बाधा, गळती या समस्या सतत उद्भवत असतात. परंतु शासन किरणोत्साराचे दुष्परिणाम मान्य करत नाही. कारण त्यामुळे आण्विक कार्यक्रमच अडचणीत येईल.
गारुड्याने विषारी सर्प चावणार नाही याची कितीही खात्री दिली तरी सापाला तुम्ही घरात ठेवून घेणार नाही. सापाला विष आहे म्हणजे तो कायम धोकादायक हे तुम्हाला कळते. अणुभट्टी हा असाच किरणोत्साराचे जालिम विष घेतलेला साप आहे. त्याला तुम्ही तुमच्या गावात घेणार का? अणुउर्जा प्रकल्पाला इतर कोणत्याही कारणापेक्षा किरणोत्साराच्या धोक्याचे कारण हेच विरोधाचे सर्वात महत्वाचे कारण आहे. जनतेला जर प्रश्नाची नेटकी माहिती मिळाली तर ही शास्त्रीय माहिती हेच जनतेचे अस्त्र बनते. ते अस्त्र हाती घेऊन जनतेने निग्रही संघटन बांधून चिकाटीने लढत दिली तर सरकारला नमावेच लागते.
संदर्भ- अणुउर्जा- भ्रम, वास्तव आणि पर्याय
- सुलभा ब्रम्हे

बालकांच्या आरोग्यासाठी
सुवर्णप्राशन - विधी
सर्व सजीवांना सध्या विविध प्रदूषणांना सामोरे जावे लागत आहे. हवा, पाणी, अन्न यांद्वारे विविध विषारी रसायने शरिरांत प्रवेश करीत असतात. त्यांतच ध्वनी-प्रदूषणाचा (वाहनांची वाढती संख्या, त्यांचे कर्णकर्कश हॉर्न इ. मुळे) मुकाबलाही सतत करावा लागतो. त्याशिवाय सध्या पर्यावरणांतही चित्रविचित्र बदल सतत आढळून येत आहेत. ‘तपमान-वृद्धी‘ (ग्लोबल वॉर्मिग) हा त्यातलाच एक. या सर्वांचा एकत्रित परिणाम सर्व मानवजातीला विशेषतः लहान बालकांना भोगावा लागत आहे.
सर्व प्रकारच्या प्रदूषणांशी यशस्वी टक्कर देण्यासाठी मानवाची प्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. ‘सुवर्ण - प्राशन विधी‘ हा उपक्रम विशेषतः बालकांची प्रतीकारशक्ती वाढविण्यास मदत करुन वरील हेतू साध्य करण्यास हातभार लावतो.
‘आयुर्वेद‘ या जगातील प्राचीनतम वैद्यकशास्त्रामध्ये, व्याधीची उत्पत्ती झाल्यावर त्याचा प्रतिकार करीत बसण्याऐवजी व्याधी होऊ न देण्यासाठी काय काळजी घ्यावी यावर अधिक भर दिला आहे.
स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. याचा पाया बालवयातच घालणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ‘स्वस्थवृत्त‘ विभागात आयुर्वेदाने अनेक उपाय वर्णन केले आहेत. त्यापैकी बालकांच्या स्वास्थ्यवर्धनासाठीच्या अनेक उपयांपैकी एक म्हणजे ‘सुवर्ण - प्राशन विधी.‘
सुवर्ण म्हणजे सोने. पर्यावरणातील बदलांचा परिणाम सोन्यावर पटकन होत नाही. अग्नीमध्ये देखील ते स्वतःचा वर्ण (रंग) बदलत नाही (म्हणूनच त्याला ‘सु‘वर्ण म्हणतात.) असे अनेक उपयुक्त गुणधर्म असल्याने सोन्याला आयुर्वेदिक औषधांमध्ये मानाचे स्थान आहे. मनुष्य देहाला ते कांतिवान,सुदृढ आणि प्रतिकारक्षम बनवते.
सुवर्णप्राशनासाठी जे औषध बनवले जाते त्यात सुवर्णभस्मा - सोबत वचा (वेखंड) हे एक प्रमुख औषध आहे. लहान मुलांमध्ये वेखंड हे मेध्य कार्य करते. त्यामुळे बालकांची धी (बुद्धी) आणि स्मृती (स्मरणशक्ती) वाढते. अभ्यासात मागे पडणा-या विद्यार्थ्यांसाठी याचा छान उपयोग होतो. तसेच वेखंडामुळे वाणी सुधारते (शब्दोच्चारणातील दोष नाहीसे होतात.) सुवर्ण आणि वेखंड यांच्या योगे वर्ण (त्वचेचा रंग) सुधारतो, बुद्धीची चांगली वाढ होते. या औषधामध्ये तूप आणि मध मिसळलेले असतात. प्रत्येक महिन्याच्या ‘पुष्य‘ नक्षत्रावर बालकाला (पोलिओ डोसप्रमाणे) पाजले जाते.
सध्याच्या मर्यादित अपत्यांच्या काळात प्रत्येक सुजाण पालक आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांची बुद्धी कुशाग्र होण्यासाठी आणि प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत सजग आणि प्रयत्नशील असतात. ‘सुवर्ण-प्राशन विधी‘ ही संधी त्यांना सोन्यासारखी ठरु शकते.
कर्नाटक राज्यातील हासन येथे श्री धर्मस्थल मंजुनाथेश्वर (एस.डी.एम.) आयुर्वेदिक कॉलेजमध्ये, आयुर्वेद निदेशक यांचेतर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या ‘सुवर्ण-प्राशन शिबिरा‘साठी निमंत्रण मिळाल्यामुळे सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून मला जाण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या संस्थेतर्फे दर महिन्याला कॉलेजच्या आवारांत तसेच अन्य चार केंद्रांच्या ठिकाणी सुवर्ण-प्राशन कॅम्प आयोजित करण्यांत येतो आणि दर महिन्याला सर्व केंद्रांत मिळून सुमारे दहा हजार बालके त्याचा लाभ घेतात. एकट्या कॉलेजच्या आवारांत सुमारे पाच हजार मुले त्यासाठी दर महिन्यांत नियमाने एकत्र येतात. त्या शिबिराचा एक दिवस पुष्य नक्षत्रादिवशी येईल अशी आखणी करण्यांत आली होती. त्यामुळे बालकांचा तो प्रचंड जमाव एकत्रित झालेला मला स्वतःला अनुभवता आला. बालके (व सोबत पालक) हजारो असली तरी नियोजन सुव्यवस्थित असल्याने कोठेही गडबड गोंधळ नव्हता. शेजारच्या गोवा राज्यांतही सुवर्ण-प्राशन शिबिरे दर महिन्यांत आयोजित करण्यांत येतात.
‘अखिल मानव कल्याण न्यास‘ या सेवाभावी संस्थेने जामसंडे (देवगड) येथे सुवर्ण प्राशन विधीची सुविधा सर्व प्रथम उपलब्ध करुन दिली. तेथील उत्तम प्रतिसादामुळे आता कणकवली आणि सावंतवाडी येथेही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
- प्रा. वैद्य मुरलीधर पु. प्रभुदेसाई
भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय,
सावंतवाडी, जि. सिधुदुर्ग ४१६५१०
संफ * ९४२२४३५३२३

मध्वानुभव
टी.व्ही.चा शोध लावणा-या संशोधकाला, या शोधामुळे समाज कसा घडत किवा बिघडत चालला आहे हे पहायला मिळाले तर त्याला ‘प्रायश्चित‘ घ्यावेसे वाटेल. मला ‘प्रायश्चित‘ दे, अशी ऑफर त्याने मला दिली, तर गेली ३ - ४ वर्षापेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या ‘सिरिअल्स पहाण्याचे प्रायश्चित‘ मी त्याला देईन. (तो डोक्याचे केस (स्वतःच्या) उपटत, हातात येईल त्या वस्तूने टी.व्ही. फोडेल असे रम्य कल्पनाचित्र माझ्या डोळ्यासमोर साकार होत आहे.)
टी.व्ही.काय किवा अन्य कोणतेही शोध काय, ‘ते वरदान की शाप‘ हे ठरवणं कठीण आहे. एखादं ‘शस्त्र‘ हे कुणाच्या हाती आहे त्यावरुन ते विधायक की विघातक होईल हे ठरतं. सुरी ‘सर्जन‘च्या हातात ‘जीवनदायीनी‘ ठरते. तर गुंडांच्या हातात......!
मध्यंतरी कुणीतरी टी.व्ही.मुळे मुले बिघडतात असे म्हणतांना ऐकलं. मुलं किवा पुढची पिढी टी.व्ही.मुळे बिघडत आहेत हे मला स्वतःला फारसं पटलं नाही. टी.व्ही., सिनेमे इत्यादींच्या ‘बेलगाम‘ वापरामुळे मुलं-मुली लवकर वयात येत आहेत असे वाचनात आले आणि एक अनुभव आठवला.
म्हणजे त्याचं काय झालं, शनिवार / रविवारी दुपारी टी.व्ही.वर डिस्कव्हरी चॅनल पहात होतो. आमच्या शेजा-यांचा ६-७ वर्षांचा मुलगाही समवेत होता. ‘आजोबा, मराठी सिनेमा लावा ना‘ असा हट्ट त्याने धरला. कॉन्हेंटमध्ये शिकणा-या या बालकाने मराठी सिनेमा पहाण्याची इच्छा व्यक्त केल्याने मी धन्य झालो. मी मराठी सिनेमा ‘सर्फिग‘ करुन लावला. सिनेमाचे नाव, अन्य तपशील आता आठवत नाही. परंतू नायक - नायिकेचे मराठी बजेटला साजेशा बागेत हुंदडणे, पळापळी, धावाधावी इ. सुरु होते. (वाचकहो, धावतांना ताला-सुरात ज्याला गाणं म्हणणं जमत असेल त्याचा खास सत्कार करावा असं मी संपादकाना सुचवितो!)
तर त्या दोघांचं दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे, यथेच्छ बागकाम झाल्यावर पुढे फारशी विघ्ने न येता लग्न झाल्याचं दाखवलं होतं. त्यानंतर साहजिकच हनिमुनला जाणे ओघानेच आलं. आमच्या शेजा-यांचा ‘कुमार‘ हे सर्व मन लावून पहात होता. सिनेमाचे कथानक पुढे सरकत होते. त्यानंतर तो लग्नानंतरचा रोमांचकारी सीन व क्षणही आला. नायिका फुलांच्या माळांनी शृंगारलेल्या पलंगावर अधोमुख होऊन सलज्जपणे बसली होती. नायक हॉटेलच्या रुमचा दरवाजा उघडून आत आला. दोघांची वेशभूषा प्रसंगाला साजेशी होती. दिग्दर्शकाच्या सुचनेनुसार नायक नायिकेजवळ पलंगावर बसला. नायिकेच्या हनुवटीला स्पर्श करीत त्याने तिचे अधोमुख किचित वर उचलले. नायिका नखशिखांत रोमांचित झाल्याचे ‘पार्श्वसंगीत‘ सुचवत होते.
एवढ्यात माझ्या शेजारी बसलेला कुमार उस्फूर्तपणे म्हणाला, ‘आजोबा, त्या हिरोने दाराची कडी लावली नाही!!!‘
सहा - सात वर्ष वयाच्या कुमाराचं हे ‘निरिक्षण‘ पाहून मी धन्य झालो. हा ‘कुमार‘ भविष्यात सिनेमा नायक, दिग्दर्शक झालेला दिसला तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. टी.व्ही. सिनेमे यामुळे ‘पिढी‘ लवकर वयात येत आहे हे निरिक्षण ज्या कोणाचं असेल त्याला माझा पूर्ण पाठिबा आहे.

‘गेलेले हे ते नव्हेतच.‘
तेरा जानेवारी दोन हजार अकराला रात्री नऊ पासून सर्ववृत्तवाहिन्यांनी ‘पंत‘ नटवर्य गेल्याचे वृत्त प्रसारीत करायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रत्येक नाटकप्रेमी व्यक्तीला आपले पंत गेले ही भावना काजाळवून गेली.
पंत म्हणजेच नटवर्य प्रभाकर पणशीकर. ते आपल्यातून गेलेले नाहीतच. ते जाणारच नाहीत. ते तेथेच आपल्यात ठामपणे उभे आहेत, धृवाच्या ता-यासारखे. त्यांनी त्यांच्या पणशीकर किवा पंत नावाच्या भूमिकेची रंगभूषा आणि वेशभूषा उतरवून ठेवली आहे एवढेच काय ते.
एकोणीसशे पंचावन सालापासून आपले पंत रोजच्यारोज प्रभाकर पणशीकर नामक भूमिकेची वेश-रंगभूषा उतरवून ठेवत आणि नवनव्या भूमिकांच्या वेशरंगभूषा चढवून वेगवेगळ्या देहबोली आणि नवनव्या संवाद पद्धतीसह उजळलेल्या रंगमंचावर आपल्यासमोर वावरत होते. रंगमंचावर अंकाचा पडदा पडला की त्या दिवशीचा पंतांचा तो नाट्यप्रयोग पाहाणा-या प्रत्येकाच्या मनात पंतानी सादर केलेली ती भूमिका जिवंत होवून वावरत असायची असे सतत पन्नास वर्षे सुरू होते.
कॅप्टन अशोक परांजपेची ती फ्रेंचकट दाढी, नेव्हीचा गणवेश संरक्षणदलातील अधिका-याप्रमाणेच्या हालचालीतील तत्पर चटपटीतपणा कोणी विसरू शकत नाही. विद्यानंदांच्या ‘खरे काय आणि खोटे‘ काय या स्वगतातील मानसिक आक्रोश पंतांनी अनेकांच्या हृदयात कायमचा कोरुन ठेवलाय. न्यायमूर्ती देवकीनंदन मधील न्यायाधीशाचा काटेकोर करारीपणा आणि कुटुंब प्रमुखाचा सहृदयपणा हा मला काही सांगायचयचा आधार होता. तो कुणाला विसरता येणारच नाही. फॉरेनरिटर्न्ड दिवाकर दातार आणि कर्मठपणाचा अर्क असलेल्या प्रवचनकर्त्या दाजीशास्त्री दातारांच्या व्यक्तिमत्वातील फरकांवर एखादे पुस्तक लिहिता येईल. कोण म्हणतो, आपले पंत गेले? छे! छे!! ते आपल्या सर्वांच्या मनात ठामपणे वेगवेगळ्या रंगरुपात वेगवेगळे संवाद म्हणत उभेच आहेत!
ओशाळलेल्या मृत्यूतला शहेनशहा औरंगजेब गाजत असताना, बंद पाकिटावर फक्त, शहेनशहा पणशीकर एवढे दोनच शब्द कोठल्याही पत्त्याशिवाय लिहिलेले, बाहेरगावच्या पोष्टात टाकलेले पत्र पंतांच्या दादरच्या घरी पोहचते झाले होते. त्या पोस्ट कर्मचा-याच्या मनातही तो शहेनशहा औरंग्या पणशीकर वावरत असणार! कोर्टात दिसणारा लखोबा म्हणजेच राघेश्याम महाराज किवा दिवाकर दातार किवा दाजी शास्त्री असतो यावर अनेक सुशिक्षितांचा विश्वास बसायचा नाही. लखोबा लोखंडेला उद्देशून सरकारी वकील एके ठिकाणी म्हणतात, --- या आरोपीचे अभिनय कौशल्य पाहून सरकारने याला अभिनयासाठीचा पद्मपुरस्कार दिला पाहिजे. --- या वाक्याला प्रेक्षक कडाडून टाळ्या वाजवायचे, कारण प्रेक्षकांना ---- ते वाक्य लखोबासाठी नसून प्रभाकर पणशीकरांसाठी आहे हे मनोमन पटलेले असायचे.
खरोखरच कोण होते ते ? शहेनशहा औरंगजेब की लखोबा? अल्लाउद्दिन खिलजी की प्रि. विद्यानंद? न्यायमूर्ती देवकीनंदन की, मि. ग्लाड. की, दाजी शास्त्री दातार? कोण? कोण होते ते? ते हे सर्वकाही असलेले ‘आपले पंत‘ होते.
- कॅप्टन डॉ. आनंद जयराम बोडस

विशेष बातम्या *
डच वखारीचा जीर्णोद्धार!
व्यापार-उदिमासाठी डचांनी सन १६७८ मध्ये बांधलेल्या वेंगुर्ले, सूरत, कोचीन येथील पुरातन इमारतींच्या जागी त्याच दिमाखात नूतन वास्तू बांधून पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या हॉलंडमधील आर्किटेक्ट सुझान्न,राजकीय नेते अॅरी फोम यांनी वेंगुर्ले नगराध्यक्ष संदेश निकम यांची भेट घेतली. यावेळी निकम यांनी याप्रश्नी जिल्हाधिका-यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
हॉलंड-नेदरलँडमध्ये आजही डचांनी भारतात सोळाव्या शतकात बांधलेल्या वस्तूंचे नकाशे आहेत. त्यात इमारतींची पूर्ण माहिती आहे. भारतातील जीर्ण झालेल्या या इमारतींचा विकास करण्यासाठी हॉलंडकडून निधी आणून येथील इमारतींचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारत सरकारचे सहकार्य लागणार आहे. पुढील काळात हॉलंडमधील पर्यटक येथील वास्तू पाहण्यासाठी दरवर्षी भारतात येतील, असे अॅरी फोम यांनी स्पष्ट केले.

पत्रकार केसरकरांना वालावलकर पुरस्कार प्रदान
कुडाळ तालुका पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा भैय्यासाहेब वालावलकर स्मृति पुरस्कार वेंगुर्ले येथील ज्येष्ठ पत्रकार शशिकांत केसरकर यांना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तालुकास्तरीय शहरी पुरस्कार हरिश्चंद्र पालव, ग्रामीण गटातून मधुकर कुडाळकर यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.गणेश मुळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद ठाकूर, व्याधच्या संपादक सौ.संजीवनी देसाई, श्री. रणजीत देसाई आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट प्राचार्य डॉ. के. जी. केळकर
वेंगुर्ले येथील अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. केळकर यांना ‘बेस्ट प्रिन्सिपॉल अवार्ड‘ ने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय शिक्षण व व्यवस्थापन दिल्ली या संस्थेकडून विविध विभागांच्या प्राचार्यांमधून शिक्षण व होमिओपॅथिक वैद्यक शास्त्रातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल देशभरातून आलेल्या प्रस्तावातून वैयक्तीक कामगिरी व बौद्धिक विकास या निकषावर ही निवड करण्यात आली.
डॉ.के.जी.केळकर गेली २२ वर्षे होमिओपॅथीक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९९८ पासून प्राचार्य पदावर काम करीत आहेत. तसेच होमिओपॅथीक वैद्यक क्षेत्रात होमिओपॅथीच्या प्रसाराकरिता शिक्षण, आरोग्य मेळावे, आरोग्य शिबिरे, प्रशिक्षणे इ. माध्यमातून काम करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या पोस्ट ग्रॅज्युएट विभागात तसेच मुंबई विद्यापीठात होमिओपॅथीक विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) म्हणून तसेच अभ्यास मंडळे यावर काम केले आहे.

मिराताई जाधव यांचा ८४व्या वाढदिवस साजरा
वेंगुर्ले-कोचरे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सावंतवाडी येथील सा. सत्यप्रकाशच्या माजी संपादक मिराताई जाधव यांचा ८४व्या वाढदिवस नुकताच त्यांच्या निवासस्थानी साजरा केला. सिधुदुर्ग काँग्रेस सरचिटणीस एम.के.गावडे यांच्या हस्ते श्रीमती जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रज्ञा परब, सौ. दिपा जाधव, लावण्यलक्ष्मी जाधव, हेतल जाधव आदी उपस्थित होते.
आज पत्रकारीता ही काळानुरुप बदल असून पत्रकाराने लेखणीचा वापर विकासासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी करावा असे विचार श्रीमती मिराताई जाधव यांनी याप्रसंगी व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा देतांना त्या म्हणाल्या, आपण सावंतवाडीत केवळ १९ रुपयात निवडणूक लढविली होती. परंतू आज निवडणूक साम, दाम, दंड यावर आधारीत आहे. नितिमूल्य घसरत आहेत याची खंत वाटते. यामध्ये बदल हा केवळ युवक करु शकतो. परंतू त्याचबरोबर समाज बदलण्याची ताकद ही पत्रकारीतेत आहे. तिची जाणीव सदैव ठेवली पाहिजे. पत्रकाराला मिळणारे मानधन व पत्रकाराच्या कामाचे स्वरुप यामध्ये तफावत आहे. याकडेही शासनाचे लक्ष त्यांनी वेधले आहे. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

एम.के.स्वयंरोजगार सहकारी संस्था स्थापन
एम. के. गावडे यांच्या नावानेच एम.के.स्वयंरोजगार सहकारी संस्थेची स्थापना झाली असून या संस्थेची पहिली सभा एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये सौ. प्रज्ञा परब - वेंगुर्ले (चेअरमन), सखाराम ठाकूर - मठ (व्हा.चेअरमन), सदस्य - एम.के.गावडे-वेतोरे, शुभांगी गडेकर-आडेली, सुनिल नाईक-वेतोरे, श्वेता नाईक - पालकरवाडी, अंबाजी धर्णे - आडेली, श्वेता सच्चिदानंद जाधव - कोचरे, बाबाजी येरम -वेतोरे (सचिव)
संस्थेने ४ कोटीचा विकास आराखडा तयार केला असून ८ लाखाचे ५०० टन क्षमतेचे गोडावून व ३० लाखाचे पॅकिग, ग्रेडिग युनिट बांधण्यात येणार आहेत. १२० शेतकरी व महिलांचे कर्ज प्रस्ताव केले असून केले असून त्यांना उद्योग मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संस्थेमार्फत मार्केटमध्ये खरेदी - विक्री व्यवहारही केली जातील. असे संस्थापक एम.के.गावडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment