Friday 18 November, 2011

अंक ४२वा, १७ नोव्हेंबर २०११

अधोरेखित *
पाव रे देवा*..!
लष्कराच्या भाक-या भाजणा-या आचा-याला काय म्हणतात? बरेचदा आपण ‘सामाजिक‘ कामाकडे लष्कराची भाकरी म्हणून पाहतो. ‘तुला जगाचं काय करायचं आहे? तुझ्यापुरतं बघ.‘ असा घोषा लहानपणापासून आपण ऐकतो. वृत्तपत्रांमधील समाजात घडणा-या ब-यावाईट बातम्या चहाच्या कपाबरोबर वाचतो, ‘असंच चालायचं, जगात काही उरलं नाही, आमच्यावेळी असं नव्हतं‘ असा नकारात्मक सूर येतो. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा राजस्थानमधील तरुण भारत संघाचे डॉ. राजेंद्र सिंह, कुष्ठरोग्यांच्या आयुष्याला नवीन धुमारे फोडणारे डॉ. बाबा आमटे व कुटुंबिय, तरुणांनाही लाजवतील असे अण्णांचे राळेगणमधील प्रयोग या सर्वांमधून एक मोठा दबाव गटही तयार होतो. हातातील मेणबत्तीचं रुपांतर ‘पणती‘ मध्ये होते. तसेच कर्पूरासमान ‘निर्मम‘ भावनेने जळणा-या कार्यकर्त्याच्या समुहातून स्वराज्याचे रुपांतर सुराज्यामध्ये होते. या सर्वांचा समुह, त्याचे नाव म्हणजे ‘स्वयंसेवी संस्था‘. ग़्क्रग्र् पेक्षा मला ‘स्वयंसेवी‘ हा शब्द भावतो.
आपणाला गावांगावांमध्ये एक आख्यायिका ऐकायला मिळेल की, हे मंदिर पांडवांनी एका दिवसात बांधलं. काही गावातील मंदिरं अपुरी राहिली कारण म्हणे, पांडवांनी ते गाव अचानक सोडलं. याचा सामाजिक अर्थ काय? पांडव हे समाजातील विविध प्रवृत्तीचं रुपक आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास प्रश्न एका दिवसात सुटतात. वैयक्तिक अभिनिवेश आले की मंदिर होत नाही. चांगला दाणा मातीत गेल्याशिवाय शिवार बहरत नाही. समाजातील सर्व लोकांना ही विकास प्रक्रिया समजावून सांगणे महत्वाचे आहे.
पाषाणाला गा-हाणे घालणारा तटस्थ असतो. जो दुःखी, कष्टी आहे तो आपले म्हणणे त्याच्यामार्फत व्यक्त करतो. स्वयंसेवी संस्थेची भूमिका ही त्याच्याप्रमाणे आहे. मला फेव्हीकॉलची जाहीरात आठवते. ‘अंड फुटत नाही, तुटत नाही. असं का? तर, मालकीणीने कोंबडीला खाद्य फेव्हीकॉलच्या रिकाम्या डब्यातून दिलेलं असतं.‘ गंमतीचा भाग सोडा. स्वयंसेवी संस्था ही फेव्हीकॉल सारखी असते. सनमाईक व प्लायवुडमधला दुवा असते. शानाच्या कल्याणकारी योजना व सामान्य माणूस यामधला दुवा.
शासनाची पूर्वी गाव दत्तक योजना असायची. आता शासनाने शब्द बदलला. योजनेचं नाव झालं ‘गाव विकास योजना‘. दत्तक हा शब्द वेगळा भाव दाखवितो. जलस्वराज्य, स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित योजना या सर्वांमधील घोषवाक्य असते, ‘लोकांचा पुढाकार, त्यात शासनाचा सहभाग.‘ अन्यथा विकास हा पुरवठा आधारित होतो. मागणी आधारीत विकास हा शाश्वत असतो. माझं भाताचं उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून मी चारसुत्री वापरली पाहिजे. म्हणूनच वनवासी भागातील डॉ. दफ्तरदारांचे काम लोकांना भावले. आज चारसुत्री ही लोक चळवळ होत आहे. ‘बायोगॅस‘ चा उपक्रम ही लोक चळवळ होत आहे. ‘अनुदान नाही मिळालं तरी चालेल, आम्ही गॅस बांधणार‘ ही भूमिका लोककल्याणकारी राज्यासाठी पोषक ठरते. अधिकाराबरोबरच कर्तव्याची जाणीव निर्माण करायचं काम स्वयंसेवी संस्था करते. आपल्या जिल्ह्यातील कॉनबॅक, लुपिन यांची कामं आदर्शवत आहेत. आपला जिल्हा हा आप्पासाहेब पटवर्धनांचा वारसा सांगणारा आहे. विनोबाजी म्हणायचे, ‘एक आप्पा, बाकी सारे गप्पा.‘
एकाच स्वयंसेवी संस्थेचा एकछत्री अंमलही धोकादायक असतो. दहा गावांसाठी एक स्वयंसेवी संस्था असावी. सर्वांनी परस्परांमध्ये संवाद ठेवावा. पक्षीय राजकारणा पासून सुरक्षित अंतर ठेवावे. ही संस्थेची पथ्यपाणी ठरतात. अन्यथा संस्था ‘संस्थान‘ बनतात. ‘लोकांसाठी काम‘ न करता ‘लोकांबरोबरचे काम‘ अधिक शाश्वत असते. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते. तसं पाहिलं तर पंढरपूरच्या वारीला चालत जाणारे वारकरी स्वतःच वजन घटवतात, प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात, शासनाचा क्रङ नसताना मोठा जनसमुदाय जमतो. रिगण जमतं. हरवलेला आत्मविश्वास पंढरपूरला सापडतो. आपपर भाव जातो. मोबाईलच्या भाषेत सांगायचं तर एक वर्ष टिकणारी व्हॅलीडीटी व रिचार्ज पंढरपूरचा विठोबा माऊली आपणाला देतो.
सारं काही सरकार, राजकारणी करतील असं न म्हणता आम्ही विकासाची प्रक्रिया सुरु करु हे आत्मभान जागं करण्याचं काम ‘भगीरथ‘ सारखी संस्था करते आहे. त्यातून लोकचळवळ उभी रहात आहे. बँक, प्रशासन, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्था हे विकासाचे पंचक असतात. तुम्ही विचाराल, यामध्ये भीम कोण? अर्जुन कोण? उत्तरादाखल एवढेच सांगतो, माणूस हा संस्काराने बदलतो. रुपक हे समजण्यासाठी असतं. कोकणी पद्धतीने त्याचे विश्लेषण करुया नको. गिरणी बंद झाल्या. चाकरमानी मनीऑर्डर बंद झाली. चीपीचे विमानतळ, सी वर्ल्ड, सेझचे पडघम वाजत आहेत. डेअरीचा मुद्दा चर्चेमध्ये येत आहे. हे सर्व शुभसंकेत आहेत. आपण या सर्वांच्या स्वागतासाठी तयार होऊया. मंदिरांचे जीर्णोद्धार करुन झाले की गावामध्ये इंटरनेट, शिष्यवृत्तीचा क्लास आपणच सुरु करुया. ही आपली सर्वांची गरज आहे. भविष्याचं हेच आपल्याला सांगणं आहे. मुळातच उशीर झालाय. आता झोप तर सोडाच पण झोपेचं सोंगही नको. एक ना एक दिवस उलटी मनीऑर्डर ‘कोकणातून मुंबईला‘ पाठवायची आहे. गावच्या पाषाणाला स्वयंसेवी संस्था म्हणून हेच आपलं
गा-हाणं आहे. पाव रे देवा!!
-डॉ. प्रसाद देवधर
भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान,झाराप,
ता. कुडाळ. ९४२२५९६५००.

संपादकीय *
सत्ता, संपत्ती हेच उद्दिष्ट?
८ डिसेंबरला होणा-या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सरकारच्या निवडणुक आयोगाने प्रभाग रचनेत बदल करुन निवडणुक लढवू इच्छिणा-या उमेदवारांची खूपच गोची करुन ठेवली आहे. त्यात पुन्हा महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव केल्याने बरेच उमेदवार निवडणूकीपूर्वीच पराभूत झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः नगरपालिकांच्या प्रभाग रचनेबाबत निवडणुक विभागाने मनमानी बदल करण्यात सातत्य दाखविले आहे. अर्थात राज्य सरकारच्या आदेशानुसारच हे प्रयोग चाललेले असतात.
लोकसंख्या आणि सलगता इत्यादी निकषांवर नगरपालिकांचे वॉर्ड पाडण्यात येतात, त्यानुसार सिधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही नगरपालिकांमध्ये प्रत्येकी १७ वॉर्ड करण्यात आले आहेत. निवडून आलेल्या सतराजणांतून एक नगराध्यक्षपदी विराजमान होतो.
स्थानिक जनतेची कोणतीही मागणी नसतांना सुमारे तीस वर्षापूर्वी नगराध्यक्ष हा संपूर्ण न.प. क्षेत्रातील सर्व मतदारांनी निवडून देण्याचा प्रयोग झाला. त्यामुळे वार्ड निहाय निवडून येणारे नगरसेवक तसे नामधारीच ठरु लागले. पाच वर्षासाठी नगराध्यक्षांचा एकछत्री अंमल सुरु झाला. त्याचे परिणाम किवा दुष्परिणाम कोकणात फारसे नाही पण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ वगैरे पट्टयात दिसून आले. संपूर्ण शहरातून नगराध्यक्ष निवडला गेल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात राजकीय वाद सुरु झाले. नगराध्यक्षांच्या राजकीय आकांक्षाही वाढल्या. त्यानंतर काही वर्षे निवडणुका न घेता सरकारने सरकारी प्रशासकांच्या हाती न.प.चा कार्यभार सोपविला. त्यामुळे विकास कामे करण्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याने जिथे चांगले, प्रामाणिक प्रशासक आले तेथे शहरात काही सुधारणा झाल्या.
पुढच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा फतवा जारी झाला. त्यावेळी नगराध्यक्षाची निवड नगरसेवकांनी दरवर्षी करण्याचाही प्रयोग झाला. त्यामुळे नगरपरिषदेत कायमच निवडणुकीचे वातावरण आणि नगरसेवकांमधील गटबाजी वाढीस लागली. पुढच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद पाच वर्षांसाठी स्थीर झाले. पण त्यांना नगरपरिषदेतील पक्षीय, पक्षांतर्गत गटबाजीला तोंड देत कारभार चालवावा लागला. त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नगराध्यक्ष शहरातील सर्व मतदारांनी निवडून देण्याचा प्रयोग झाला. त्यावेळी हे पद पाच वर्षासाठी होते. त्यातूनही अनेक ठिकाणी पक्षीय राजकारण व दबावामुळे अधिकार असूनही नगराध्यक्ष शहरातील विकास कामे करण्यात हतबल ठरले.
त्यानंतर पुन्हा नगराध्यक्ष सर्व मतदारांनी न निवडता निवडून आलेल्या नगरसेवकांतून निवडून देण्याचा फतवा निघाला. त्यातही नगराध्यक्षपद हे अडीच वर्षाकरिता ठेवण्यात आले. त्यामुळे पक्षीय आघाड्या, युत्या यांमध्ये मोडतोड होऊन राज्यात सत्ताधारी असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या सहकार्याने सत्तेत येऊन पुन्हा एकदा अजब युत्या - आघाड्यांचे दर्शन लोकांना घडले.
आता येत्या निवडणुकीत वॉर्ड रचना रद्द करुन चार - चार वॉर्ड एका प्रभागात घालण्यात आले त्या संपूर्ण प्रभागातील मतदारांनी चार उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. हाच प्रयोग पूर्वीही झालेला होता. त्यातून चांगले निष्पन्न काय झाले हे कधीच कोणाला समजले नाही. आताही तोच प्रयोग राबविला जाणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कारभारात नेमक्या कोणत्या चांगल्या सुधारणा होणार ते कोणालाच सांगता येणार नाही.
नाही म्हणायला नगरसेवकांना अधुनमधून सुगीचे दिवस येतात. पूर्वीचे पक्षनिष्ठा, दिलेला शब्द पाळणे हे प्रकार मागे पडून साम -दाम-दंड आणि भेद याच गोष्टीवर भर देऊन निवडून येण्याचे प्रकार वाढीला लागले. पैशांचाही बेसुमार वापर होऊ लागला. ते पैसे पुन्हा वसुल करण्यासाठी नगरपरिषदांच्या विकासकामांतून कंत्राटदारांकडून आपली टक्केवारी ठरविणे किवा स्वतःच डमी कंत्राटदार पुढे करणे हे प्रकार वाढले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेसाठी आमदार निवडण्यासाठी एका नगरसेवकाच्या
हे सर्व पहात असलेल्या पण निवडून न आलेल्यांना, आरक्षणामुळे निवडणूक लढवू न शकलेल्यांना, नगरसेवकांची आर्थिक सुधारणा पाहून पुन्हा पुन्हा निवडणूक लढण्यासाठी स्फूर्ती आलेली आहे.
यंदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यात आघाडी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात संघर्ष पेटल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुक लढवतील आणि नारायण राणे यांचे राजकीय वर्चस्व संपविण्याकरिता राष्ट्रवादी पक्ष भाजप, शिवसेना, रिपब्लीकन युतीला निवडणुकीनंतर सत्तेचे समिकरण जुळविण्यास हातभार लावील. नवीनच उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही स्वबळावर या निवडणुकीत उतरण्याचे ठरविल्याने काँग्रेस पक्ष मनसेला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करील. या युत्या, आघाड्यांच्या मोडतोडीत पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळालेले अपक्ष म्हणून निवडणूक लढवून मतांच्या बेरीज-वजाबाकीतून किवा आपल्या आर्थिक ताकदीवर निवडूनही येतील. मग त्यांना आपल्या बाजूला वळवून सत्तेचे समिकरण जुळविण्याचे सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु होतील.
अर्थात हे सगळे अंदाज आहेत. पण यापुढे सत्ता संपादनासाठी दुस-सा पक्षाची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही याची कबुली सर्वच पक्षांच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी दिलेली असल्यामुळे अगदी तळाच्या नगरपालिकांच्या निवडणुकांतही हे घडणे अपरिहार्य आहे.
या सर्वांमध्ये आपल्या शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करणे हे सूत्र कोणाकडेही नाही. येनकेन प्रकारे सत्ता मिळविणे आणि प्रत्येक विकास कामांत लोककल्याणकारी योजनांत टक्केवारीने पैसे मिळविणे हेच सर्वांचे उद्दिष्ट आहे!

विशेष *
श्री देव रामेश्वर जत्रोत्सव सोमवार २१ नोव्हेंबर २०११
प्रत्येक वेंगुर्लेकर ज्याच्या चरणी नतमस्तक होतो असे वेंगुर्लेवासीयांचे आराध्य दैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव कार्तिक वद्य ११, सोमवार दि. २१ नोव्हेंबर २०११ रोजी संपन्न होत आहे.
ग्रामदैवताची जत्रा म्हणजे घरचा उत्सव या नात्याने उत्सव प्रिय कोकणी माणूस त्याचे स्वागत करतो. प्रत्येकाकडे या निमित्ताने पै-पाहुणे, माहेरवाशिणी यांचे आगमन होते. त्यामुळे वातावरण आनंदी असते. वेंगुर्ल्याच्या जत्रौत्सवात श्री देवी सातेरीच्या जत्रेनंतर होणारी ही दुसरी मोठी जत्रा.
पहाटे श्री रामेश्वराची विधिवत पूजा झाल्यावर जत्रौत्सवास सुरुवात होते. भाविक सकाळपासूनच दर्शनाला गर्दी करतात. नारळ, केळी, फुले, बेल श्रींचरणी अर्पण करुन मनोभावे कृपेची मागणी करतात. मंदिर फुलांनी सजविले जाते. आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. जसजशी संध्याकाळ होत जाते तशी उत्सवाची मजा वाढत जाते. मंदिराभोवती मिठाईची, खेळण्यांची, दुकाने लागलेली असतात. गर्दीने आवार फुलून गेलेला असतो.
रात्रौ सुमारे ११ वाजता श्री देवी सातेरी व तरंग देवता यांचे सवाद्य मिरवणुकीने आगमन होते. त्यानंतर या देवतांसह श्री रामेश्वर, गणपती, भगवती, दत्त, नागनाथ व लालखी या सह मंदिराला प्रदक्षिणा होते. त्यावेळी फटाके - दारुसामानाची आतषबाजी केली जाते. पालखी प्रदक्षिणे नंतर वालावलकर मंडळाचे पारंपारिक पद्धतीने दशावतारी नाटक होते. त्यानंतर जत्रौत्सवाची सांगता होते.
ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला प्रचिती येते. अनेक जण इच्छापूर्तीसाठी नवस बोलतात. जत्रौत्सवाचेवेळी किवा नंतर तो फेडतात. अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, रामेश्वराला दहीभात लिपणे, नैवेद्य दाखविणे असे नवस असतात.
या मंदिरामध्ये श्री बाराचा नितकारी, गणपती, भगवती, नागनाथ, दत्त, शनि, मारुती व राम या परिवार देवता असल्याने एकाचवेळी सर्व देवतांचे दर्शन घडते. शिवाय या देवतांचे उत्सव, जयंत्या व वर्धापनदिन साजरे होत असल्याने महिन्याला एक तरी उत्सव होत असतो. त्यात महाशिवरात्र, आषाढातील भजनी सप्ताह, श्रावणातील सोमवारी होणा-या वरदशंकर पूजा, जत्रौत्सव व माघ महिन्यातील श्री गणेश जयंती हे उत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरे होतात. त्यांची लोक आतूरतेने वाट पहात असतात.
या वर्षीच्या जत्रोत्सवाचा व त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी देवस्थान ट्रस्टतर्फे विनंती करण्यात येत आहे.

श्री गावडेश्वर जत्रोत्सव - बुधवार दि. २३ नोव्हेंबर २०११
सुमारे ३५० - ४०० वर्षापूर्वीच्या या स्वयंभू देवस्थानाला शिवकालीन परंपरा लाभली आहे. मंदिराचे बांधकामही भव्य आहे. देवस्थान संपूर्ण जागृत असून समस्त भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गावडेश्वर, वस, मूळपुरुष, सिद्धपुरुष, आदिमाया, देवी, ब्राह्मण, चाळा, रक्षक, नितकारी, दांडेकर असा या देवस्थानचा पंचायतन परिवार आहे.
गावडेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा देवस्थानचा असून त्यावर घरे, दुकाने बांधली आहेत. त्या जमिनीसाठी देवस्थानला प्रतिवर्षी तेलाच्या रुपाने वंत मिळतो
कार्तिक त्रयोदशीला होणा-या जत्रौत्सवात आदल्या दिवशी महानैवेद्य दाखविला जातो. नंतर सर्वांना महाप्रसाद होतो. जत्रौत्सवाच्या रात्री श्री देव रामेश्वराची पालखी व तरंगदेवता भेटीला येतात. गावडेश्वराची पालखी बाराचा पूर्वस येथे येऊन रामेश्वराच्या पालखीची भेट होते. त्यानंतर दोन्ही पालख्या गावडेश्वर मंदिरात जातात.
जत्रेला मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट केली जाते. रात्री फटाक्यांची आतषबाजी आणि मामा मोचेमाडकर दशावतारी नाटकाने जत्रेची सांगता होते..

मतदानाचा हक्क!
आपल्या भारतामध्ये लोकशाहीला प्राधान्य दिले आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांकडून, लोकांसाठी चालवलेले राज्य. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या त्या देशात लोक स्वतःचे राज्य स्वतः चालवत असतात आणि माध्यम असते ते मतदानाचे आणि हेच मतदान त्या राज्याचे किवा देशाचे भविष्य ठरवते. म्हणजे मतदान किती श्रेष्ठ आणि महत्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीत प्रत्येक देशाची सत्ता त्या देशातील नागरिकांच्या हातात असते. म्हणजेच प्रत्येक नागरिकाच्या हातात देश चालवण्याची ताकद असते. पण प्रत्येक नागरिक या ताकदीचा वापर हवा तसा करतोच असे नाही. स्वतःच्या विकासा -साठी मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावतोच असे नाही.
पूर्वी राजा-महाराजांच्या काळात ‘मतदान‘ या शब्दाला काहीच महत्व नव्हते. कारण एखाद्या प्रदेशाचा राजा त्याच्या घराण्यातूनच वारस म्हणून येईल. मग तो कोणत्याही विचाराचा असो, कितीही सुमार बुद्धीचा असो, न्यायी असो वा अन्यायी असो. पण आज आपल्या देशाचा नेता निवडण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना आहे. म्हणजेच नागरिक हे या देशाचे राजे आहेत. पूर्वी एखाद्या देशाचे त्याच्या राजावरुन भविष्य ठरत असे. पण आज आपल्या देशाचे भविष्य आपण ठरवू शकतो. मतदानाच्या माध्यमातून आपण आपलाच विकास करु शकतो. असा श्रेष्ठतम हक्क आपल्याला मिळालेला आहे. देशासाठी, स्वतःसाठी हा हक्क बजावणे आपले कर्तव्य आहे.
आज आपल्या देशाची परिस्थिती पाहिली तर त्यात प्रामुख्याने भ्रष्टाचार, अनेक घोटाळे, गैरव्यवहार दिसतात. या विकसनशील देशात सत्तर टक्के भ्रष्टाचार आहे आणि तर विकसीत देशात हे प्रमाण फारच कमी आहे. विकसनशील आणि विकसीत या दोन शब्दांमधील अंतर हा भ्रष्टाचारच ठरवतो. कारण जिकडे भ्रष्टाचार कमी तिकडे विकास जास्त आणि भ्रष्टाचार जास्त तिकडे विकास कमी. मतदानाच्या हक्कामुळे आम्हीच येथील राजे आहोत ना? या देशाचे नेते आम्हीच आहोत ना? मतदानातून आम्ही जे प्रतिनिधी निवडून देतो, ते प्रतिनिधी सत्ता चालवण्यास योग्य आहेत म्हणून निवडून देतो ना? मग त्यानी भ्रष्टाचार केला तर ते दोषी का? आम्ही दोषी का नाही?
मतदानाने लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. तो हक्क आपण बजावला पाहिजे. मतदान कोणाला करायचे आहे हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. भ्रष्टाचारी व्यक्तीला माझे मतदान होणार नाही याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षाला मत घातले तरी तो तेच करणार. मग मतदान करायचे कशाला? मतदानासाठी रांग लावायची कशाला? अशा विचारांच्या लोकांनी न्यूनगंडात न जाता, जो तुम्हाला पसंत पडेल असा प्रतिनिधी उभा करा. संघटीत व्हा आणि एकमताने त्याला विजयी करा. निदान निवडलेल्या प्रतिनिधींच्या अधिकारात असलेल्या विभागाचा विकास तुम्ही स्वतः करु शकाल. कायद्याने मतदानाचा हक्क नागरिकांना दिला आहे. पण आपले मत ‘दान‘ करण्याच्या योग्यतेसाठी आपली तयारी करणे, स्वतःला त्या पात्रतेसाठी योग्य बनवणे फार गरजेचे आहे. माझ्या प्रभागामध्ये उभे राहिलेले उमेदवार यांच्या चारित्र्याची मला जाणीव आहे का? समाजात त्यांची वागणूक चांगली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्येक नागरिकाने मिळवणे फार महत्वाचे आहे. मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.
‘‘मी जर मतदान केले नाही, तर कोणी निवडून यायचा काही थांबणार नाही. माझ्या एका मताने काय होणार आहे? उगाच कशाला वेळ घालवायचा?‘‘ अशा नैराश्यवादी आणि अधोगतीला मदत करणा-या विचारांचे प्रवाह हे प्रत्येकाच्या मनात असतात. पण तुम्ही स्वतःला या देशाचे नागरिक समजत असाल आणि स्वतःच्या विकासासाठी प्रयत्नशील असाल तर ह्या विचारांना बांध घालणे गरजेचे आहे.
मतदानाचा हक्क बजावताना इतर काही गोष्टी ध्यानात घेणे फार महत्वाचे आहे. जसे की, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच कोणत्याही दबावाखाली मतदान करु नये. जर आपण आमिषाला बळी पडून मतदान केले तर त्या मतदानाचा काहीच फायदा नाही. उलट तो आपल्यालाच त्रास आहे. कारण एखाद्या उमेदवाराकडून घेतलेले आमिष हे आपल्याला त्या उमेदवाराचे गुलाम करुन सोडते. आपण जर आमिषाला बळी पडलो तर त्या उमेदवाराच्या चुकांवर आपण बोट ठेवू शकत नाही आणि स्वतंत्र भारतात गुलामगिरी पत्करणे याच्यासारखा अपमान कुठेच नाही. हे आमिष तत्काळ फायदा देणारे असते. त्यातून काहीच साध्य होत नाही. त्याचप्रमाणे निवडणुकीत उमेदवाराचे खरे कार्य कसे आहे? आजपर्यंत त्यांनी किती कामे पूर्ण केली आहेत? समाजाला त्याचे कार्य हितावह आहे की नाही हे नीट पहावे. आमचे घराणे, आमच्या घरातील जाणते पूर्वीपासून अमूक पक्षाचे बांधील आहेत म्हणून आम्ही त्यांच्याच बाजूने रहाणार असे न म्हणता नेहमी चांगल्या प्रतिनिधीत्वाच्या बाजूने रहावे. आपले मत कोणत्याही पक्षाशी बांधील न ठेवता ते स्वतंत्र ठेवावे. मतदान यंत्रणा कशी आहे याकडे नीट लक्ष द्यावे. मतदान काळात होणा-या गैरप्रकारांना विरोध करुन ते प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाविषयी जागरुक राहून कायद्याने ठरवल्याप्रमाणे त्या त्या पातळीवरील मतदानात सहभागी होऊन स्वतंत्र मनाने, स्वतंत्र विचाराने, आपले मत कोणाशीही बांधील न ठेवता गुप्त मतदान करुन आपला हक्क बजावला पाहिजे.
(सिधुदुर्गच्या जिल्हाधिका-यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील बक्षिसपात्र लेख, त्यांनी निवडलेल्या पहिल्या पाच नामांकनातील हा लेख संकलीत स्वरुपात दिला आहे.)
-गोविद मोरजे, वेंगुर्ले

न.प.निवडणुकीनिमित्ताने जिल्ह्यात मनाई आदेश
सिधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस नेते नारायण राणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव या आघाडी राज्य सरकारमधील दोन्ही मंत्र्यांमध्ये पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबरला होणा-या दोन्ही जिल्ह्यांतील नगर -पालिकांच्या निवडणुकीत आणखी काही ‘राडा‘ होऊ नये यासाठी ८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीकरिता दोन्ही जिल्ह्यांत मनाई आदेश जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी जाहीर केला आहे.

कुडाळ बकालच!
एम.आय.डी.सी.,उद्यमनगरी येथील व्यवसाय-उद्योग व सिधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर काही वर्षे तेथे असलेली सर्व जिल्हा सरकारी कार्यालये यामुळे उर्जितावस्थेस आलेले कुडाळ शहर बकालच राहिल्याचे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश बखोरीया यांनी कुडाळ येथे घेतलेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीस कुडाळ ग्रा.पं.सदस्य, महसूल व जि.प.चे अधिकारी आदी उपस्थित होते.
निवासी संकूल इमारतींचे बांधकाम, सांडपाणी -कचरा व्यवस्था अनियमित, रस्तेही खराब, अतिक्रमित बांधकामे याबाबत योग्य नियोजन न करणारी ग्रामपंचायत व तेथील लोकप्रतिनिधी यामुळे कुडाळ शहर बकाल झाल्याचे सांगण्यात आले.

सिटीस्कॅन मृत!
सिधुदुर्गनगरीतील जिल्हा रुग्णालयात अकरा वर्षापूर्वी सुमारे अडीच कोटी रुपये ख्रर्च करुन बसविण्यात आलेले सीटीस्कॅन मशीन तंत्रज्ञ नसल्याने अनेक वर्षे बंद होते. नंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. अकरा वर्षात सुमारे दहा हजार जणांनाच या सिटीस्कॅन यंत्राचा उपयोग होऊ शकला. रेडिऑलॉजिस्ट नसल्याने बाहेरुन रिपोर्ट घ्यावा लागत होता. आता पुन्हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी सुमारे ३२ लाखाचा खर्च आहे. दरम्यान डिसेंबर ११ मध्ये या मशिनचे आयुष्य संपत आहे. त्यामुळे नवीन यंत्र खरेदी करावे लागणार आहे. सीटीस्कॅनसाठीची युपीएस यंत्रणा चार वर्षे बिघडलेली आहे. त्यासाठी १६ लाखाचा खर्च आहे. जिल्हा रुग्णालयातील २ व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एकमेव व्हँटीलेटर बंद आहेत. जिल्ह्यासाठी २ बालरोगतज्ञ, २ भूलतज्ञ, २ अस्थिरोग तज्ञ, १ जनरल सर्जन, १ पॅथॉलॉजिस्ट, दोन भीषक पदे रिक्त आहेत. ती त्वरीत भरली जाणे आवश्यक झाले आहे.

आंबा पिशवीत ठेवा - रिलायन्सचा सल्ला
विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करुन आंबा फळ सुरक्षित वाढविता येईल अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक सत्यजीत भोसले यांनी हॉटेल लौकिकच्या सभागृहात घेतलेल्या आंबा बागायतदारांच्या सभेत प्रात्यक्षिकांसह दिली.
आंबा फळ हे अंडाकृती आकाराचे झाल्यावर त्यावर प्लास्टिक कोटेड बनविलेल्या पिशव्या (प्रत्येक फळास) बांधल्यामुळे थ्रीप्स, तुडतुडे, अन्य किटक तसेच हवामान, पाऊस यांपासून संरक्षण मिळते. त्या फळावर रायायनिक परिणाम होत नाही. अशा पिशव्यांचा वापर अनेक प्रगत देशात केला जातो. गेल्यावर्षी मोहन सोमण-देवगड व उमेश लांजेकर-रत्नागिरी यांच्या आंबा बागेत या पिशव्या वापरण्यात आल्या. तो प्रयोग यशस्वी ठरला. यावेळी त्यांनी वेंगुर्ल्यातील बागायतदारांना १ हजार पिशव्या मोफत वाटल्या.
आंबा मोहोरावर कीटकनाशकांच्या ४ ते ५ फवारण्या कराव्या लागतात. त्याशिवाय हवामान विपरीत आले तर अन्य रोगकिडीचाही प्रादुर्भाव होतो. त्या सा-यातून बचावलेले आंबा फळ सुरक्षित राहिले तरच या नव्या प्रायोगिक पिशव्या फळांना बांधता येणार. शिवाय जुन्या लागवडीतील उंच झाडांवरही आंबा फळांना अशा पिशव्या बांधणे अवघड आणि अशक्य कोटीतील काम आहे हे लक्षात घेऊन रिलायन्सचे अधिकारी १० फूट उंचीच्या झाडांवरील आंबा फळांना यावर्षी प्रायोगिक स्वरुपात पिशव्या बांधा व त्याचा चांगला अनुभव आला तर पुढचे पहा असा सल्ला देण्यास विसरलेले नाहीत.
ही खास पिशवी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने प्रयोग करुन शिफारसीसाठी योग्य ठरविली आहे की नाही हे समजू शकलेले नाही.

No comments:

Post a Comment