Sunday 10 October, 2010

अंक ३७ वा, ७ ऑक्टोबर २०१०



अंक ३७ वा, ऑक्टोबर २०१०

।। संपादकिय।।

गांधी जयंती निमित्ताने.....

२ ऑक्टोबर हा महात्मा गांधी जयंतीचा दिवस देशभरातील सरकारी -निमसरकारी कार्यालयांना सुट्टी देऊन साजरा झाला. तशी दरवर्षीच २ ऑक्टोबरला सुट्टी असते. यावर्षी दुस-या दिवशी रविवार म्हणजे हक्काची साप्ताहिक सुट्टी असल्याने सर्वांनीच हे दोन्ही दिवस मौजमजेत घालविले. योगायोगाची आणि खेदाची गोष्ट म्हणजे ज्या ब्रिटिशांनी ज्या देशावर आपली जुलमी राजवट लादली त्या ब्रिटिश साम्राज्य शाहीतून स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची राष्ट्रकुल नावाचा क्रीडास्पर्धा गांधी जयंतीच्या दुस-साच

दिवशी दिल्लीत सुरु झाली आहे आणि तीही त्या ब्रिटिश राजसत्तेचे प्रतिनिधी युवराज चार्ल्स यांच्या प्रमुख उपस्थितीत! कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा या देशाच्या क्रीडा विकासाला, आपल्या देशाच्या विजेत्या खेळांडूमुळे देशाची प्रतिमा उंचावण्याला राष्ट्रभावना जागृत करण्यास पोषक असल्या तरी राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा ही ब्रिटिशांच्या गुलामगिरीची खुण आहे. याबद्दल कोणाचेही दुमत नसावे.

हा सगळा विरोधाभास पाहून बापूजींच्या आत्म्याला काय वाटत असेल असा भाबडा प्रश्न दरवर्षी गांधी जयंतीनिमित्ताने निरनिराळ्या व्यासपीठांवरुन केल्या जाणा-या भाषणांमधून केला जात असतो. आता गांधीजींच्या मनातला किवा स्वप्नातला भारत आणि आत्ताची देशाची सामाजिक स्थिती या गोष्टी विचारात घेतल्या तर गांधीजींचा आत्मा या भारत भुतलावर असणारच नाही. आहेत त्या गांधीजींबद्दलच्या बुजुर्गांच्या आठवणी. ज्यांचे वृत्तपत्रे आणि पुस्तकांच्या माध्यमांतून त्या दिवशी प्रगटीकरण होते.

गांधीजींचे जीवनकार्य जागतिक पातळीवर मान्यता पावलेले होते. अनेक देशांच्या स्वातंत्र्यसैनिकांनी गांधीजींच्या सनदशीर आंदोलनांपासून प्रेरणा घेऊन आपापल्या देशांना स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींचे तत्त्वज्ञान, सत्याचे प्रयोग, समाजभिमुखता, ग्रामस्वराज्य या संकल्पनांवर आजही अभ्यासपूर्ण लेखन प्रसिद्ध होत असते. जगभरातील अनेक विचारवंतांनी एक लोकोत्तर महामानव अशी उपाधी गांधीजींना दिली. पण आपल्याच देशात आपल्या विचारांचा पराभव होत असल्याचे पाहण्याची पाळी गांधीजींवर त्यांच्या हयातीतच येऊ लागली होती. ती पाळी आणली त्यांच्या अनुयायांनीच. हे कटू असले तरी विदारक सत्य आहे. वस्तुनिष्ट इतिहास लिहिणा-या अनेक इतिहासकारांनी आणि विचारवंतांनी तत्कालीन घडामोडींचे विश्लेषण करुन हे स्पष्टपणे लिहिलेले आहे. गांधीजींची हत्या नथुराम गोडसे या माथेफिरुने एकदाच केली. पण नंतरच्या आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी गांधी विचारांची हत्या करणे चालूच ठेवलेले आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करा अशी सूचना गांधीजींनी केली होती. ती काँग्रेसजनांना कधी मान्य होणे शक्यच नव्हते. कारण, काँग्रेस पक्षाच्या शिडीवरुन सत्तेचे शिखर गाठता येईल हे तत्कालीन राजकारण्यांना चांगलेच माहित झाले होते. आजही त्यामध्ये काही फरक पडलेला नाही.

या काँग्रेसची भारतात स्थापना कोणी केली तर ह्युमया ब्रिटिश राजकारण्याने! त्यामागे त्याचा उद्देश देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा नव्हता तर सनदशीर मार्गाने जाणारी संघटना स्थापन करुन ब्रिटिशांना तापदायक ठरलेल्या सशस्त्र क्रांतीकारक संघटनांना आवर घालता यावा हाच उद्देश होता. सुदैवाने त्या काँग्रेसची सूत्रे अत्यंत चारित्र्यवान आणि लोकोत्तर अशा भारतीय नेत्यांच्या हाती आली म्हणूनच काँग्रेस ही स्वातंत्र्य प्राप्तीचे एक साधन ठरली. त्या ह्युमने स्थापन केलेल्या काँग्रेसलाही १२५ वर्षे झाली म्हणून काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरुन काँग्रेसचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष समारंभ साजरे केले जात आहेत.

देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तरी दुस-या बाजूने बहुराष्ट्रीय कंपन्यांची आर्थिक गुलामगिरी आपण स्विकारु लागलो आहोत. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीला आणि ग्रामस्वराज्य या आदर्श संकल्पनेला आपण केव्हाच मूठमाती दिली आहे आणि आपली वाटचाल नव्या गुलामगिरीकडे सुरु झालेली आहे. कशी ते प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारातूनच पहावे. गांधीजींच्या स्वदेशी आणि ग्रामस्वराज्य या दोन्ही विचारांना प्रत्यक्षात आणायचे नव्या पिढीने ठरविले तर आपला देश प्रगतीच्या शिखरावर पोचेल. तेव्हाच आपण गांधीजींचे पुण्यस्मरण करण्यास पात्र ठरु.

।। अधोरेखित ।।

रस्ता तेथे खड्डा!

रस्त्यांची दूर्दशा हा विषय कोकणाला नवीन नाही. मुळातच डोंगराळ प्रदेशामुळे गावागावात जाणारे छोटे मोठे रस्ते उंच सखल, चढ उतारांचे आणि वळणावळणांचे. राष्ट्रीय महामार्ग म्हणून ज्याला नाव दिलेले आहे तो मुंबई-कोकण-गोवा महामार्गही या चढउतार आणि वळणावळणांतून सुटलेला नाही. अर्थात याला कोकणाची भौगोलिक परिस्थितीही कारण आहे. परंतु असे असले तरी अशा रस्त्यांची नियमित देखभाल, दुरुस्ती होत राहणे हा एकमेव उपाय हे वळणावळणांचे रस्ते सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक आहे.

दुसरी गोष्ट नैसर्गिक. कोकण हा राज्याच्या इतर भागांपेक्षा खूप पावसाचा प्रदेश. या दिवसात नवीन काही बांधकाम करणे सोडाच पण दुरुस्तीही करणे अवघड बनते. घाटरस्त्यांमध्ये दरडी कोसळून रस्ता बंद होणे हे नित्याचेच झाले आहे. यावर्षी आंबोली घाटात मोठ्या दरडी कोसळल्यामुळे अनेक दिवस वाहतुक बंद राहिली. या दरडींचाही धोका अद्याप टळलेला नाही. इतर सर्व घाटांप्रमाणेच आंबोली घाटही वळणावळणांचा, एका बाजूला खोल दरी तर दुस-या बाजूला उंच डोंगर असा आहे. या डोंगरावरील दगड ठिसूळ बनत चालला आहे. असे मोठमोठे दगड मातीसहित खाली रस्त्यावर येऊन पडतात. आंबोली घाटाचा डोंगराकडील भाग बराचसा धोकादायक झालेला आहे. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता काढण्याचे काम आता सुरु झाले आहे. अर्थात ते प्रत्यक्षात सुरु होऊन पूर्ण व्हायलाही किमान दहा वर्षे लागतील. तोपर्यंत प्रत्येक पावसात व नंतरही लोकांना नशिबावर हवाला ठेवून या रस्त्याने प्रवास करीत रहावे लागणार आहे.

पावसाच्या या नैसर्गिक कारणामुळे घाटरस्त्यांची दुर्दशा होतच असते. पण महामार्गापासून गावागावात पोचलेल्या रस्त्यांचीही बरीचशी दुर्दशा झालेली आहे. निरनिराळ्या योजनांतून सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम खाते ग्रामीण-शहरी भागातील रस्त्यांची कामे करीत असते. त्या कामांसाठी मंजूर असलेला निधी काम पूर्ण होण्यास पुरेसा असतो. पण त्या निधीमध्ये संबंधीत खात्यांचे अधिकारी आणि गावापासून तालुक्यापर्यंतचे काही लोकप्रतिनिधी वाटेकरी असतात. ती कामे घेणारे ठेकेदार संबंधितांचे ठरलेले वाटे घालून पुन्हा आपला नफाही काढत असतात. मग प्रत्यक्षात या रस्त्यावर निधी खर्च होणार किती? आणि कामाचा दर्जा काय राहणार? मंजूर रक्कम सर्वच्या सर्व या रस्त्यांच्या कामासाठी खर्च होऊच शकत नसल्याने जेमतेम पावसाळ्यापर्यंत टिकेल, बरे दिसेल असे रस्त्याचे काम केले जाते. ते कसे हे संबंधितांना चांगलेच माहित असते. हा रस्ता मग पहिल्याच पावसाळ्यात उखडू लागतो. अवजड वाहतुक खूप असेल तर रस्त्याला भलेमोठे खड्डे पडतात किवा वरचे डांबरीकरण वाहून जाते. अगदी ग्रामीण भागातच हे घडते असे नाही तर राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गातही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. बरेच रस्ते उखडले आहेत. साईडपट्ट्या खचल्या आहेत. याच रस्त्याने मंत्री, अधिकारी व अन्य नेते मोटारीतून प्रवास करीत असतात. पण कोणीच रस्त्यांच्या या स्थितीची दखल घेताना दिसत नाहीत. या खड्ड्यांमुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही घडले. अनेकांना त्यात जीव गमवावा लागला तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले. असे झाले की स्थानिक लोक ओरड करतात. वृत्तपत्रातून बातम्या अगदी फोटोसह प्रसिद्ध होतात. पण पुढे सर्व शांत. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांची ही परिस्थिती आहे.

कोकणातील भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती विचारात घेऊन मुख्यतः रस्ते विकासाच्या कामांसाठी वेगळे निकष लावून अधिक निधी सरकार देईल अशा घोषणा गेली कित्येक वर्षे होत आहेत. परंतु ती घोषणा प्रत्यक्ष अंमलात आल्याचे, नव्या निकषांप्रमाणे अधिक निधी मिळाल्याचे कोणीच कधी जाहीर करीत नाही. कदाचित यातही काही गोलमाल असावी.

रस्त्यांमधले खड्डे ही गोष्ट अतीच झाल्यामुळे विद्यमान सत्ताधा-यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधातले राजकीय पक्षही आता जागे झाले आहेत. त्यांनी रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम जाहीरपणे करुन सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला आहे. यामुळे रस्त्यांमध्ये अपेक्षित सुधारणा होईल तेव्हा होईल, पण या प्रश्नाकडे सरकारचेच नव्हे तर एरवीही उदासीन असणा-या करदात्या जनतेचे लक्ष वेधले गेले आहे.

सध्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दोन्ही पक्षांत विविध कारणांनी जुंपली आहे. अर्थात ही भांडणे विकासाच्या मुद्द्यावरुन नव्हेत तर लाभाची पदे (मंत्रीपद, महामंडळाचे अध्यक्षपद वगैरे) यासाठी. तसेच श्रेयवादावरुनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जाहीरपणे वादविवाद सुरु आहेत. सिधुदुर्ग जिल्ह्यातील याचे ठळक उदाहरण म्हणजे कोकण रेल्वेचे टर्मिनस. ते सावंतवाडी रोडला व्हावे की मडुरे येथे यावरुन दोन्ही पक्षांचे तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवरील कार्यकर्ते बाह्या सरसावून उभे आहेत.

रस्त्यावरील खड्डे हा विषय खरे तर सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात वादाचा असला पाहिजे. तसा तो आहेही. पण आता मुंबई-कोकण-गोवा महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणाचे जाहीर कार्यक्रम करुन राष्ट्रीवादीनेही नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाविरुद्ध आघाडी उघडून घरचा अहेर दिला आहे.

आता रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणारे समजा कधी सत्तेवर आले तर त्यावेळी असाच रस्ता खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आज सत्ताधारी असलेले काँग्रेस आघाडीतील कार्यकर्ते हाती घेतील. एकूण काय तर रस्ते आहेत तेथे खड्डे हे राहणारच!

-श्रीधर मराठे

।। सण आणि उत्सव ।।

अश्विन मास

नऊ दिवस व्रत करुन upavaa करुन स्वतःवर आधी विजय मिळवायचा व दहाव्या दिवशी सीमा ओलांडून पराक्रम करायला बाहेर पडायचे आणि सीमेबाहेर असलेल्या शत्रूंशी युद्ध करुन मुबलक संपत्ती गोळा करायची, समृद्धी आणायची याला म्हणतात दसरा. विजयादशमी. ह्या नऊ दिवसांचा प्रारंभ होतो आश्विन शुद्ध प्रतिपदेला. युद्धावरुन परत आल्यावर सर्व संपत्तीची पूजा करुन ती आप्त स्वकीयांमध्ये वाटून टाकायची. याला म्हणायचे दिवाळी. आज दसरा व दिवाळीचा सण म्हणजे केवळ आनंदोत्सव मजाच मजा असते.

गणपतीचा सण संपला की, म्हाळवस सुरु होतो. म्हणजे पितृपक्ष सुरु होतो. पितरांच्या स्मृती जागृत करताना, गावामध्ये तर वाडीतील सर्व माणसांना जेवयाला बोलावले जाते. सर्वसाधारणपणे खीर व उडीद तांदुळाचे तळलेले वडे हा मेनू असतो. हे पचायला चांगलेच जड जेवण मात्र वातावरणाच्या परिणामामुळे सहज पचून जाते.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र. नवरात्रामध्ये देवीसमोर अखंड नंदादीप म्हणजे तेलाचा दिवा लावलेला असतो. पेटता दिवा हे समृद्धीचे प्रतिक आहे. त्यापासून प्रसन्नता मिळते. शांतीची अनुभूती येते. दिवा हे तेजाचे प्रतिक आहे. अग्निपेक्षा शुद्ध काहीही नाही. अग्निमध्ये जे जाते ते शुद्ध होऊनच येते. या ज्योतीकडे पाहून अशी प्रार्थना केली जाते की, ‘माझ्या मनातील वाईट विचार या अग्नित जळून भस्म होऊ देत. माझं मन शुद्ध होऊ दे.‘ ‘शुभं करोती कल्याणम्, आरोग्यम् धन संपदाया ओळीत धनाबरोबरच आरोग्याची प्राप्ती दडलेली आहे. कोणीतरी अनुभव घेतल्याशिवाय या श्लोकांची निर्मिती केलीच नसणार, याचा अर्थ दिवा लावल्यामुळे आयुष्यात वाढ नक्की होत असली पाहिजे, ती कशी होत असेल ते आपण शोधले पाहिजे.

नवरात्रात नऊ दिवस देवासमोर सात प्रकारच्या धान्याचे रुजवण घालतात. म्हणजे घटस्थापनेला परातीमध्ये माती घेऊन त्यात हळदीचे पाणी टाकून सात प्रकारची धान्ये त्यात पेरली जातात. नऊ दिवस त्यांना रोज हळदीचे पाणी घातले जाते. नऊ दिवसांची वाढलेली ही रोपे दस-याच्या दिवशी देवाला वाहिली जातात किवा सुहासिनींना डोक्यात माळण्याकरिता वाटली जातात. केवळ एवढाच याचा अर्थ नाही. आज गव्हांकुर या औषधीला कॅन्सरसारख्या आजारात अतिशय छान गुण येत आहेत. केवळ गव्हाचेच नव्हे तर उपलब्ध सर्व कडधान्याचे पूर्ण वाढ झालेले अंकुर पोषणाचे उत्तम काम करतात. देवासमोरील हे रुजवण प्रसाद म्हणून भक्षण केले जावे किवा त्याचे तीर्थ करुन प्यावे म्हणजे नवरात्रीला पूर्णअर्थ प्राप्त होईल.

दस-याच्या दिवशी शमी तसेच आपटा या वनस्पतीचे पूजन, खंडे नवमीला शस्त्र पूजन केले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वांचार्यांनी वनस्पतींमध्ये देव शोधला व त्याचे पूजन केले. संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेअसा अभंग लिहून वनस्पतींची किर्ती अजरामर केली आहे. वड, दुर्वा, बेल, तुळस, कडुनिब, शमी इ. कितीतरी वनस्पती पूजेकरिता वापरल्या जातात. एक तर वनस्पतींचे पूजन तरी केले जाते किवा वनस्पतींचा वापर देवतांच्या पूजनाकरिता केला जातो. जे देवाला ते देहालाहा नियम लावून पाहिल्यास प्रत्येक वनस्पतीचा औषधी गुण सणाच्या निमित्ताने चर्चेला यावा. पुढील पिढीला त्याची योग्य ओळख व्हावी हा त्या पूजनामागील हेतू आहे. अखंड वडाच्या झाडाच्या पूजनाऐवजी वडाच्या फांद्या तोडून त्याचे पूजन करायला कोणत्याही धार्मिक ग्रंथात सांगितलेले नाही. हे मुद्दाम या ठिकाणी सांगावेसे वाटते.

दस-याच्या निमित्ताने सीमोल्लंघन केले जाते ते वाईट विचारांचे असावे. शरीरातून वाईट विचारांना हद्दपार करणे म्हणजे सीमोल्लंघन होय. काम, क्रोध, भय, मोह, मद, मत्सर या षडरिपूंना मनातून योग्य वेळी बाहेर काढायला शिकले पाहिजे. निदान त्यांच्यावर नियंत्रण असलेच पाहिजे. आज तरुण वर्गाचा विचार केला तर त्यांचा राग कायम डोक्यातच असतो. तळपायाची आग मस्तकात पोचली असे त्यांना कधीच म्हणता येणार नाही. कारण ती आग त्यांच्या तळपायात कधी असतच नाही. नेहमी डोक्यातच असते.

शरद ऋतुतील आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या ऋतूत वातावरण पित्त वाढविणारे असते. चंद्रप्रकाशात पसरुन ठेवलेले व आटवलेले दूध, ज्यामध्ये वेलची, जायफळ, केशर, साखर इ. सुगंधीत पदार्थ घातलेले असतात, मनाला प्रिय असलेले नातेवाईक, मित्रमंडळी बरोबर असतात, एखाद्या तलावाच्या काठी किवा नदीच्या किनारी सर्वजण बसून हास्यविनोद, गायन, वादन, नृत्य आदि करमणूक करीत असतात. ही सिच्युएशनपित्त प्रकोप कमी करणारी असते. सणाच्या निमित्ताने आपल्याकडून आरोग्य पालन करुन घेतले जाते. ते असे-

याच दिवशी मोठ्या मुलाला आईकडून ओवाळले जाते. नातेसंबंध जोपासले जाणे एवढा सामाजिक दृष्टिकोन यातून जपला जातो. आज वृद्धाश्रम संस्कृती सगळीकडे फोफावते आहे हे चांगले लक्षण नाही. चांगल्या नातेसंबंधांची वाट लागल्याने वृद्धाश्रमांची गरज वाटू लागली आहे. जेव्हा मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेले हे वृद्धाश्रम वृद्धांच्या अभावी बंद पडतील तेव्हा समाज सुधारला असे ख-या अर्थाने म्हणता येईल. हे नातेसंबंध टिकविण्यासाठी सणांच्या माध्यमातून हे भावसंबंध वेगळ्या भावनिक पातळीवर घट्ट केले जातात. म्हणून तर दरवर्षी भाऊबीज, पाडवा असे सण साधून ओवाळणी करुन पवित्र अश्या दिव्याच्या साक्षीने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.

-वैद्य सुविनय दामले,

कुडाळ, भ्रमणध्वनी- ९४२११४७४२०

।। विशेष बातम्या ।।

झेंडामार्च

काँग्रेसला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा काँग्रेसतर्फे ग्राम ते सेवाग्राम उपक्रमांतर्गत झेंडामार्चचा शुभारंभ २९ सप्टेंबरला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. शिरोडा-मीठागर येथून वेंगुर्ले - कुडाळ मार्गे विदर्भातील वर्घा जिल्ह्यातल्या विनोबाजींच्या ज्या सेवाग्राममध्ये म. गांधींचे वास्तव्य झाले. तेथपर्यंत काँग्रेसचा झेंडा नेण्याचा हा अभिनव उपक्रम घेण्यात आला होता. सुरुवातीस वेंगुर्ले येथे खर्डेकर कॉलेज ते साई मंगल कार्यालयामार्फत रॅली काढण्यात आली.

या समारंभात काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दिवंगत कु. राणी वैभवी आंगचेकर आणि कु. राज वैभव आंगचेकर यांच्या स्मरणार्थ श्री. ज्ञानेश्वर आंगचेकर व कुटुंबियांतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. निबंध स्पर्धेचा विषय होता असा आहे काँग्रेस पक्षयातील विजेते पुढीलप्रमाणे १) हेमंत पाटकर (कणकवली), २) भक्ती बल्लाळ (कुडाळ), ३) रेश्मा मेस्त्री (देवगड), उत्तेजनार्थ - तेजस्विनी जाधव व सुप्रिया गावडे (कणकवली)

भंडारी पतपेढीच्या चेअरमनपदी श्रीकृष्ण पेडणेकर

सिधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्यादित वेंगुर्लेच्या चेअरमनपदी श्रीकृष्ण दत्ताराम पेडणेकर, तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश गडेकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या व्हाईस चेअरमन अॅड.चारुशिला तांबोसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक रमेश नार्वेकर, नंदन वेंगुर्लेकर, जगन्नाथ डोंगरे, अनिल कासकर, सारिका काळसेकर, रमण दाभोलकर, नीलेश चमणकर, शंकर केरकर तसेच कर्मचारी चित्रा दाभोलकर, दीपाली सापळे, हेमंत साळगांवकर आदी उपस्थित होते.

पंडीत वसंतराव गाडगीळ आणि सहाध्यायी यांचा सत्कार कार्यक्रम

वेंगुर्ल्यातील पाटकर हायस्कूलमधील पन्नास वर्षापूर्वीचा अकरावीचा वर्ग. या वर्गातील वेंगुर्ल्यातील वर्ग मित्रांचा एकत्र येण्याचा योग एका अनोख्या कार्यक्रमामुळे आला. पुण्यातील प्रसिद्ध संस्कृत पंडीत व या वर्गातील माजी विद्यार्थी पंडीत वसंतराव गाडगीळ यांच्या वेंगुर्ला भेटी निमित्त सर्व सहाध्यायी एकत्र आले होते. पंडीत गाडगीळ यांचेसह श्री. आत्माराम नाईक व श्री. बबन गावसकर यांच्या वयाची ऐशी वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुण्याचे प्रसिद्ध पंडीत पांडे शास्त्री यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सर्वांतर्फे सत्कार करण्यांत आला. श्री. शशिकांत कर्पे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास श्री. मनमोहन दाभोलकर, श्री. गजानन राजाध्यक्ष, श्री. जनार्दन चौकेकर हे सहाध्यायी आणि सौ. गाडगीळ, सौ. पांडे हजर होत्या. याप्रसंगी सर्वांनी सत्कारमूर्तींचा गौरव करुन त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी दशेतील अनेक सुखद आठवणींना या निमित्त उजाळा मिळाला आणि उपस्थीतांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

।। नवरात्रौत्सव ।।

श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ले

प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात दि. ८ ऑक्टोबर २०१० ते १७ ऑक्टोबर २०१० पर्यंत नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रोज संध्या. ५ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत अभंग, भक्तिगीत गायन,संगित,वारकरी, भजन, आरती. दि.१५ रोजी रात्रौ ११ वा. दिडी प्रदक्षिणा, दि. १६ रोजी सकाळी १० वा. नवचंण्डी होमहवन व पूर्णाहूती उत्सवाची सांगता.

श्री देवी सातेरी मंदिरातील नवरात्र महोत्सव पारंपारिक पद्धतीने केला जातो. सिधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी मंडळांचा बहारदार भजनांचा कार्यक्रम हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यानिमित्त प्रतिदिनी श्री देवीच्या नऊ रुपांचे दर्शन, आकर्षक, सजावट, पुष्पपुजा, संपूर्ण मंदिरास विद्युत रोषणाई अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तजनांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

मातोश्री कला क्रिडा मंडळ नवरात्रौत्सव

मातोश्री कला-क्रिडा मंडळ आयोजित नवरात्रौत्सव समिती अध्यक्षपदी सचिन शेटये तर उपाध्यक्षपदी दत्तप्रसाद आजगांवकर यांची निवड झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दि. ८ ते दि.१७ ऑक्टोबर २०१० या कालावधीत मातोश्री कला-क्रीडा मंडळच्यावतीने दाभोली नाका, वेंगुर्ला येथे सार्वजनिक नवरात्रौत्स-वाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम खालिलप्रमाणे -

दि. ८ रोजी श्री देवी दुर्गामातेचे पूजन, रात्रौ ८ वा. सुधीर कलिगण यांच्या कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळाचा सदाबहार नाट्यप्रयोग, दि. ९ रोजी ७ ते ८ रेकॉर्ड डान्स, रात्रौ ८ ते १० वेशभूषा स्पर्धा (वयोगट ३ ते ७ आणि ८ ते १५), दि. १० रोजी ७ ते ८ रेकॉर्ड डान्स, रात्रौ ८ वा. ओमकार दशावतार नाट्यमंडळ, उभादांडा यांचा नाट्यप्रयोग., दि. ११ रोजी रात्रौ ८ वा. जादूगार अवधूतयांचे जादूचे प्रयोग, (सुपरहिट-मॅजिक शो), दि. १२ रोजी रात्रौ ८ ते १० सरस्वती संगीत विद्यालय निर्मित लहान मुलांची संगीत रजनी स्वरपूजा‘ (संयोजक -सौ.अनघा गोगटे), दि. १३ व गुरुवार दि. १४ रोजी रात्रौ ७ ते १० दांडीया स्पर्धा, दि. १५ रोजी रात्रौ ८ वा. ऑर्केस्ट्रा झंकार‘ (सुतार बंधू, कोल्हापूर), दि.१६ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, रात्रौ ७ ते ८ विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण व मान्यवरांचा सत्कार, रात्रौ ८ वा. गौतमेश्वर प्रासादिक नाट्यमंडळाचा अर्धी मस्ती अर्धा ढाँगहा तीन अंकी नाट्यप्रयोग, दि. १७ रोजी संध्या. ५ वा. श्री देवी दुर्गामातेची विसर्जन. रोज रात्रौ ६ ते ७ भजन तसेच विविध दांडीया ग्रुपचा दांडीया व गरबा नृत्य होईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री कला क्रीडा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कॅम्प - कॉर्नर मित्र मंडळ

प्रतिवर्षाप्रमाणे कॅम्प कॉर्नर मित्रमंडळातर्फे श्री दुर्गा मातेचे पूजन व नवरात्रौत्सव दि. ८ ते १७ ऑक्टोबरपर्यंत संपन्न होणार आहे. त्यानिमित्त ६ ते ९ भजन,९ ते १० दांडिया तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रम होणार असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कॅम्प कॉर्नर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

तांबळेश्वर मित्र मंडळ

तांबळेश्वर मित्रमंडळातर्फे गाडीअड्डा येथे श्री दुर्गामातेचे पूजन व नवरात्रौत्सव दि. ८ ते १७ ऑक्टोबरपर्यंत संपन्न होणार आहे. त्यानिमित्त भजन, दांडिया तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.

भटवाडी येथे शतकोत्तर शारदोत्सव

वेंगुर्ले-भटवाडी येथील सांदेकर बालमंडळातर्फे साजरा होणारा सार्वजनिक शारदोत्सवाचे हे १०० वे वर्ष असून या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.१७ ते २३ ऑक्टोबर २०१० या कालावधीत पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.१७ रोजी सरस्वती पूजन, दि.१८ रोजी सायं.६ वा. ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार, दि. १९ रोजी सकाळी ८ वा. चित्रकला स्पर्धा, सायं. ६ वा. लग्नास २५ वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सत्कार, दि.२० रोजी श्रीसत्यनारायण महापूजा, सायं. ४ पासून तीर्थप्रसाद, सायं.६वा.स्वरपूजा-सरस्वती संगीत विद्यालय, वेंगुर्ले यांच्या छोट्या मुलांचा गायनाचा कार्यक्रम, दि. २१ रोजी सायं. ४ वा. महिलांसाठी पाककला स्पर्धा, सायं. ६ वा. सत्कार सोहळा-उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, सायं.७वा. जिल्हा-स्तरीय नृत्य स्पर्धा, दि. २२ रोजी सायं. ६ वा. वेशभूषा स्पर्धा, सायं. ७ वा. कला-क्रीडा-शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणार्‍या मुलांचा सत्कार, दि. २३ रोजी रात्रौ ९ वा. सरस्वती विसर्जन. तसेच कार्यक्रम कालावधीत रोज रात्रौ ८ वा. भजन तसेच दांडीया कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमांचा तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सांदेकर बालमंडळातर्फे करण्यात आले आहे.

।। ठेवणितला लोणचा ।।

ह्येंचो कौल कधी फेल नाय!

‘‘काय गो सोमन्या, तुजो घरवालो म्हणजे एकदम भारी हा!‘‘

‘‘व्हय तर! खयल्या गावकाराचो कौल देवी लावन घ्येना नाय, पण ह्येंचो खयलोव कौल ताबडतोब घ्येता. म्हणान तर सोमवार, गुरुवाराक आमच्याकडे हीऽऽ गर्दी आसता.‘‘

‘‘अगो तांच म्हणतय, तुज्याच घोवाचा कसा काय आयकता देवी? योक कौल घ्येवक नाय म्हटला तरी दोन-चार तास जातत. कधी कधी तर इरड मोडता. पण तुजो घोव धा-बारा मिन्टात दोघा-तिघांचे कौल लावन मोकळो. नाय म्हटला तरी सोमवार आणि गुरुवारचे शंबरेक नारळ लागी जातत आणि वरसून कोन काय दितत तां निराळाच!‘‘

‘‘व्हय बाये, लॉक दितत खुशीन. त्येंचा काम पटकन व्हता नाय? शेवटी आमचे ह्ये पण गावकारणीकच जलामलेहत मा! ह्येंचो कौल पण लॉक मानतत.‘‘

‘‘अगो पन तुजो घरवालो एकदम सादो, त्येचाच देवी कसा काय आयकता?‘‘

‘‘कोणाक तू सांगाचस नाय तर तुका सांगतय.‘‘

‘‘अगो मी कित्याक सांगा? सांग बघुया काय ता?‘‘

‘‘अगो, माज्या आयेन ह्येंका कौल कसो लावचो ता सांगल्यान.‘‘

‘‘काय सांगतहस काय? कसो गो?‘‘

‘‘अगो झाड तोडूचा आसा तर ता तोडूचा काय नको असो कौल मागायचो नाय, तर झाड मुळातसून तोडूचा तर उजवो दी आनि एक फूट सोडून तोडूचा तर डावो दी, असो देवीकडे कौल मागायचो. शेवटी देवी खयलोतरी कौल दितलीच आणि खयलोक कौल दिल्यान तरी तो घेणा-याच्या फायद्याचोच आसतलो.‘‘

‘‘अगो झोळग्या, म्हणजे तुमी लोकांका बनयताहास मगो!‘‘

‘‘अगो लागो-या, तू माका काय शिकयतस? अगो कौल आपल्या मनाचो घ्येवचो आसता. जी मानसा कौल घ्येवक येतत ती ब-या मनाची थोडीच आसतत? म्हणान तर आमचे ह्ये माज्या आवशीन दिललो सल्लो वापरतहत. थयसून आमका बरे दिवस इलेहत!‘‘

No comments:

Post a Comment