Wednesday 11 January, 2012

अंक २रा, १२ जानेवारी २०१२

अधोरेखित *
मातृत्व नाकारण्यासाठी...

वर्षानुवर्षे चालत आलेल्या विवाहसंस्थांचे बदलते रुप, उद्भवणा-या विविध समस्या या सा-या गोष्टींवर नजर टाकत असतानाच ‘मातृत्वा‘कडे पहाण्याचा तरुण पिढीचा बदलता दृष्टिकोनही भविष्यातली समस्या होईल का? हा विचार मनात निश्चितच येवून जातो.
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मुळातच लग्न म्हणजे केवळ दोन मनांचंच नव्हे तर दोन कुटुंबाचं एकत्र येणं असतं. लग्नाअगोदरची स्वप्नं आणि खरं वैवाहिक आयुष्य, त्यातले बारकावे, जबाबदा-या, कर्तव्य हे सारं वेगळं असतं. या जबाबदा-या पेलतानाच ‘केवळ चूल आणि मूल‘ अशा मर्यादित कवचात न रहाता आजची स्त्री तिचं करिअर घडवतानाही दिसते. आपली बुद्धिमत्ता, शिक्षण याचा पुरेपूर उपयोग करणं यात वावगं असं काहीच नाही. उलट ही गोष्ट कौतुकास्पद आहे. परंतु काही ठिकाणी केवळ स्त्री स्वातंत्र्य आणि करिअर यासाठी मातृत्व नाकारण्याची मानसिकता वाढलेल्याचा कल किवा ‘लिव्ह इन रिलेशनशिप‘मध्ये रहाणे, फिगर जपण्यासाठी ‘सेरोगेट मदर‘ सारखे पर्याय निवडण्याची मानसिकता शहरामध्ये वाढत्या प्रमाणात दिसू लागली आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामिण भागातही काही ठिकाणी असे स्वर कानावर येवू लागले आहेत.
आय.टी. क्षेत्रामध्ये काम करणा-या मनिषाजवळ याबाबत चर्चा केली असता ती अगदी सहजपणे म्हणाली, ‘‘अहो, आम्ही दिवसभर घरी नसतो, मग मुलांकडे पहायला वेळ आहे कुणाला? पाळणाघर असतात खरी, परंतु दमून घरी आल्यावर मुलांची किरकिर, त्यांच्यामागून धावणं वगैरे करायला एनर्जी कुणाला असते? म्हणून लग्नाला १२ वर्ष झाली तरी आम्ही मुलच होऊ दिलं नाही!‘‘ हे उद्गार ऐकल्यावर मी तिला म्हटलं, ‘‘अगं, एवढा अचाट पैसा कमावता, कधी वाटत नाही, हे सारं कुणासाठी करावं? किवा इतरांची मुलं पाहिली की आपल्यालाही गोंडस बाळ असावं?‘‘
समीर आणि मनिषा दोघेही म्हणतात, ‘‘छे! पैसा आपल्यासाठी कमवायचा, धम्माल करायची. आपल्या पश्चात डोनेट करायचा. नाहीतरी आपल्या मुलांना वाढवून ती पुढे आपल्याला बघतीलच याची हमी कोण देणार?‘‘
या दोघांच्या आई-वडिलांना मात्र या सगळ्याचं वाईट वाटतं. अनेक प्रकारे समजावूनही ऐकत नसल्याने आपण हा विषय सोडून दिल्याचे ते सांगतात. तर खेड्यातली एक उच्चशिक्षित मुलगी म्हणते की, जबाबदा-यांचं बंधन नको म्हणून लग्नच नको आणि जर लग्न केलं तर मुलाबांळांसारखा मागे ‘बोअरिग‘ विषयच नको. त्यातूनही खूप समजावल्यावर मग म्हणते, ‘सगळं ठिक, पण ते डिलेव्हरीमुळे सुटणारं शरीर पाहिलं की म्हणे ‘गर्भाशय भाड्याने‘ (सेरोगेट मदर) चा पर्यायच बरा वाटतो नाही!‘ अनेक तरुणींजवळ, लग्न झालेल्या स्त्रियांजवळ चर्चा केल्यावर ‘मातृत्व नाकारण्याचा‘ वाढलेला कल समोर आला आणि सारं विचित्र वाटलं.
स्त्रीकडे निसर्गाने मातृत्वाचं वरदान दिलं आहे. आज अगदी ‘मुल नको हो‘ असं म्हणणा-यांनी आपल्या आई-वडिलांनी हा विचार केला असता तर आपल्याला हा मनुष्यजन्म तरी अनुभवता आला असता का? हा विचार करायला हवा. अर्थातच अशा मुला-मुलींच्या पालकांना ‘असली दिवटी पोरं जन्माला येण्यापेक्षा मुलांची आवड असतानाही मूल झालं नसतं तरी बरं‘ असंच म्हणण्याची परिस्थिती येत असेल. परंतु खरे पालक असा विचार कधीच करीत नाहीत. स्त्री मुक्तीच्या खोट्या वेडानं झपाटण्यापेक्षा आणि स्त्री स्वातंत्र्याचा केवळ डंका पिटून केवळ करिअरच्या नावाखाली मुलं नको, आम्ही मुक्त आहोत, सक्षम आहोत, आमचे निर्णय आम्हीच घेवू शकतो असं म्हणणा-यांनी जरा थांबून स्त्रीच्या ख-या समस्या काय? नेमकी गरज कशाची ते पाहिलं पाहिजे.
स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे मुलींनी, स्त्रियांनीही लक्षात ठेवायला हवं. आपलं करिअर निश्चितच घडवायला हवं. त्यात वावगं काहीच नाही किवा स्त्री पुरुषांनी एकमेकांना मदत करणं, अगदी घरच्या कामात एकमेकांना मदत करणं यात शेअरिग हवंच. जबाबदा-यांची देवाणघेवाण, समजुतदारपणा हे पाहिजेच. त्यामध्ये दुमत नाहीच. पुरुषांनीही कामाचं शेअरिग करताना कमीपणा वाटता कामा नये हे अगदी बरोबर आहे. परंतु केवळ करिअरच्या नावाखाली होणारी मूल्यांची पायमल्ली, मातृत्व नाकारणं या गोष्टींवर विचार व्हायला हवा. निसर्गाने स्त्रीकडे मातृत्व दिलं आहे. एक पिढी घडविणं आपल्या हातात असतं. स्वतः केवळ स्वातंत्र्य या नावाखाली स्वैराचार करुन ‘बोन्साय‘ बनून रहायचं की स्वतः सर्वाधीन विशाल वटवृक्ष होऊन सगळ्यांची छाया बनायचं हाही विचार गरजेचा आहे.
सौ. सुमेधा देसाई, ९७६५८४७२९७

संपादकीय *
दृष्टिक्षेपात जिल्हा परिषद निवडणुक
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये उमेदवार शोधण्यासाठी, उमेदवार ठरविण्यासाठी, कोणाला उमेदवारी नाकारण्यासाठी आणि आपल्या गटाचा नसलेला उमेदवार पाडण्यासाठी खलबते सुरु झाली आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये जशा उलट सुलट आघाड्या, महाआघाड्या, युती -महायुती झाली. तोच प्रकार थोड्याफार फरकाने या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषदेमध्ये एका जिल्हा परिषद मतदार संघाच्या अंतर्गत पंचायत समितीचे दोन मतदार संघ येतात. सिधुदुर्ग जिल्ह्यापुरते पहावयाचे तर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५० व ८ तालुक्यांच्या पंचायत समित्यांसाठी १०० उमेदवार निवडावयाचे आहेत. तालुक्याच्या एकूण लोकसंख्येनुसार हे मतदार संघ ठरविलेले आहेत. नगरपालिका क्षेत्र वगळून होणा-या या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक पक्षाची ताकद दिसून येणार आहे. एकप्रकारे ही निवडणुक म्हणजे मिनि विधानसभेचीच निवडणुक आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना सत्तेवर आहे. सेना भाजप आणि आरपीआय अशी तेथे युती होणार आहे. साहजिकच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी या युतीविरोधात असेल.
सिधुदुर्ग जिल्ह्यात मात्र याच्या उलट चित्र आहे. या जिल्हा -परिषदेत काँग्रेस पक्षाचे-राणे समर्थक काँग्रेस गटाचे वर्चस्व आहे. यथे राष्ट्रवादीशी त्यांचा उभा दावा आहे. शिवसेना-भाजपला येथे नगण्य स्थान आहे. साहजिकच नगरपालिका निवडणुकांप्रमाणे येथे राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपा-आरपी आय यांची महायुती करुन काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचण्याचे मनसुबे रचले जात आहेत.
नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेशी नसली तरी भाजपशी राष्ट्रवादी पक्षाची युती झाली होती. त्यातून राष्ट्रवादीचाच फायदा झाला. आताही शिवसेनेने राष्ट्रवादीपासून दूरच राहण्याचे धोरण ठेवले आहे. न.प.निवडणुकीत स्व-बळावर निवडणुक लढविलेल्या शिवसेनेला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नव्हते. महायुती न केल्याने शिवसेनेला फक्त मालवणात दोन जागांवर समाधान मानावे लागले. सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने आताही स्वबळावर निवडणुक लढविली तर पक्ष म्हणून शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही. आलाच एखादा तर व्यक्तिगत लोकप्रियतेवर निवडून येऊ शकेल. भाजपने राष्ट्रवादीशी आघाडी करुन निवडणुक लढविली तर राष्ट्रवादीबरोबरच भाजपलाही त्याचा काही प्रमाणात लाभ होईल. जनता दलाचे अस्तित्व जिल्हा परिषदेतून संपलेलेच आहे. या पक्षाचे जिल्ह्यातील अनेक वरीष्ठ नेते काँग्रेस किवा राष्ट्रवादीत दाखल झाले. ते नारायण राणेंच्याही अगोदर आपला पक्ष सोडून काँग्रेसकडे आल्याने स्वतःला ते काँग्रेस निष्ठावंत समजतात. या नव्या निष्ठावानांनी पूर्वीपासूनच काँग्रेसमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांशी संघान ठेवून आपला निष्ठावंत काँग्रेस असा वेगळा पक्षांतर्गत गट निर्माण केला आहे. हा गट नारायण राणेंच्या पूर्ण विरोधात आहे. त्यामुळे सध्या जि.प.वर सत्ता असलेल्या राणे समर्थक काँग्रेस पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी, सेना-भाजप बरोबरच काँग्रेस निष्ठावंत गटही छुपेपणाने विरोधात राहणार आहे. या सर्व राजकीय अघाड्यांवर स्वबळावर लढणारा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या जिल्हा परिषद निवडणुकीत आपले बळ राखतो की गमावतो ते महिनाभरातच समजून येईल.
राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्षही या निवडणुकीत आपली मते अजमावून पाहील. ग्रामीण भागात या पक्षाचे इतके अस्तित्व नसले तरी पुढे दोन वर्षांनी होण-या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष किती मते मिळवू शकतो किवा कोणाला पाडू शकतो हे अजमावून पाहण्यासाठी मनसेचे उमेदवार उभे केले जातील.
काँग्रेस पक्षाकडे उमेदवारांची गर्दी आहे. त्यातून महिला आरक्षण, ओ.बी.सी. आरक्षण यामुळे अनेकजण इच्छुक नाराज होऊन बंडखोरी करतील. वेंगुर्ले न.प.मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी न मिळालेल्या दोन महिलांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवून त्या निवडूनही आल्या. आताही काँग्रेसमधून बंडखोरी करुन राष्ट्रवादीत प्रवेश उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न होतील. काहींना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उमेदवारी भरुन काँग्रेस उमेदवाराच्या पाडावासाठी जोरदार प्रयत्न करतील. पण एकंदरीत पूर्वीप्रमाणे काँग्रेस पक्षाला ही निवडणुक सोपी राहिलेली नाही हे निश्चित.

स्वयंसिध्दा -
कॅन्सरवर संशोधन
आपल्याकडे १२ वी नंतर मेडिकल, इंजिनिअरींगला अॅडमिशन मिळाली नाही की, मुलं, त्यांचे पालक फार अपराधल्यासारखे होतात. पण शांभवीने नेहमीपेक्षा वेगळी वाट निवडली. अर्थात यामध्ये कराव्या लागणा-या कष्टांची तिला जाणीव होती.
रुईया कॉलेजमधून बी.एस्.सी. (केमिस्ट्री) झाल्यानंतर तिने कॅन्सर रोगावर संशोधन करायचं ठरवलं. कॅन्सर हा शब्द जरी उच्चारला तरी उपचाराआधीच पेशंट आणि त्याचे नातेवाईक भितीने गर्भगळीत होतात. शांभवीच्या आजीचे ब्रेस्ट कॅन्सरमुळे निधन झाले. आणि भारतातही सर्वात जास्त केसेस स्त्रियांच्या बाबतीत या ब्रेस्ट कॅन्सरच्याच असतात. त्यामुळे संशोधनाचा विषय निवडताना तिने ब्रेस्ट कॅन्सर हाच निवडला. रुईयामधून एम.एस.सी. पूर्ण केल्यानंतर यु.के. मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ लेईश्टरमध्ये बायोलॉजी डिपार्टमेंटतर्फे स्कॉलरशिपसाठी शांभवीची निवड झाली.
सोप्या भाषेत सांगायचं तर - कॅन्सरमुळे शरीरचक्राचे संतुलन बिघडून जाते. सध्या कॅन्सरवर उपचार म्हणजे केमोथेरेपी. केमोथेरेपीचे साईड इफेक्टस् होऊ नयेत यासाठी काय करता येईल हे पहाण्यासाठी शांभवीने संशोधन केले. आपल्या शरिरात एक प्रोटीन सेल असतो. तो शरिरातील कॅन्सर पेशींवर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवत असतो. पण त्याचे प्रमाण शरिरात कमी असल्यामुळे तो इन-इफेक्टीव्ह होतो. तेव्हा लॅबमध्ये कृत्रिमरित्या बॅक्टेरियाच्या सहाय्याने तो शरिरात केमोथेरेपीच्या जोडीने दिला जातो. त्यामुळे साईड इफेक्टस्ना ब-याच मोठ्या प्रमाणावर आळा बसतो. शांभवीने ब्रेस्ट कॅन्सर पेशंटचे कॅन्सरसेल गोळा करुन केलेल्या प्रयोग व टेस्टद्वारे पॉझीटीव्ह रिझल्ट मिळाले आहेत. परदेशात त्यामानाने कमी पेशंट असतात. उपचार करुन घेण्यात त्यांना रस नसतो. भारतात मात्र संशोधनाला जास्त स्कोप आहे. इथे पेशंट जास्त आहेत. त्यांना उपचाराची गरज आहे. कॅन्सर पेशन्टला केमोथेरेपी वापरली जातेच, त्याचवेळी आम्ही बाहेर सेलवर प्रयोग करुन बघत असल्याने दोन दिवसातच कळते की नेमके कोणते औषध त्या पेशंटच्या सेलवर परिणाम करतेय. एवढ्या नेमक्या प्रमाणात कोणते औषध वापरायचे हे कळले तर पेशंटवर होणारा ट्रायल अँड एरर मधला वेळ, त्रास, खर्च वाचतील. स्वस्त औषधांनी पण काही वेळा काम होऊ शकते. हे संशोधन मोठ्या प्रमाणावर वापरले तर कॅन्सर रुग्णांना निश्चितच दिलासादायक ठरेल. भारतात टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये अशा प्रकारची सुविधा मिळावी यासाठी शांभवीचे प्रयत्न सुरु आहेत.
या संशोधनामध्ये करिअर करण्याच्या शांभवीच्या धडाडीच्या आणि चिकाटीच्या निर्णयाला तिचे वडील मूळचे वायंगणी गावचे सुपूत्र असलेले आणि मुंबई महानगरपालिकेतून वरिष्ठ इंजिनिअरच्या हुद्द्यावरुन निवृत्त झालेले दीपक दीनानाथ नाईक, आई, शिक्षक सर्वांनीच प्रोत्साहन दिले. यु.के.मध्ये ब्रिटीश टॉक्सिकॉलॉजीच्या एका कॉन्फरन्समध्ये बेस्ट ओरल प्रेझेंटेशनसाठी अवॉर्ड मिळवणारी ती एकमेव भारतीय ठरली. संशोधन कसे करावे, त्याची पद्धत त्यासाठी लागणारी मोकळीक हे सर्व शिकण्यासाठी यु.के.मध्ये सर्वोत्तम पर्याय आहेत.
वेगळी वाट निवडून कॅन्सरसारख्या रोगावर परिणामकारक संशोधन केलेल्या शांभवीच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा!
संफ- -शांभवी दीपक नाईक-९९२०९३३४५७,

विशेष *
पैशांविषयीची विचारसरणी-मासिक प्राप्ती
सगळ्याच सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे लग्नानंतर आपली आर्थिक स्थिती कशी राहणार आहे. याविषयी समजून घेणं महत्वाचं आहे. किती पैसे मिळवता? नोकरी,धंदा,कामाचं स्वरुप या गोष्टी पैशाबद्दलच्या विचारसरणीवर अवलंबून आहेत. गंमत म्हणते या प्रश्नांची उत्तर देण्याइतका विचार केलेला असतोच असं नाही. पण विवाह ठरवतांना याविषयी विचार करणं आवश्यक आहे.
सध्याच्या परिस्थितीत मध्यमवर्गीय असणं केव्हाही चांगलं. अनेकांना श्रीमंतीची स्वप्नं अस्वस्थ करीत असतात. पण श्रीमंतीतल्या अडचणींची त्यांना कल्पना नसते. श्रीमंती आली कशामुळे? ती टिकवण्यासाठी काय कराव लागत आहे? श्रीमंतीमागचा खरा चेहरा कोणाचा? याची खरी मालकी कोणाकडे? याची काहीच कल्पना नसेल, तर नंतर पश्चातापाची पाळी येऊ शकते. गाड्या, बंगला, घरातील महागड्या वस्तू यासाठी कर्ज घेतलेलं आहे का? त्या कोणाच्या नावावर आहेत? याविषयी नीट, स्पष्ट समजून घ्यायला हवं. नाहीतर त्यापेक्षा मध्यमवर्गीय रहाणीमान उत्तम. घर भले लहान असेल, दोन चाकी गाडीच असेल पण मुलाची, मुलीची स्वतःची असेल तर ते कर्जाऊ, दिखाऊ मोठ्या गोष्टींपेक्षा निश्चितच सुखकारक व हितावह ठरेल.
तसंच पैशाबद्दलची विचारसरणीही समजून घ्यायला हवी. उदा. स्वभाव अति काटकसरी आहे की खर्चिक? अंथरुण पाहून पाय पसरायला आवडतात की, आधी पाय तर पसरु मग बघू असा स्वभाव आहे? सध्या कशासाठी किती कर्ज कोणाकडून घेतलेलं आहे? त्याची परतफेड कधी कशी चालू आहे किवा करायची आहे? मित्रमंडळीशी पैशाचे व्यवहार आहेत का? बचतीच्या सवयी कशा आहेत? वडिलोपार्जित मालमत्ता आहे का? त्याविषयीही लाच, हप्ता अशा प्रकारची अनैतिक, बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याची चर्चा नाही ना? याविषयी मिळालेल्या माहितीची खात्र करुन घेणे आवश्यक आहे.
जोडीदाराची, त्याच्या घरातील सभासदांची रहाणी कशी आहे? बोलण्यातले विचार व रहाणी यात खोटेपणा जाणवतो का? व्यवस्थितपणा, काटकसरीपणा, शिस्त, निटनेटकेपणा यांची कितपत आवड आहे? अशाप्रकारच्या प्रश्नांतून एकूणच आर्थिक परिस्थितीचा नेमका अंदाज येऊ शकतो.
स्वतःच्या मासिक प्राप्तीविषयी खरं सांगणारे पुरुष जोडीदार कमीच. मुलांचा कल प्रत्यक्ष प्राप्तीपेक्षा फुगवून जास्त प्राप्ती सांगण्याकडे असतो. मुली मात्र समोरच्यांचा अंदाज घेऊन स्वतःची प्राप्ती सांगतात.
सध्याच्या काळात दोघांनीही नोकरी करणे आवश्यकच आहे. त्यासाठी एकमेकांच्या कामाचं स्वरुप समजून घेणं आवश्यक आहे. कामाचं स्वरुप, त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट, द्यावा लागणारा वेळ, करावा लागणारा प्रवास, दगदग या तुलनेत मिळणा-या उत्पन्नाचा विचार करायला हवा. अन्यथा परस्परांच्या संमत्तीने त्यातून वेगळा पर्याय निवडणे शक्य होऊ शकते.
भरपूर काम, करमणूक, छंद, कौटुंबिक जबाबदा-या, जवळच्या नातेवाईक किवा मित्रमैत्रिणींना मदत यांचा समतोल ज्याला साधला ती स्त्री किवा पुरुष उत्तम म्हणता येईल. प्रत्यक्षात यातलं सगळच सगळ्यांना स्वतःला शक्य होतं असं नाही. पण निदान जोडीदार करीत असेल तर त्याविषयी त्रागा/चिडचिड न करता आनंदाने स्विकारलं तरीही खूप समाधानाने जगता येईल.
जोडीदाराच्या सहका-यांशी, वरिष्ठांशी याविषयी बोललं तर खूप ‘ख-या‘ गोष्टी कळतात.
- वंदना करंबळेकर, समुपदेशक, सावंतवाडी, ९८५०४७३०१२

विशेष बातम्या *
कलावलयाच्या एकांकिका स्पर्धेत रुद्रेश्वर पणजीची ‘तुका अभंग अभंग‘ प्रथम
‘कलावय‘च्या प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत गोव्यातील रुद्रेश्वर संस्थेच्या ‘तुका अभंग अभंग‘ या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे १० हजार रु.चे बक्षिस मिळाले तर द्वितीय क्रमांकाचे ७ हजाराचे बक्षिस सातारा येथील संवाद संस्थेच्या ‘गप्पा‘ या एकांकिकेने मिळविले. तिस-या क्रमांकाचे ५ हजाराचे बक्षिस परुळे येथील डिग्नीटी संस्थेच्या ‘खेळ मांडियेला‘ ला मिळाले. कलांकूर ग्रुप मालवणच्या ‘सायलेंट क्रीम‘ला उत्तेजनार्थ ३ हजाराचे बक्षिस देण्यात आले.
येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये ६ ते ८ जानेवारीला झालेल्या या स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते. उद्घाटन नाट्यलेखक व दिग्दर्शक राजीव शिदे व कलावलयचे संस्थापक सदस्य श्री. प्रकाश परब यांच्या उपस्थितीत झाले. वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे-दिग्दर्शन-देविदास आमोणकर (रुद्रेश्वर), संतोष पाटील (संवाद-सातारा), प्रथमेश नाईक (डिग्नीटी), पुरुष अभिनय -दीपक आमोणकर (रुद्रेश्वर), सुनिल राऊळ (डिग्नीटी) संतोष पाटील (संवाद सातारा), स्त्री अभिनय - मनुजा श्रांकर (रुद्रेश्वर), हर्षदा इताळे (संवाद), दक्षा शिरोडकर (निषाद पणजी), तांत्रिक अंगे - रुद्रेश्वर, वाद्यस्थ - पुणे, डिग्नीटी - परुळे, परीक्षण आनंद म्हसोळेकर व नंदू गाडगीळ यांनी केले. बक्षिस वितरण श्रीमती निला यरनाळकर, नरेंद्र पारकर, परीक्षक म्हापसेकर, गाडगीळ, कलावलयचे अध्यक्ष रमेश नार्वेकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन व बक्षिस वितरण प्रसंगी रमेश नार्वेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अमोल महाजन यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष बाळू खामकर यांनी आभार मानले. कलावलयचे सदस्य संजय पुनाळेकर, दाजी परब, सुनिल रेडकर, शेखर कोयंडे, दिगंबर नाईक, राजन गिरप, प्रकाश दिपनाईक, अमेय तेंडोलकर, निलू सामंत, शशांक मराठे, पंकज शिरसाट, कृष्णा राऊळ, सुधा केळजी, जीतेंद्र वजराटकर आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


कोमसाप संमेलन १५ जानेवारीला
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, प्रथम अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत कै. विद्याधर भागवत साहित्यनगरीत (नवसरणी,जेलमागे, सावंतवाडी) १५ जानेवारीला कोकण मराठी साहित्य परिषद सिधुदुर्गचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन होणार आहे.
१५ जानेवारी ९ ते १० - श्रीराम वाचन मंदिर ते संमेलन स्थळ अशी ग्रंथदिडी. १० वा. संमेलनाचे उद्घाटन पॅनकार्ड क्लबचे चीफ मार्केटिग मॅनेजर आर.एन.पालव यांच्या हस्ते. संमेलनाध्यक्ष अशोक बागवे, स्वागताध्यक्ष आमदार दीपक केसरकर व नगराध्यक्ष बबन साळगांवकर आहेत. ११.३० ते १२. ४५ वा. प्रसारमाध्यमांचा जनमानसावरील परिणाम या विषयावर परिसंवाद. सहभाग प्रा. काशिनाथ वाडेकर-सांगली, डॉ.जी.ए. बुवा, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. गणेश मुळे, प्रा. तरुजा भोसले व डॉ. दीपक तुपकर. स्नेहभोजन व गाठीभेटीनंतर दुपारी २ ते २. ३० वा. होणा-या कथाकथन कार्यक्रमात सौ. वृंदा कांबळी, सौ. वैशाली पंडित सहभागी होतील. त्यांचा परिचय कल्पना बांदेकर करुन देतील. २.३० ते ३ जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार. ३ वा. सुरंगीचा वळेसार-कवी संमेलन जिल्हाध्यक्षा उषा परब यांच्या अध्यक्षतेखाली. सूत्रसंचालन विजय परांजपे. संध्या. ४.३० ते ५ समारोप कार्यक्रमात सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष भरत गावडे, कार्याध्यक्षा नमिता कीर व संमेलनाध्यक्ष अशोक बागवे यांचे मनोगत. संमेलनास न्यायमूर्ती भास्करराव शेटये, अरुण नेरुरकर, एल. बी. पाटील, अशोक ठाकूर, रविद्र आवटी, मंगेश विश्वासराव पाटील, मोहन भोईर, रेखा नार्वेकर, अभिजित हेगशेटये, दिलीप पाटील तसेव आ.द.राणे, केशव फाटक, दादा मडकईकर, आनंद वैद्य, शीला धारणकर, गोविद काजरेकर, शशिकांत तिरोडकर, मधुसूदन नानिवडेकर, संध्या तांबे, अजय कांडर, बाळा कदम, प्रविण बांदेकर, अनिल कांबळी, शरयू आसोलकर, मंदाकिनी गोडसे, वीरधवल परब आदी कवी उपस्थित राहतील

पत्रकारिता ताकदीने वापरा!
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांनी वृत्तपत्रांची सुरुवात करतांना समाजातील स्त्रियांवरील अत्याचार, शेतक-यांच्या समस्या राज्यकर्त्यांना समजाव्यात यासाठी प्राधान्याने त्या काळात आवाज उठविला. समाजातील सर्व जटिल प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण्यांना कसे काबूत आणावे, याचे मार्गदर्शन दर्पणकरांनी त्या काळात समाजाला केले. वृत्तपत्राचा प्रभाव हा समाजमनावर खोलपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी तेवढ्या ताकदीने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनंत दिक्षित यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील जन्मस्थानी आयोजित पत्रकार दिन समारंभात बोलतांना केले. यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविद्र बेडकीहाळ, भारती विद्यापीठाचे सहसचिव एम.एस.सगरे,राजाभाऊ लिमये, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, सरपंच प्रतिभा पाडावे, जांभेकर ट्रस्टचे विश्वस्त मनोहर जांभेकर, सुधाकर जांभेकर, व्ही. ए. पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मरणार्थ ज्येष्ठ संपादक पुरस्कार राजाभाऊ लिमये(सा.सत्यशोधाक, रत्नागिरी), दर्पण पुरस्कार २०११ साठी धनाजी शिदे (पुणे विभाग), हिम्मतलाल पारधी (नागपूर), महेंद्र कविश्वर (अमरावती), डॉ. विनोद गोरवाडकर (नाशिक), बालाजी तोंडे (औरंगाबाद), महेश गावडे (कोकण), विशेष दर्पण पुरस्कार बाळासाहेब आंबेकर, अशोककुमार चव्हाण, पत्रकार साहित्यिक पुरस्कार सुनीलकुमार सरनाईक, महिला दर्पण पुरस्कार धनश्री पालांडे (रत्नागिरी) यांना श्री. दिक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

खर्डेकरचा युवा महोत्सव २०१२
खर्डेकर महाविद्यालयात ‘स्वाभिमान तरुणाईचा‘ युवा महोत्सव २०१२चे उद्घाटन नगरसेवक यशवंत उर्फ दाजी परब यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य सिद्धार्थ फडतरे होते. ‘याच महा -विद्यालयाने माझ्या पुढील जीवनाचा मार्ग दाखविला. बॅ. खर्डेकर व प्राचार्य देसाई हे आपले दैवत आहेत. तुम्ही महाविद्यायातून शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडल्यावरही महाविद्यालयाविषयी आत्मीयता, आपुलकी ठेवा‘ असे दाजी परब यांनी उद्घाटनपर भाषणात सांगीतले.
या युवा महोत्सवात पालकमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे, सौ. नंदिता राणे, अभिनेत्री अमृता खानविलकर, इंद्रजित शिदे यांनीही हजेरी लावली. प्राचार्य सिद्धार्थ फडतरे, विद्यार्थी प्रतिनिधी भूषण आंगचेकर, सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, प्रा.पी.डी. होडावडेकर, प्रा. ए. व्ही. सुतार, पर्यवेक्षक श्री. माने, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुरेंद्र चव्हाण, विरेंद्र देसाई, सनी कुडाळकर, तुषार साळगांवकर, शितल आंगचेकर उपस्थित होते. नितेश राणे यांनी निकालात गुणवत्ता प्राप्त करा. या महाविद्यालयाने उच्च परंपरा जपली आहे. ती वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे व जिद्दीने प्रयत्न करा असे सांगितले.

अभिनंदनीय *
श्री. सुधीर झांटये
बारदेशकर गौड सारस्वत ब्राह्मण निधीतर्फे श्रीमती सुमतीताई राजाराम प्रभू शिरोडकर हा मानाचा पुरस्कार दरवर्षी ज्ञातीतील सर्वोत्कृष्ट कार्य करीत असलेल्या व्यक्तीस दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार तुळस गावचे सुपुत्र झांटये काजूचे संचालक व मालक श्री. वासुदेव मधुकर तथा सुधीर झांटये यांना मिळाला आहे. झांटये काजू आता सिधुदुर्गापुरता मर्यादित न राहता देश-विदेशात प्रसिद्ध झाला आहे.
श्री. सुधीर हे श्री. मधुकर अच्युत झांटये याचे ज्येष्ठ चिरंजीव. आज ते उद्योजक असूनही विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून समाजकार्यात आहेत. आपण ज्या समाजात लहानाचे मोठे झालो त्यांचे देणे लागतो ही जाणीव त्यांना आहे. सध्या ते श्रीदेव रवळनाथ महालक्ष्मी संस्थान, मुळगाव-गोवाचे अध्यक्ष तसेच लायन्स क्लब ऑफ वेंगुर्ले चे ते सतत दोन वर्षे अध्यक्ष आहेत आणि त्या माध्यमातून वेंगुर्ले शहरात सामाजिक, आरोग्य सेवा समाजाला देत आहेत. महाराष्ट्र कॅश्यू मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य आहेत. काजूवरील अतिरिक्त व्हॅट कराचा परतावा मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. मुख्य ग्रामदैवत श्रीदेव जैतीर देवालय, तुळस या समितीवर ते खजिनदार म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या तुळस गावात काजू कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचा विस्तार करताना मालवण, सावंतवाडी, आंबोली येथे कारखाने काढले. त्या गावांतील सुमारे ५५० स्त्री-पुरुषांना काम दिले.
सुधीर झांटये व त्यांचे दोन्ही बंधु हे पदवी शिक्षण घेऊन या उद्योगात काम करत आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी, मुले हेही एकत्रितपणे कार्य करीत असून एकत्र कुटुंब कसे असावे याचे त्यांचे झांटये कुटुंब हे आदर्श उदाहरण आहे. वडील श्री. मधुकर हे किराणा मालाचे गावातील प्रथितयश व्यापारी होते व त्यांना या मुलांनी चांगली साथ दिली, वडिलांनीच काजू कारखाना चालविण्याचा निर्णय घेतला. श्री. सुधीर झांटये हे मातृदेवो भव, पितृदेवो भव व समाजाची सेवा यातून अगणित पुण्य कमावत आहेत. कारखान्याला चांगल्या प्रकारचा कच्चा माल मिळावा म्हणून शेकडो एकरात काजू लागवड सुरु करुन चांगल्या प्रतीच्या काजू बीचे उत्पादन ते घेत आहेत. केवळ काजू धंद्यावर अवलंबून न राहता आता ते मालवणमध्ये हॉटेल व्यवसायातही उतरले आहेत. अशा या हरहुन्नरी व बहुआयामी व्यक्तीला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन!
-पुरुषोत्तम मुद्रस,०२२-२४१४१०१२

अभिष्टचितन *
श्री. रमेश नार्वेकर
उभादांडा-वेंगुर्ले येथील एक हरहुन्नरी उत्साही व्यक्तिमत्व श्री.रमेश पुंडलिक नार्वेकर १५ जानेवारीला वयाची ६१ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने -
उभादांडा-वरचेमाड येथे एका गरीब कुटुंबात १५ जानेवारी १९५१ला जन्म झालेले श्री. रमेश नार्वेकर आज एका सॉ मिलचे मालक आणि आंबा बागायतदार आहेत. हे यश त्यांनी मोठ्या परिश्रमांनी मिळविले आहे. उभादांडा येथील न्यू. इंग्लिश स्कूलमुळे माध्यमिक शिक्षण आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामुळे बी. कॉ. पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन आपल्या गावात स्थीर होऊ शकल्याचे ते सांगातात.
त्यांची शेतीही कुळपणाची होती. त्यावर आईवडिलांना दोन भाऊ व एक बहिण त्यांचे शिक्षण, लग्नकार्य इत्यादीचा खर्च पेलण्यासारखा नव्हता म्हणून त्यांनी आंबा बागा कराराने घेऊन आंबा व्यापार सुरु केला. मोठे बंधू गोपाळ हे मुंबईला नोकरीसाठी गेले. नोकरी करतांना त्यांनीही कायद्याची पदवी संपादन करुन आज ते तेथे प्रतिथयश वकील म्हणून काम पहात आहेत. तर बहीण लग्न होऊन सासरी नांदत आहे. रमेश हे वडिलांसोबत गावीच राहिले आणि त्यांच्या शेती-बागायतीत लक्ष घालू लागले. आंबा व्यापार करतांना त्यांना लाकडी खोक्यांची टंचाई भासू लागली. अन्य अनेक लहान मोठ्या बागायतदारांचा -ही हाच अनुभव होता हे लक्षात घेऊन रमेश यांनी स्वतःची सॉमिल उभारण्याचा धाडशी निर्णय घेतला आणि मोचेमाड पठारावार जमीन घेऊन काळभैरव सॉ मिलची उभारणी केली. या कामी त्यांना बँक आणि वित्तीस संस्थेचे चांगले सहकार्य लाभले. सॉ मिल चांगली चालू लागली आणि आंबा व्यापार करतांना स्वतःची आंबा बागही त्यांनी निर्माण केली.
व्यवसायात जम बसल्यावर त्यांनी १९७९ साली विवाह केला. भेंडमळा येथील नवार कुटुंबातील असलेल्या सौ. रुपाली त्यांच्या गृहलक्ष्मी झाल्या. यथावकाश दोन मुलगे आणि एक मुलगी असे पंचकोनी कुटुंब झाले. दरम्यान आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे घरची सर्व जबाबदारी रमेश आणि त्यांच्या पत्नी रुपाली यांच्यावरच पडली आणि त्यांनी ती समर्थपणे सांभाळली आहे. तीन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. एक मुलगा सिव्हील इंजिनिअर म्हणून बांधकाम व्यवसायात जम बसवीत आहे तर एक मुलगा सॉमिलचे कामकाज सांभाळतो. मुलगी इंटेरिअर डिझाईनर होऊन आता विवाहीत आहे.
ही घरची आघाडी सांभाळत असतांना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही रमेश यांनी आपला ठसा उमटवला आहे. मुळातच नाटकाची आवड. कॉलेजमध्ये असतांना यरनाळकर सरांनी बसविलेल्या एका नाटकात त्यांची निवड झाली. पुढे दरवर्षीच त्यांचा सहभाग असायचा. कॉलेज पूर्ण झाल्यावर यरनाळकर सरांनीच स्थापन केलेल्या कलावलय संस्थेच्या माध्यमातूनही ते नाट्यकर्मी म्हणून सक्रीय राहिले. शिवाय आपल्या उभादांडा गावात युवकांना साथीला घेत त्यांनी कलासहयोग संस्थेची स्थापना केली आणि अनेक एकांकिका स्पर्धा गाजविल्या. अनेक नाटकेही सादर केली. आज ते कलावलय संस्थेचे अध्यक्ष म्हणून पूर्वीइतक्याच उत्साहाने सक्रीय आहेत.
याखेरीज भंडारी सहकारी पतसंस्थेचे संचालक, चेअरमन म्हणूनही त्यांनी सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे काम चालविले आहे. आपल्या भंडारी ज्ञाती संस्थेचे कामही ते करतात. ज्ञातीतील वधु-वरांचे विवाह जुळविण्याचे कामही त्यांनी केले आहे. जिल्हा भंडारी महासंघाचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. वेंगुर्ल्यात अलिकडेच स्थापन झालेल्या रोटरी क्लबचे ते एक संस्थापक सदस्य आहेत.
या सगळ्या उलाढालीत त्यांनी सामाजिक दायीत्वही राखले आहे. गरीब गरजूंना तसेच शिक्षण घेणा-या गरजू मुलांना शैक्षणिक मदत, कोणाला वैद्यकीय मदत याद्वारे त्यांचे काम प्रसिद्धी पासून दूर राहून चालू असते. हरहुन्नरी आणि उत्साही स्वभावामुळे त्यांचा स्नेही परिवारही मोठा आहे. राजकारणापासूनही ते दूर राहिले नाहीत. अगदी सुरुवातीला जनता पक्षाचे ते कार्यकर्ते होतेच. आता शिवसेनेचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत. असे असूनही सर्व पक्षाच्या लोकांशी त्यांचे चांगले स्नेहसंबंध आहेत.
अशा या सर्वप्रिय रमेश यांच्या एकसष्ठीपूर्ती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा! त्यांचे भावी आयुष्यही आरोग्य संपन्न आणि समाधानाचे जावो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
- एक परिचित

ठेवणीतला लोणचा *

पटार घालयल्यानी.....!
‘‘गोज-या, काय गो, येकटाच खिदाळतहस कित्याक? भावोजींनी रात्री काय कळ काढल्यानी की काय?‘‘ दात काढीत साळग्या गोज-याक कपडे सुकत घालता घालता इचारुक लागला.
‘‘अगो, आमच्या ह्येंचा कायच्या काय!‘‘
‘‘काय गो कायच्या काय?‘‘
‘‘अगो टकला कायच्या कायच भारी.‘‘
‘‘व्हयतर, पटार भावोजींचे कदी पैशेच जानत नाय. बरोबर राणयेर पैशे लायतत आणि दुप्पट घेवन येतत असा आमचे ह्ये राती सांगी व्होते. भावजींका पटार बगल्यानी काय पटवाले भियातत असाय ह्ये सांगी व्होते. कालच्या जत्रेत काय मोटो हात मारल्यानी सो दिसता, म्हणान खिदाळतहस?‘‘
‘‘नाय गो बाये, अगो ह्येंच्यानी पटार खेळाक म्हणान माज्याचकडसून पाचशी घेवन गेले, तुका सकाळी हजार दितय म्हणान सांगल्यांनी.‘‘
‘‘हां हां, म्हणजे तुका सकाळी सकाळी हजार गावले म्हणान खिदाळतहस का काय?‘‘
‘‘नाय गो बाये, आमच्या ह्येंचा टकला ऐन येळाक कसा चलता ता त्येंच्यानी राती येवन सांगल्यानी ता आठावला काय हसोच येता!‘‘
‘‘अगो, काय जाला काय ता आदी सांगशीत काय नाय?‘‘
‘‘अगो, पटार ह्येंचे पाचशेय गेले म्हणान हे वैतागले, इचार करीत जत्रेत फिरत रवले. आणि नारळ इकणा-याच्या दुकानात गेले आणि त्येका म्हणले, ‘माजे सगळे पैशे पटार गेले. माका दोन हजार व्हयेत. सकाळी तुका अडीच देतय!‘
तो बोललो, ‘मी तुमका वळाखनय नाय तर तुमका पैशे कशे दिव?‘
तशे हे म्हणले, ‘माजी किमत करतस?‘
तसो तो म्हणलो, ‘तसा नाय हो. आमी प्वॉट भरुक इलव. ईस-पंचवीस नाल खपले तर खयतरी चार पैशे गावतत. तुमका येकदम दोन हजार कशे काय दीव?‘
ह्येंच्यानी त्येच्याबरोबर झेंगाट धरल्यानी, ‘मी हयलो गावकार आसय. तुजा दुकान बंद करुन टाकीन.‘
तसो तोय चिडलो. म्हणलो, ‘तुमका दोन देयन. पण हयती हातातली आंगठी दिया आणि सकाळी पैशे घेवन येवा.‘
तसा ह्येंच्यानी हातातली आंगठी काडल्यानी आणि त्येच्या आंगार फेकल्यानी, ‘उद्या धा वाजासर तुजे पैशे परत नाय दिलय तर ही आंगटी तुजी.‘ तसाच त्येनाय पाच पाचशेचे चार नोटी काडल्यान आणि ह्येंच्या आंगार फेकल्यान. ते घेवन इले आणि सांगा व्हते.‘‘
‘‘अगो कावळ्या, त्येतूर काय मोठा? त्येचे पैशे त्येका परत करुक नको?‘‘
‘‘अगो ताच तर सांगतहय. ह्ये जत्रेत फिरता फिरता खिशात पाच रुपये होते त्येची आंगठी घेतल्यानी आणि बोटात घालून भांडाक गेले. अगो ह्ये इतके टकलेन भारी आसत, पटार घालयल्यानी पण पाच रुपयाच्या आंगटेर दोन हजार हाडल्यानी!‘‘
असा सांगान गोजरा हसाक लागला आणि साळग्या त्येच्या तोंडार बघीत रवला.

No comments:

Post a Comment